
Nanded BJP Politics : आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी पक्षाच्या मेळाव्यात बोलताना राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा भाजपाचे खासदार अशोक चव्हाण यांनी स्वबळाचा नारा दिला. तेव्हापासून महायुतीतील घटक पक्ष असलेल्या शिवसेना आणि राष्ट्रवादीतील नांदेड जिल्ह्यातील नेत्यांनी चव्हाण यांच्यावर तोंडसुख घ्यायला सुरुवात केली. यावर आतापर्यंत गप्प राहिलेले अशोक चव्हाण थेट विरोधकांना भिडल्याचे चित्र आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडे तक्रार करा, की दिल्लीत काहीही परिणाम होणार नाही, अशा शब्दात त्यांनी विरोधकांना सुनावले.
शिवसेनेचे आमदार हेमंत पाटील, बालाजी कल्याणकर यांनी अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रार केली होती. त्यानंतर नुकत्याच झालेल्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आभार दौऱ्यातही स्थानिक शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी शिंदेंकडे अशोक चव्हाण यांचे गाऱ्हाणे मांडले. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी अशोक चव्हाण हे खरचं भाजपाचे नेते आहेत का? हे त्यांनी तपासावे. त्यांना स्वतंत्र लढण्याची खूमखुमी असेल तर आम्हीही तयार आहोत, अशा भाषेत डिवचले होते.
या पार्श्वभूमीवर नांदेडमध्ये अशोक चव्हाण यांना माध्यमांनी प्रश्न विचारले तेव्हा, त्यांनी विरोधकांना आपण फारसे गांभीर्याने घेत नसल्याचे म्हटले. मी स्वतःला (BJP) भाजपाचा नेता नाही तर साधा कार्यकर्ता समजतो. प्रत्येकाला आपला पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे, तसा तो भाजपाला देखील आहे. निश्चितच आमची ताकद जिल्ह्यात वाढली आहे. आमच्या कार्यकर्त्यांची देखील स्वतंत्र लढण्याची इच्छा आहे. त्यामुळे ते जो निर्णय घेतील तेच होईल, असे स्पष्ट करत पुन्हा एकदा अशोक चव्हाण आपल्या स्वबळाच्या निर्णयावर ठाम असल्याचे दिसले.
माझ्यावर टीका करणाऱ्यांना करू द्या, माझी तक्रार मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडे केल्याचे समजले. हरकत नाही, दिल्लीत जाऊनही माझी तक्रार केली तरी काही हरकत नाही, पण त्याचा काहीही परिणाम होणार नाही. मी नांदेडमध्ये पक्ष वाढवण्यासाठी जे जे करावे लागेल ते करणारच, अशी ठाम भूमिकाही अशोक चव्हाण यांनी घेतली. एकूणच अशोक चव्हाण स्वबळाच्या आपल्या निर्णयावरून माघार घ्यायला तयार नाहीत. विरोधकांनी कितीही तक्रारी केल्या तरी आपण त्याला जुमानत नाही, हेच चव्हाण यांनी या निमित्ताने दाखवून दिले.
कोण काय म्हणाले?
शिवसेनेचे आमदार हेमंत पाटील यांनी अशोक चव्हाण यांना भाजपा कळलीच नाही? ते भाजपात स्वतःचा स्वतंत्र गट निर्माण करू पाहत आहेत. शासकीय अधिकाऱ्यांच्या बदल्यांमध्ये ते दबाव आणतात. नांदेड जिल्ह्यात त्यांची मनमानी सुरू आहे. सगळ्यांना सोबत घेऊन चालण्याऐवजी ते महायुतीत मिठाचा खडा टाकण्याचा प्रयत्न करत असल्याची टीका पाटील यांनी केली होती. एवढेच नाही तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडेही आपण अशोक चव्हाण यांची तक्रार केल्याचे हेमंत पाटील यांनी सांगितले होते.
नांदेड उत्तरचे शिवसेना आमदार बालाजी कल्याणकर यांनीही अशोक चव्हाण विरोधात सूर आळवला होता. थेट टीका न करता विधानसभा निवडणुकीत भाजपाच्या जुन्या लोकांनी आपले काम केले, पण नव्याने आलेल्या लोकांनी विरोधात काम केले, पैसे वाटले असा आरोप केला होता. तर राष्ट्रवादीचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनीही आपल्या पारंपारिक विरोधक असलेल्या अशोक चव्हाण यांना खुमखुमी असेल तर स्वबळावर लढा, आम्हीही तयार आहोत, अशा शब्दात आव्हान दिले होते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.