Marathwada Political News : एक रुपयात पिक विमा योजनेला शेतकऱ्यांनी चुना लावला,असा आरोप करणाऱ्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या परभणी दौऱ्यात किसान सभा आणि युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी गोंधळ घातला. परभणी जिल्हाधिकारी कार्यालयात अजित पवार यांच्या वाहनांचा ताफा येत असताना अचानक आंदोलनकर्त्यांनी घोषणाबाजी सुरू केली. सोबत आणलेल्या चून्याच्या डब्या अजित पवारांच्या वाहनांच्या ताब्यावर फेकत विधानाचा निषेध केला.
युवक काँग्रेसचे पदाधिकारी तसेच किसान सभेच्या कार्यकर्त्यांनी अचानक केलेल्या या आंदोलनामुळे पोलिसांची तारांबळ उडाली. आंदोलकांना ताब्यात घेत पोलिसांनी अजित पवारांच्या ताफ्याला मार्ग करून दिला. या प्रकाराने जिल्हाधिकारी कार्यालयात बराच वेळ गोंधळाचे वातावरण होते. दरम्यान (Ajit Pawar) अजित पवारांच्या वाहनांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न करणाऱ्या कार्यकर्त्यांना नवा मोंढा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
विकास कामांचा आढावा घेण्यासाठी अजित पवार आज परभणी जिल्हा दौऱ्यावर आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठकीनंतर ते महापालिकेचाही आढावा घेणार आहेत. (Parbhani) दुपारी बारा वाजता जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर अजित पवारांच्या वाहनांचा ताफा येताच जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष तसेच किसान सभेचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली.
अजित पवार यांनी एक रुपयात पिक विमा योजनेला शेतकऱ्यांनी चुना लावला, असे वक्तव्य काही दिवसांपूर्वी केले होते. याचा निषेध करत या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली आणि ताफ्याच्या दिशेने झेपावत सोबत आणलेल्या चुन्याच्या डब्या फेकल्यामुळे एकच गोंधळ उडाला. परंतु यावेळी बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांनी आंदोलकांना तातडीने ताब्यात घेत अजित पवार व त्यांच्या ताफ्याला मार्ग मोकळा करून दिला.
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची घोषणा करून पळ काढणाऱ्या अजित पवारांचा धिक्कार असो, सरकार हमसे डरती है,पोलीस को आगे करती है, अशा घोषणा यावेळी कार्यकर्त्यांनी दिल्या. दरम्यान परभणी जिल्ह्यातील माळसान्ना गावात एका तरुण शेतकऱ्याने आत्महत्या केली होती. पतीच्या आत्महत्येमुळे तणावात असलेल्या त्याच्या पत्नीनेही स्वतःचे आयुष्य संपवून घेतले. एकाच कुटुंबात दोन आत्महत्या झाल्यानंतर जिल्हा दौऱ्यावर आलेले राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार या कुटुंबीयांची भेट घेण्यासाठी गेले नाही, असा आरोप आंदोलकांनी केला.
परभणीमध्ये आपल्या कंत्राटदारांना पोसण्यासाठी अजित पवार आले आहेत. निवडणुकीच्या काळात शेतकर्यांना कर्ज माफी देतो असे, आश्वासन दिले. पण अजित पवारांनी स्वत:च्या 70 हजार कोटीच्या सिंचन घोटाळ्याची माफी करून घेतली, तेच या सरकारचे सगळ्यात मोठे लाभार्थी आहेत, अशी टीका किसान सभा आणि युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी यावेळी केली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.