
Nanded Congress News : काँग्रेस पक्षाने या नांदेड जिल्ह्याला खूप काही दिले, नांदेडनेही पक्षाला भरभरून दिले. पण दोन दिवसापुर्वी याच नांदेडमध्ये येऊन देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी दिवंगत शंकरराव चव्हाण यांचा आणि पर्यायाने नांदेडचा अपमान केला. शंकरराव चव्हाण हे देशाचे संरक्षण, गृहमंत्री होते. पण काँग्रेसच्या काळात नांदेडमध्ये विकासच झाला नाही, असं अमित शाह म्हणाले. नांदेडचा अन् शंकरराव चव्हाण यांचा अपमान होत असताना त्यांचे चिरंजीव अशोक चव्हाण मात्र गप्प बसून होते, अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली.
दोन दिवसापुर्वी नांदेडमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीत भाजपाची शंखनाद सभा पार पडली. काँग्रेसचे माजी मंत्री डी.पी.सावंत, माजी जिल्हाध्यक्ष बी.आर.कदम यांच्यासह माजी नगरसेवक आणि नगराध्यक्षाने भाजपमध्ये प्रवेश केला. अमित शाह यांनी या सभेत काँग्रेसवर जोरदार टीका केली होती. या शंखनाद सभेला काँग्रेसने आज नांदेडमध्ये जय जवान, जय किसान तिरंगा रॅली काढत प्रत्युत्तर दिले. हर्षवर्धन सपकाळ (Harshvardhan Sapkal) यांनी खासदार अशोक चव्हाण यांच्यावरही तुरुंगात जाण्याच्या भितीने ते भाजपात गेले, ते पळपुटे निघाले, अशी टीका केली.
सपकाळ यांनी आपल्या संपूर्ण भाषणात आॅपरेशन सिंदूर, अमेरिकेचा दबाव, आरएसएस-मुस्लिम लीगची युती अशा चौफेर विषयावर भाष्य करत भाजपावर टीका केली. पहलगाममध्ये तीनशे किमी आत येऊन अतिरेक्यांनी निरपराध 26 नागरिकांची हत्या केली व परत गेले. आजपर्यंत ते सापडले नाहीत हे सरकारचे अपयश आहे. हे दहशतवादी आत आले कसे व परत गेले कसे? याचे उत्तर अमित शाह (Amit Shah) यांनी दिले नाही. पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेण्याची संधी असतानाही ती सोडली व अचानक युद्धविराम का केला? डोनाल्ड ट्रम्पच्या धमक्यांना घाबरून युद्धविराम केला का? याची उत्तरे भाजपा सरकारला द्यावी, लागतील अशा शब्दात सपकाळ यांनी सुनावले.
ऑपरेशन सिंदूरमध्ये आपल्या वीर जवानांनी साहस दाखवले त्यांचे अभिनंदन करण्यासाठी ही रॅली काढण्यात आली आहे. देशाच्या सीमेवर जवान लढत आहे तर आपला बळीराजा येथे जमीन कसतो व सर्वांचे पोट भरतो. त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी काँग्रेस पक्षाने या रॅलीचे आयोजन केले आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह महाराष्ट्रात तीन दिवस होते, नांदेडमध्येही त्यांनी एक सभा घेतली. पण निवडणूक प्रचारावेळी शेतकरी कर्जमाफी, लाडक्या बहिणांना 2100 रुपये देणार, दोन सिलिंडर मोफत देणार यावर ते काहीच बोलले नाही.
अचानक युद्धबंदी का केली? अमेरिकेच्या दबावापुढे सरकार झुकले का? याबद्दल ते काहीच बोलले नाहीत. फक्त काँग्रेसवर टीका करण्यासाठी ते आले होते का? अमित शाह व भाजपाला काँग्रेसवर बोलण्याचा काही अधिकार नाही. काँग्रेसने देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले आहे, इंदिराजी गांधी यांनी पाकिस्तानचे दोन तुकडे केले. लाल बहाद्दुर शास्त्री यांनी जय जवान, जय किसान ही घोषणा दिली. राजीव गांधी व इंदिराजी गांधी यांनी देशासाठी बलिदान दिले, असे सपकाळ म्हणाले.
तुम्हाला काँग्रेसवर बोलण्याचा अधिकार नाही..
भाजपा व मुस्लीम लिग यांचे जुने नाते आहे. भाजपाच्या वैचारिक पूर्वजांनी मोहम्मद अली जिन्ना यांच्या पक्षाबरोबर युती करून सरकारे स्थापन केली होती, श्यामा प्रसाद मुखर्जी या सरकारमध्ये मंत्री होते. द्विराष्ट्रवादाचा सिद्धांत कोणी मांडला हे सर्वांना माहित आहे. भाजपा व राष्ट्रीय स्ववसेवक संघाचे स्वातंत्र्य चळवळीत काही योगदान नाही. देशाच्या तिरंगा झेंड्याची यांना ऍलर्जी आहे. पन्नास वर्ष संघाच्या कार्यालयावर तिरंगा सुद्धा फकडवला नाही, अशा लोकांनी काँग्रेसवर बोलू नये, असा इशारा सपकाळ यांनी आपल्या भाषणात दिला.
नांदेडमध्ये शंखनाद सभा घेण्यात आली पण शंख कधी फुंकतात याचे भानही भाजपाला नाही. कालपर्यंत जे लोक काँग्रेसचे वजनदार नेते होते ते आता शंखनाद करत आहेत. काँग्रेसमध्ये असताना महाराष्ट्र केसरी असलेले अशोक चव्हाण आता जत्रेत कुस्ती खेळत आहेत. अशोक चव्हाण हे आमदार, खासदार, मंत्री व मुख्यमंत्री झाले. काँग्रेसमध्ये असताना ते महाराष्ट्र केसरी तर वडील शंकरराव चव्हाण हिंद केसरी होते, ते देशाचे सरंक्षण मंत्री व गृहमंत्री होते. नांदेड हे महाराष्ट्र व देशाचे नेतृत्व करणारे शहर होते पण त्याचे नाव घालवण्याचे काम अशोक चव्हाण यांनी केले.
अमित शाह यांनी नांदेडच्या सभेत काँग्रेस पक्षाच्या काळात चांगले काम झाले नाही, अशी टीका केली. संरक्षण मंत्री व गृहमंत्री म्हणून यशस्वी काम केलेल्या शंकरराव चव्हाण यांचा व नांदेडचा हा अपमान आहे. हा अपमान होत असताना शंकररावांचे चिरंजीव अशोक चव्हाण गप्प बसले होते, अशी टीकाही सपकाळ यांनी केली. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत नांदेडमध्ये काँग्रेस पक्षाचाच विजय होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. भाजपा पक्ष हा उधारच्या सिंदूरवरच चालणारा पक्ष असल्याचा टोलाही सपकाळ यांनी लगावला. अमित शाह यांच्या सभेत व्यासपीठावर सत्तर टक्के लोक हे काँग्रेसमधून गेलेलेच होते, असा दावा त्यांनी केला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.