
NCP Political News : राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर सुरुवातीच्या काळात मराठवाड्यातील बहुतांश जिल्ह्यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांची साथ देण्याचा निर्णय घेतला होता. लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीने मराठवाड्यातील सात जागा जिंकल्या. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार यांच्यासोबत गेलेल्या पदाधिकाऱ्यांचा निर्णय योग्य असल्याचे बोलले गेले. शरद पवारांच्या राष्ट्रवादीने बीड लोकसभेची जागा जिंकत मोठी बाजी मारली. मात्र त्यानंतर सहा महिन्यानी झालेल्या विधानसभा निवडणुकीत सगळेचं चित्र पालटले.
विधानसभा निवडणुकीत महायुतीने 238 आमदार निवडून आणत बहुमताने सत्ता मिळवली. त्याचा परिणाम राज्यात महाविकास आघाडीतील घटक पक्षांमधून आऊटगोईंग सुरु होण्यात झाला. याचा सर्वाधिक फटका उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीला बसला. तर महायुतीतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला याचा सर्वाधिक फायदा झाला. मराठवाड्याचा विचार केला तर (Ajit Pawar) अजित पवारांनी पक्ष फुटीनंतर सैल झालेली आपली पकड करण्यासाठी जोरदार हालचाली सुरू केल्या.
बीड, नांदेड, परभणी या जिल्ह्यांमध्ये अजित पवारांनी सातत्याने दौरे केले. इतर पक्षाच्या बड्या नेत्यांना गळाला लावत पक्ष वाढीसाठी त्यांच्यावर जबाबदारी टाकली. त्याचे चांगले परिणाम या तीनही जिल्ह्यांमध्ये दिसायला लागले आहेत. विशेषतः अशोक चव्हाण यांचे वर्चस्व असलेल्या नांदेड जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने (NCP) चांगला जम बसवला आहे. अजित पवारांनी विधानसभा निवडणुकीपूर्वी प्रताप पाटील चिखलीकर यांना पक्षप्रवेश देत लोहा-कंधार मतदारसंघाची उमेदवारी दिली.
चिखलीकरांनी विजय मिळवला आणि नांदेडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नंबर वन करण्याचा विडा उचलला. काँग्रेस आणि काही प्रमाणात उद्धव ठाकरे यांच्या पक्षातील माजी आमदार, जिल्हाप्रमुखांना राष्ट्रवादीत घेत चिखलीकरांनी पक्षाला बळकटी दिली. काँग्रेसमधील चार माजी आमदारांना पक्षाच खेचल्यानंतर अजित पवारांचाही चिखलीकरांवरील विश्वास बळावला. आता नांदेड जिल्ह्यात पक्षाचे एकहाती नेतृत्व चिखलीकर यांच्या हाती आले आहे.
परभणीवर विशेष प्रेम
अजित पवार यांचे परभणीवर पुर्वीपासूनच विशेष प्रेम राहिले आहे. राजेश विटेकर, विजय भांबळे हे त्यांचे विश्वासू सहकारी होते. पक्ष फुटीनंतर विजय भांबळे हे शरद पवार यांच्यासोबत थांबले तर विटेकर यांना आमदारकीचा केलेले वादा अजितदादांनी पूर्ण करत त्यांना विधान परिषदेवर आणि नंतर विधानसभेची उमेदवारी देत दोन आमदार वाढवले. आता आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका डोळ्यासमोर ठेवून अजित पवारांनी परभणी महापालिका आणि जिल्हा परिषदेवर लक्ष्य केंद्रीत केले आहे.
नुकताच परभणीचा दौरा करत प्रलंबित प्रश्नांचा आढावा आणि मुंबईत मंत्रालयात तात्काळ बैठक घेऊन सगळे प्रस्ताव नव्याने सादर करण्याचा सूचना दिल्या आहेत. निवडणुका जाहीर होण्याआधी हे प्रश्न निकाली काढून या कामाच्या जोरावर महापालिकेत सत्ता मिळवण्याचे अजित पवार यांचे स्वप्न आहे. याची तयारी आतापासून राष्ट्रवादीने सुरू केल्याचे चित्र आहे. राजेश विटेकर यांच्यावर विश्वास टाकत अजित पवारांनी त्यांना जिल्ह्याचे नेतृत्व सोपवल्याची चर्चा आहे.
बीडमध्ये स्वतः लक्ष घातले
संघटनात्मक दृष्टीने मजबूत असलेल्या बीड जिल्ह्यात मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख खून प्रकरणानंतर पक्ष काहीसा बॅकफूटवर गेल्याचे चित्र आहे. या खून प्रकरणात माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर झालेले आरोप, वाल्मीक कराडसह मुंडे यांच्या जवळच्या मंडळीवर दाखल झालेले गुन्हे, धनंजय मुंडे यांना गमवावे लागलेले मंत्री पद याचा फटका आगामी काळात पक्षाला बसू नये, यासाठी अजित पवार यांनी स्वतः बीडवर लक्ष दिले आहे.
धनंजय मुंडे यांना सार्वजनिक कार्यक्रमांपासून दूर ठेवत अजित पवार यांनी पालकमंत्री म्हणून आणि पक्षाचे प्रमुख नेते म्हणून बीडची सुत्रं आपल्या हाती घेतली आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने लोकसभा निवडणुकीत मराठवाड्यातील एकमेव खासदार याच बीडमधून निवडून आणला. शिवाय बीडचा आमदारही याच पक्षाचा आहे. त्यामुळे अजित पवार यांनी स्वतः लक्ष घालून जिल्ह्यात आपल्या पक्षाचे वर्चस्व पुन्हा कसे प्रस्थापित करता येईल, या दृष्टीने हालचाली सुरू केल्या आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.