
Shivsena UBT News : ये उद्धवसेना को क्या हो गया है, आज बालासाहेब ठाकरे होते तो मोदीजी को गले लगा लेते' असे म्हणत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पक्षावर नांदेडच्या शंखनाद सभेतून टीका केली. शहा यांच्या या टीकेनंतर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी त्यांना टोला लगावला. शिवसेनेची लांडगेतोड करणाऱ्यांना बाळासाहेबांनी दारात उभं केलं नसतं, गळाभेट लांबच, अशा शब्दात सुनावले.
देशाचे गृहमंत्री झालेले अमित शहा (Amit Shah) आज पहिल्यांदा नांदेड दौऱ्यावर आले होते. शंखनाद सभेच्या माध्यमातून भाजपाने आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीचा शंखनाद केल्याची चर्चा या निमित्ताने सुरू आहे. याच सभेत सिंदूर आॅपरेशनवर टीका करणाऱ्या उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेवर शहा यांनी हल्ला चढवला. ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून भारताने पाकिस्तानातील दहशतवादी तळ उद्धवस्त केले, अतिरेक्यांना त्यांच्या घरात घुसून ठार मारले.
पाकिस्तानकडून झालेला एकही हल्ला आमच्या सैन्य दलाने यशस्वी होऊ दिला नाही. हे शौर्य आणि पाकिस्तानचा दहशतवादाला असलेला पाठिंबा जगाला सांगण्यासाठी जगभरात गेलेल्या खासदारांच्या शिष्टमंडळात उद्धवसेनेचे खासदारही आहेत, याकडे शहा यांनी लक्ष वेधले. मात्र त्यांचे राज्यातील नेते या दौऱ्याला 'बारात' म्हणत आहेत. (Shivsena) उद्धवसेनेला काय झालं आहे? हा बाळासाहेब ठाकरे यांचा पक्ष आहे का? बाळासाहेब ठाकरे आज असते तर आॅपरेशन सिंदूर राबवून दहशतवाद्यांना धडा शिकवल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मिठी मारली असती, असेही अमित शहा म्हणाले.
शहा यांच्या या विधानावर अंबादास दानवे यांनी टोले लगावत काही सवाल केले आहेत. नांदेडला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह म्हणाले की हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी आॅपरेशन सिंदूरसाठी मोदींची गळाभेट घेतली असती. मात्र त्यांनी काय केलं असतं हे आम्ही शिवसैनिक जास्त चांगलं सांगू शकतो. अगोदर, त्यांनी शिवसेनेची लांडगेतोड करणाऱ्याला कधीच दारात उभं केलं नसतं, गळाभेट लांबच.
धर्म विचारून हिंदूंचे प्राण घेणारे 'ते हल्लेखोर अतिरेकी' कुठे आहेत, हा सवाल त्यांनी केला असता. त्यांनी हे ही विचारले असते की, ऑपरेशन सिंदूरच्या निमित्ताने सगळं देश सोबत उभा असताना, कोणाच्या दबावाखाली पाकिस्तानशी शस्त्रसंधी घोषित करण्यात आली? दुसरीकडे, आज मराठवाड्यावर विशेष प्रेमाचा देखावा करताना त्यांनी मराठवाडा वॉटर ग्रीडचा उल्लेख केला. या योजनेच्या कागदांचा गठ्ठा मंजुरीसाठी आपल्या केंद्र सरकारकडे पाठवल्याची घोषणा राज्य सरकारने केली होती. त्याचं पुढे काय झालं, हे मात्र शाह सांगायला विसरले.
हे कोकण आणि कृष्णा खोऱ्याचे पाणी मराठवाड्याला देणार हे भाजप १० वर्षांपासून सांगते आहे. अजून तरी एकही थेंब मराठवाड्यात आलेला नाही! धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचे नाव घेऊन आपण भाषण सुरू केले खरे मात्र चिकलठाणा विमानतळाला त्यांचे नाव देण्याची फाईल अंतिम मंजुरीची वाट पाहत अजून केंद्राकडे धूळखात पडली आहे, याकडेही अंबादास दानवे यांनी शहा यांचे लक्ष वेधले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.