
Yogesh Kedar: मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्या आझाद मैदानातील उपोषणासह आधीच्या आंदोलनातही सोबत असलेला विश्वासू सहकारी म्हणून अॅड. योगेश केदार यांना ओळखलं जातं. याच अॅड. केदार यांनी एक खळबळजक दावा केला आहे. मी सांगत होतो पण मनोजदादांनी माझं ऐकलं नाही, आणि आझाद मैदानातील आंदोलन मागं घेतलं, असं केदार यांनी म्हटलं आहे. त्याचबरोबर त्यावेळी नेमकी परिस्थिती काय होती याचं कथनंही त्यांनी केलं आहे.
केदार म्हणाले, "आझाद मैदानावर जेव्हा राधाकृष्ण विखे पाटील हे आले आणि मनोजदादांसोबत त्यांच्या चर्चा सुरु होत्या तेव्हा त्यांच्या जवळच्या माणसांपैकी मी एक होतो. त्यांनी जो काही कागद सह्याकरुन मनोजदादांच्या हातात दिला होता. तो मंत्रिमंडळ उपसमितीच्या अनुषंगान का निर्णय होणार आहे किंवा प्रस्तावित आहे अशा अनुषंगानं होता. तो काही जीआर नव्हता. पण तरीसुद्धा मनोजदादांनी माझ्या हातात तो कागद देत तपासण्यासाठी सरकारची भाषा योग्य आहे की नाही हे तपासण्याची जबाबदारी माझ्यावर दिली होती.
मी आज महाराष्ट्रातील तमाम मराठ्यांना सांगू इच्छितो की, माझ्या मराठा समाज बांधवांनी म्हणजे ६ कोटी समाज बांधवांनी माझ्यावर जबाबदारी दिली होती की, सरकार जो जीआर म्हणून आमच्या हातात देत आहे ते तपासायची जबाबदारी माझ्याकडं दिली होती. त्यावेळेला मी हा विचार केला की समाजाचा विश्वास हा आपण कायम राखला पाहिजे.
जर शासन फसवत असेल तर ते आपल्या नेतृत्वाला सांगितलं पाहिजे. म्हणून हे तपासून आम्ही घेतलं, इतर अभ्यासकांसोबतही चर्चा केली. त्यानंतर मनोजदादांकडं आम्ही गेलो आणि त्यांना सांगितलं की विखेंच्या नेतृत्वाखाली जे काही शिष्टमंडळ आलं आहे ते आपल्याला फसवायला लागलं आहे. जो जीआर येणार आहे त्याची देखील भाषा आपण तपासून पाहिली पाहिजे. त्याच्यमध्ये काहीतरी गडबड दिसते आहे. आपण शांतपणे घेऊयात काही गडबड करायला नको. त्यावेळी जर मी म्हणालो असतो की, सरकारनं केलेली जीआर अत्यंत योग्य आहे तर येणारा काळ, येणाऱ्या पिढ्यांनी आमच्या केदार घराण्याला माफ केलं नसतं.
लाखो लोक चिखलात, रस्त्यावर होते, अनेकांचं बलिदान झालं होतं. अशा परिस्थित जर मी सरकारच्या हो ला हो म्हणून सरकारनं केलेला कायदा योग्य आहे असं म्हटलं असतं तर इतिहासानं मला माफ केलं नसतं. त्यामुळं मी मनोजदादांना म्हटलं की तुमच्यासारख्या प्रामाणिक माणसाला हे सरकार फसवायला लागलं आहे. मी अक्षरशः तिथं रडलो, डोळ्यात पाणी आलं माझ्या. मी म्हटलं की, दादा तुमचा हा लढा अंतिम टप्प्यात आला आहे. सरकार गुडघ्यावर आलं आहे, शासन प्रशासन कोलमडून पडण्याच्या स्थितीत आहे. आता थोडा धक्का लावल्यावर आपलं हे सगळं ऐकणार आहेत. पण हे माझं दुर्देव आहे कुठतरी पुण्याई कमी पडली असेल. कारण मी मनोजदादांना मी कन्व्हिअन्स करु शकलो नाही, असंही योगेश केदार यांनी म्हटलं आहे.
"पण महाराष्ट्राला माहिती पाहिजे की, त्या अख्या भाऊ गर्दीत एकटा योगेश केदार होता जो सांगत होता की, हे आपल्याला मान्य नाही हे होऊ शकत नाही. पण मनोजदादा माझ्या तोंडून वदवून घ्यायचा प्रयत्न करत होते, तुम्हाला मान्य आहे ना? म्हटले की आधी कसं म्हटला? पण मी म्हटलं की मी आधी म्हटलोच नाही हे. मराठवाड्यातील सर्व मराठ्यांना हैदराबाद गॅझेटियरचा फायदा होणार नाही हे मी सांगत होतो. याबाबतच आश्वासन आपल्याला मान्य होऊ शकत नाही हे मी त्यांना सांगत होतो. पण ठीक आहे मराठा हा शब्द जिथं जिथं आला त्याला आपण आरक्षण देऊ शकत नाही, हे ही सांगितलं.
पण त्यावेळी गोंधळ झाला. पण मनोजदादाला असं वाटलं की, योगेश केदार असं कसं बोलला. माझ्या शब्दाच्यापुढे कसं काय बोलला? मी सरकरला होय म्हणतो आणि हा कसं नाही म्हणतोय. पण समाजाला एक वकील म्हणून सत्य सांगणं एक कायद्याचा अभ्यास केलेला माणूस म्हणून सरकारला सांगणं आपलं कर्तव्य होतं. म्हणून हा संदेश मी सर्वांपर्यंत पोहोचवतो आहे," अशा शब्दांत योगेश केदार यांनी आपल्या मनातील खंत एका व्हिडिओ संदेशाद्वारे बोलून दाखवली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.