

भाजपमध्ये वाढलेल्या इनकमिंगमुळे जुन्या निष्ठावंत कार्यकर्त्यांमध्ये तीव्र नाराजी आहे.
महापालिका निवडणुकीत उमेदवारी नाकारल्याने भाजपमध्ये अंतर्गत असंतोष उफाळून आला आहे.
काही नाराज कार्यकर्त्यांनी थेट तिकीटासाठी आर्थिक व्यवहाराचे गंभीर आरोप केले आहेत.
Nanded News : भाजपमध्ये वाढलेली इनकमिंगची संख्या, नेत्यांच्या पाठोपाठ त्यांच्या जुन्या पक्षातील पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा ऐन निवडणुकीच्या तोंडावर होणारे प्रवेश यामुळे भाजपच्या निष्ठावंतामध्ये कमालीची नाराजी असल्याचे समोर येत आहे. पक्ष शिस्तीच्या नावाखाली लोकसभा, विधानसभा, नगरपालिका, नगरपंचायत निवडणुकीत शांत असलेल्या भाजपच्या निष्ठावंतांना महापालिकेत उमेदवारी नाकारल्यानंतर मात्र जागोजागी त्यांच्या संतापाचा उद्रेक होताना दिसत आहे.
छत्रपती संभाजीनगरमधील राडा अजूनही पूर्णपणे शमलेला नाही. तोच नांदेडमध्येही भाजपमधील डावलले गेल्यानंतर इच्छुकांनी उघडपणे जिल्ह्याचे नेते आणि खासदार अशोक चव्हाण यांच्याविरोधात रोष व्यक्त करताना दिसत आहेत. नांदेड जिल्ह्यात भाजपने मित्र पक्षांना खड्यासारखे बाजूला सारत स्वबळावर निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला. अर्थात अशोक चव्हाण यांचा हा निर्णय होता, असे बोलले जाते.
नगरपालिका, नगरपंचायत निवडणुकीत जिल्ह्यात बऱ्यापैकी यश मिळाल्यानंतर सहाजिकच महापालिका निवडणुकीची सगळी सुत्रंही अशोक चव्हाण यांच्याच हाती आली. दोन वेळा मुख्यमंत्री, दोनदा खासदार, राज्यात मंत्री राहिलेल्या अशोक चव्हाण यांचा दांडगा राजकीय अनुभव आहे. नांदेड जिल्ह्यातील राजकारण, इथली सामाजिक परिस्थिती ते चांगली ओळखून आहेत. त्यामुळे निवडणुकीत कोणती रणनिती आखायची हे चव्हाण यांना ठाऊक आहे.
या आपल्या राजकीय अनुभवातूनच त्यांनी नांदेड-वाघाळा महापालिका स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला. काँग्रेसच्या माजी नगरसेवकांना एमआयएममध्ये पाठवून मुस्लिम मंताचे विभाजन करण्याचा त्यांचा पहिला डाव असल्याचे बोलले गेले. त्यानंतर तिकीट वाटपात आपल्या बहुतांश समर्थक आणि पक्ष सोडतांना सोबत आलेल्यांची वर्णी लावण्यात अशोक चव्हाण यशस्वी ठरले. अर्थात हे करताना त्यांना भाजपमधील काही निष्ठावंताची तकीटे कापावी लागली, हे सध्या नांदेडमध्ये असलेल्या रोषावरून स्पष्ट होते.
अगदी ज्यांच्या घरात अशोक चव्हाण आणि कुटुंबियांचे फोटो लावून पुजा केली जात होती, अशा काही समर्थकांनाही जागा वाटपाचा फटका बसला. अखेर त्यांना एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचा सहारा घ्यावा लागला. उमेदवारी न मिळालेल्या काही नाराजांनी तर अशोक चव्हाण यांच्यावर थेट तिकीटासाठी त्यांनी पन्नास लाख रुपये घेतल्याचा आरोप केला. माजी नगरसेवक व चव्हाणांचे विश्वासू सहकारी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भानुसिंह रावत यांनीच हे आरोप केले. आपल्या मुलासाठी त्यांनी उमेदवारी मागितली होती.
दुसरीकडे तिकीट कापले गेल्याने महिला आघाडीच्या प्रदेश सचिव महादेवी मटपती यांनीही अश्रू ढाळत अशोक चव्हाण यांनीच आपली उमेदवारी कापल्याचा आरोप केला. लग्न एकासोबत करायचं आणि मार्केटमध्ये दुसऱ्या नवऱ्या सोबत फिरायचं का? असा संतप्त सवाल त्यांनी केला. पैशाचा विजय आणि आमचा पराभव झाला असे म्हणत त्यांनी पैसे घेऊन मटक्यावाल्याला उमेदवारी दिल्याचा आरोप केला.
1. भाजपमध्ये नाराजी का वाढली आहे?
उमेदवारी वाटपात जुन्या निष्ठावंतांना डावलल्यामुळे नाराजी वाढली आहे.
2. नाराज कार्यकर्त्यांनी कोणते आरोप केले आहेत?
काहींनी तिकीटासाठी आर्थिक व्यवहार झाल्याचे आरोप केले आहेत.
3. ही नाराजी कोणत्या निवडणुकीत दिसत आहे?
मुख्यतः महापालिका निवडणुकांमध्ये ही नाराजी समोर येत आहे.
4. भाजपच्या इनकमिंगचा परिणाम काय झाला?
नवीन प्रवेशांमुळे जुन्या कार्यकर्त्यांना उमेदवारी नाकारली गेल्याचा आरोप आहे.
5. या वादाचा निवडणुकीवर परिणाम होईल का?
अंतर्गत असंतोष वाढल्यास भाजपच्या निवडणूक कामगिरीवर परिणाम होऊ शकतो.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.