Shivsena UBT News : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या टॉक शोची चर्चा सुरू असतानाच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून या कार्यक्रमावर ईव्हेंटबाजी म्हणत टीका करण्यात आली आहे. अंबादास दानवे यांनी टॉक शोचा झगमगाट तर झाला, पण यात संभाजीनगरच्या प्रश्नांचा अंधारच होता, असा टोला लगावला आहे. तुम्ही गप्पा मारून पुढे रवाना झालात, पण शहरवासियांचे प्रश्न अनुत्तरितच आहेत, अशी टीकाही दानवे यांनी केली.
महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचारा निमित्त भाजपच्या वतीने छत्रपती संभाजीनगरमध्ये आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचा टॉक शो आणि त्यांचे एकाच वेळी 80 हून अधिक वार्डांमध्ये प्रसारण करण्यात आले. भाजपच्या या हाय टेक प्रचाराची चर्चा होत असली तरी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने मुख्यमंत्र्यांच्या या कार्यक्रमावर ईव्हेंटबाजी म्हणत टीका केली आहे. माजी विरोधी पक्षनेते तथा नेते अंबादास दानवे यांनी मुख्यमंत्र्यांना काही प्रश्न करत त्याची उत्तरे मागितली आहेत.
छत्रपती संभाजीनगरमध्ये देवेंद्र फडणवीस यांचा झालेला 'टॉक शो' म्हणजे शहराच्या मूळ प्रश्नांना बगल देऊन केलेली केवळ 'इव्हेंटबाजी' ठरली. साहेब, तुम्ही गप्पा मारून पुढे रवाना झालात, पण शहरवासीयांचे हे रोखठोक प्रश्न आजही अनुत्तरित आहेत. पर्यटनावर बोलताना साहेबांना सोयीस्कर विसर पडला की, याच सरकारने शहराची ओळख असलेला 'वेरूळ महोत्सव' बंद पाडला. महायुतीचे पर्यटनमंत्री कधी शहरात फिरकले नाहीत, ना कधी त्यांनी बैठक घेतली. याउलट, आदित्य ठाकरे प्रत्येक स्टेकहोल्डरशी चर्चा करून जमिनीवर काम करत होते.
ज्या घृष्णेश्वर कॉरिडॉरच्या तुम्ही गप्पा मारल्या, त्यासाठी पर्यटन विभागाने आतापर्यंत नेमका किती निधी दिला, हे का सांगितले नाही? नुसत्या घोषणांनी विकास होत नसतो, त्यासाठी प्रत्यक्ष तरतूद लागते. पाणी प्रकल्पाचे गौडबंगाल असून साध्या पाईपलाईनचा मोठा 'इव्हेंट' करणारे तुम्ही, मग पम्पिंग यंत्रणेची चाचणी लपून-छपून का उरकताय? प्रकल्पाची किंमत 1000 कोटींनी कशी वाढली? राज्य सरकार 30% वाटा देणार असताना, शहरवासीयांच्या माथी 800 कोटींचे कर्ज का मारले? असा सवाल अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी उपस्थित केला आहे.
स्टेडियमच्या गप्पा मारण्यापूर्वी सांगा आमच्या हक्काचे 'स्कूल ऑफ प्लॅनिंग अँड आर्किटेक्चर' (SPA) शहरातून पळवून नेताना आपली निष्ठा कुठे होती? शहराचे शैक्षणिक नुकसान करून तुम्ही संभाजीनगरला नेमकं काय दिलं? गृहमंत्री म्हणून तुम्ही शहरातल्या वातावरणाची केवळ वरकरणी चर्चा केली. पण शहरात फोफावलेल्या अमली पदार्थांच्या विळख्यावर आपण ठोस का बोलला नाहीत? तरुण पिढी उद्ध्वस्त करणाऱ्या या रॅकेटला मोडीत काढण्यासाठी काय कृती करणार?
शहरातील कचऱ्याचे मूळ टेंडर 250 कोटींचे असताना त्याची किंमत थेट 650 कोटींवर कशी पोहोचली? हा 400 कोटींचा जास्तीचा बोजा कोणाच्या आशीर्वादाने पडला? या भ्रष्टाचाराचे पैसे नेमके कोणाच्या खिशात गेले?जल-मल निस्सारण योजनेचे (STP) टेंडर वारंवार गुजरातच्याच कंपन्यांना कसे काय दिले जाते? महाराष्ट्रातील कंपन्या सक्षम नाहीत की येथे केवळ गुजरातच्या कंत्राटदारांचे लाड पुरवले जात आहेत? अशी विचारणाही अंबादास दानवे यांनी केली.
गेल्या चार वर्षांत महापालिकेत जो अतोनात भ्रष्टाचार झाला, त्याबद्दल 'टॉक शो'मध्ये एकही चकार शब्द का निघाला नाही? या भ्रष्टाचाराचे ऑडिट करण्याबाबत आपण का बोलला नाहीत? कोणाला संरक्षण दिले जात आहे? समृद्धी महामार्गाचे श्रेय घेता, पण आम्ही खंबीरपणे मध्ये उभे राहिलो म्हणूनच शेतकऱ्यांना जमिनीचा पाच पट मोबदला नाईलाजास्तव द्यावा लागला.
अन्यथा, तुम्ही त्या जमिनी कवडीमोल भावाने लाटण्याच्या तयारीत होतात, असा आरोपही अंबादास दानवे यांनी केला. छत्रपती संभाजीनगरला आता 'टॉक शो'चे इव्हेंट नकोत, तर पळवलेल्या संस्था, टेंडरमधील घोटाळे आणि रखडलेल्या प्रश्नांची ठोस उत्तरं हवी आहेत, असेही दानवे यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.