
Beed News : बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील मुख्य सूत्रधारांना अटक करण्यासाठी,त्यांच्या कुटुंबियांना न्याय मिळवून देण्यासाठी शनिवारी (ता.28) मूक मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात सर्वपक्षीय नेते,आमदार सहभागी झाले आहेत. पण बीडच्या मधील गुन्हेगारीवरुन गेले काही दिवस आरोपांनी राजकारण पेटवणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया (Anjali Damania) याही मूक मोर्चात सहभागी होणार होत्या. पण ऐनवेळी त्यांनी या मोर्चातून माघार घेतली.
बीडमध्ये सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh Murder Case) यांच्या हत्येप्रकरणी मोर्चा काढण्यात आला. या मोर्चा हजारोंचा जनसमुदाय सहभागी झाला. शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून मूक मोर्चाला सुरुवात करण्यात आली. यावेळी देशमुख हत्याप्रकरणातील आरोपींना फाशी देण्यात यावी अशी मागणी केली. या मोर्चात मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील, आष्टीचे आमदार सुरेश धस, बीडचे आमदार संदीप क्षीरसागर,माजी खासदार छत्रपती संभाजी महाराज सहभागी झाले होते.
बीडमधील (Beed) या मूक मोर्चात सहभागी न होता अंजली दमानिया यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर ठिय्या आंदोलन करणार असल्याची घोषणा केली. तसेच त्यांनी या आंदोलनासाठी प्रशासनाकडे परवानगी मागितली होती. पण त्यांना जिल्हाधिकारी प्रशासनाकडून परवानगी नाकारण्यात आली आहे.
सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची भेट घेतल्यानंतर आपण बीडमधील मोर्चात सहभागी होणार नसल्याचं स्पष्ट केलं होतं. त्या म्हणाल्या,काही राजकीय नेते ड्रामा करत असल्याचं मला कुठेतरी जाणवत आहे. संतोष देशमुखांचे कुटुंब या मोर्चात जाणार आहेत. अनेकजण या मोर्चात जातील. पण मी आजच्या मोर्चात सहभागी होणार नसल्याचं दमानिया यांनी सांगितलं.
त्या म्हणाल्या, या मोर्चात जे जे सहभागी होत आहे,त्या प्रत्येकाला धनंजय मुंडे कसे आहेत,याची कल्पना आहे.तसेच काही महिन्यांपूर्वी शरद पवारांनीही धनंजय मुडेंचे अनेक कारनामे आम्ही पाठीशी घातल्याचं सांगितलं होतं. वाल्मिक कराड हा त्या कारनाम्यांपैकीच एक आहे.अशा लोकांना पुढे करुन ज्याप्रकारे दहशत पसरवली जाते, ती कुठेतरी थांबवायला हवी. त्यामुळे आम्ही या मोर्चात न भाग घेता, जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर बसणार असल्याचं दमानिया म्हणाल्या.
आमच्या राज्यासाठी कायदे बनवणारे मंत्रीच जर गुन्हेगार किंवा त्या प्रवृत्तीचे असले तर ते आम्हांला नको आहेत. आम्हाला धनंजय मुंडेंसारखे मंत्रीदेखील नको आहेत. त्यामुळे या सारख्या मंत्र्यांना राजीनामा द्यायला आम्ही भाग पाडू आणि बीडची जनताही त्यांना भाग पाडेल”,असा विश्वासही अंजली दमानिया यांनी यावेळी बोलून दाखवला.
याचवेळी त्यांनी आमच्या या आंदोलनात ज्यांना कोणाला साथ द्यायची असेल,त्यांनी द्यावी असं आवाहनही दमानिया यांनी केलं. मात्र, जोपर्यंत वाल्मिक कराडला अटक होत नाही आणि धनंजय मुंडेंना आम्ही मंत्रिपद सोडायला भाग पाडत नाही, तोपर्यंत तिथेच ठिय्या आंदोलन करणार असल्याचा इशाराही अंजली दमानिया यांनी दिला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार प्रकाश सोळुंखे यांनीच स्वपक्षीय धनंजय मुंडेंच्या कार्यपध्दतीवर बोट ठेवल्यानं सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या आहेत.माजलगावचे आमदार सोळुंखे म्हणाले, गेली पाच वर्षे वाल्मिक कराडला पूर्ण अधिकार दिले होते.कार्यकारी पालकमंत्री म्हणून त्याचे त्यावेळी कौतुकही करण्यात आले होते,ते जगजाहीर आहे.त्यामुळे बीडमध्ये जे काही घडलं आहे,त्याला धनंजय मुंडेंची कार्यपद्धती जबाबदार आहे, असे माझे मत आहे, असा गंभीर आरोप सोळुंखे यांनी केले आहेत.
आमदार प्रकाश सोळुंखे म्हणाले, मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या खुनाच्या घटनेच्या 19 दिवसांनंतरही आरोपी पकडले जात नाहीत, यामुळे बीडमधील जनतेच्या मनात मोठा उद्रेक आहे. हे केवळ राजकीय वरदहस्त असल्यामुळे घडत आहे, अशी जनतेच्या मनातील शंका आहे आणि ती रास्त आहे. या प्रकरणातील संशयित आरोपी आहेत, ते धनंजय मुंडे यांच्या अतिशय जवळचे असल्याचा हल्लाबोलही त्यांनी यावेळी केला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.