
Latur Political News : अॅड. गुणरत्न सदावर्ते सध्या मराठवाडा दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात त्यांनी मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षणाची मागणी करणारे मनोज जरांगे पाटील यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे. मनोज जरांगे यांच्यामुळेच मराठा समाजाचे आणि विद्यार्थ्यांचे नुकसान होत असल्याचा दावा करतानाच त्यांनी मराठा आरक्षणाचा नाद सोडावा, असा सल्ला सदावर्ते यांनी दिला आहे.
लातूर दौऱ्यावर आलेल्या गुणरत्न सदावर्ते यांनी मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्यावर टीका करताना आरोपही केले. मनोज जरांगे यांच्यामुळे मराठा विद्यार्थ्यांचे नुकसान झाले आहे. आर्थिक दुर्बल घटक म्हणजे ईडब्लूएसच्या माध्यमातून मिळणारे मराठा विद्यार्थ्यांचे आरक्षण गेले आहे. त्यामुळे आता पाच टक्क्यांपेक्षा कमी आरक्षण मराठा विद्यार्थ्यांना मिळत आहे. मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षणाचा नाद सोडावा, असे सदावर्ते यांनी म्हटले आहे.
मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation) नाद सोडण्यासाठी आता जाणकार नेत्यांकडून प्रयत्न झाले पाहिजेत. मनोज जरांगे यांच्या हट्टामुळे मराठा विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे. मराठा समाजाला ईडब्लूएसमधील आठ टक्के आरक्षण मिळत होते. परंतु आता मराठा विद्यार्थ्यांना पाच टक्के पेक्षा कमी आरक्षण मिळत आहे. अभियांत्रिकी, वैद्यकीय शाखेला प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची (एमपीएससी) परीक्षा देणारे विद्यार्थी यांचे देखील किती नुकसान होत आहे, ते त्यांना विचारल्यास ते सांगू शकतात. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका जवळ येत असल्यानेच मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा आरक्षणाचा विषय छेडला आहे. पावसाळ्यात जशा छत्र्या उगवतात, तसे निवडणुका आल्या की हे उगवतात, असा टोला गुणरत्न सदावर्ते यांनी मनोज जरांगे पाटील यांना लगावला.
कुणाच्या तरी राजकीय कुबड्या घेऊन ते काम करत आहेत. जरांगे यांची सुरू झालेली चुळबुळ पाहता निवडणुकींमुळे आता मनोज जरांगे यांच्याकडे येणाऱ्या गाड्या वाढतील. बुजगावणे उभे केले जातील, असेही गुणरत्न सदावर्ते म्हणाले. दरम्यान, मनोज जरांगे पाटील हे दीड वर्षापासून मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण मिळावे, या मागणीसाठी लढा देत आहे.
त्यासाठी अनेक उपोषणही त्यांनी केली. त्यानंतर मराठा आरक्षणासंदर्भात शिंदे समितीची स्थापना करून या समितीकडून कुणबी नोंदी तपासण्याचे काम सुरू झाले आहे. या समितीला मुदतवाढ देण्यात आलेली आहे. जरांगे यांच्या आंदोलनामुळेच राज्यात लाखो कुणबी नोंदी सापडल्या आणि अनेकांना प्रमाणपत्रांचे वाटपही झाले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.