धनंजय मुंडे यांनी कमबॅकसाठी ‘बंजारा कार्ड’ खेळले असून ते चर्चेत आले आहेत.
मात्र, त्यांच्या एका विधानाने बीडच्या राजकारणात नवा वाद निर्माण झाला आहे.
या घडामोडीमुळे बीडच्या राजकीय समीकरणात अनपेक्षित ट्विस्ट आला आहे.
Banajara Community News : इतर समाजाला हैदराबाद गॅझेट प्रमाणे सवलती मिळत असतील तर बंजारा समाजालाही त्या मिळाल्या पाहिजे, अशी भूमिका घेत माजी मंत्री आमदार धनंजय मुंडे यांनी काल बीडच्या मोर्चामध्ये बंजारा समाजाच्या लढ्यात आपण शेवटपर्यंत राहू, असा शब्द दिला. बंजारा समाजाच्या व्यासपीठावरून धनंजय मुंडे यांनी केलेले भाषण, त्यांची आक्रमक देहबोली पाहता गेल्या वर्ष- दीड वर्षात जे राजकीय नुकसान झाले ते भरून काढण्याची संधी या निमित्ताने त्यांना मिळाली,असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.
बीडच्या (Beed News) मोर्चात केलेल्या दहा-पंधरा मिनिटाच्या भाषणात धनंजय मुंडे यांनी बंजारा समाजाला हैदराबाद गॅझेट मधील नोंदणी नुसार आदिवासींना मिळणारे एसटी प्रवर्गाचे आरक्षण लागू करण्यासाठीच्या लढ्यात आपण कसा सहभाग देऊ शकतो हे ठामपणे सांगण्याचा प्रयत्न केला. दिवंगत लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या आक्रमक भाषण शैलीची झलक धनंजय मुंडे यांच्या दिसून येते. वेळोवेळी त्यांनी आपल्या भाषणातून समाजाच्या मागण्यांना सरकार दरबारी ठेवून अपेक्षित परिणाम साध्य केल्याची अनेक उदाहरणे आहेत.
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांचे विश्वासू सहकारी वाल्मिक कराड याचा हात असल्याचे निष्पन्न झाले तेव्हापासून धनंजय मुंडे यांच्या राजकीय कारकीर्दीला उतरती कळा लागली. कृषी मंत्री असताना खात्यात झालेल्या साहित्य व औषध खरेदीतील घोटाळा, जिल्हा नियोजन समितीतील निधीचा गैरवापर, करुणा मुंडे यांच्याकडून न्यायालयात दाखल कौटुंबिक हिंसाचाराच्या प्रकरणात बसलेला दणका या सगळ्या संकटांच्या मालिकेत धनंजय मुंडे यांना आपले मंत्रिपद गमवावे लागले.
अडचणीत सापडलेल्या धनंजय मुंडे यांना खिंडीत गाठण्याची संधी त्यांच्या जिल्ह्यातील पक्षांतर्गत आणि इतर विरोधकांनी हेरली. त्यामुळे चोहोबाजूंनी कोंडी झालेल्या मुंडे यांना हैदराबाद गॅझेटच्या रूपाने राजकारणातील आपली गेलेली पत पुन्हा निर्माण करण्याची संधी चालून आली आहे. मराठा आरक्षणावरून झालेल्या मराठा विरुद्ध ओबीसी या संघर्षाचा फटका लोकसभा निवडणुकीत पंकजा मुंडे यांना बसला. विधानसभेला परळीतून धनंजय मुंडे निवडून आले असले तरी त्यांना देखील या वादाचा सामना करावा लागला.
सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर मात्र धनंजय मुंडे कमालीचे अडचणीत आले. काही महिने राजकारणापासून दूर राहणाऱ्या धनूभाऊंना प्रकृतीनेही त्रास दिला. या त्रासातून बाहेर येत असताना आता नव्या दमाने राजकारणात पुन्हा जम बसवण्याच्या हालचाली मुंडे यांनी सुरू केल्या आहेत. मराठा आरक्षण आंदोलन मनोज जरांगे पाटील यांनी हैदराबाद गॅझेटमधील नोंदणीनुसार मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र आणि त्या आधारे ओबीसीतील सवलती मिळाव्यात यासाठी लढा उभारला. मुंबईच्या आझाद मैदानात बेमुदत उपोषणाने सरकारला शरण यायला भाग पाडले.
सरकार संकटात, पण मुंडेंना संधी?
या आंदोलनानंतर सरकारने हैदराबाद गॅझेट लागू करण्याचा निर्णय घेत त्याचा जीआरही काढला. यातून मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागल्याचा आनंद सरकारला मिळतो ना मिळतो तोच याच हैदराबाद गॅझेटचा आधार घेत मराठवाड्यातील बंजारा, महादेव कोळी समाजाने आदिवासींना मिळत असलेले एसटी प्रवर्गाचे आरक्षण मिळावे यासाठी रस्त्यावरची लढाई सुरू केली. बीड जिल्हा हा वंजारी आणि बंजारा बहुल जिल्हा आहे. हे दोन्ही समाज स्वतंत्र असले तरी त्यांच्यात सालोख्याचे संबंध आहेत. दिवंगत गोपीनाथ मुंडे यांना मानणारा बंजारा समाज आजही मुंडे कुटुंबाच्या पाठीशी उभा आहे.
जिल्ह्याच्या राजकारणात प्रभाव टाकणारा बंजारा आणि वंजारा समाज मुंडे कुटुंबाच्या राजकारणातला एक महत्त्वाचा घटक समजला जातो. एसटी प्रवर्गातील आरक्षणासाठी बंजारा समाज लढा देण्याच्या तयारीत असताना धनंजय मुंडे यांनी त्यात उडी घेत आपण शेवटपर्यंत हा लढा लढू आणि जिंकू असा आत्मविश्वास त्यांनी बंजारा समाजाच्या व्यासपीठावरून देण्याचा प्रयत्न केला. अगदी बंजारा समाजाच्या बोली भाषेत आवाहन करताना सरकारला अंगावर घेण्याची तयारीही मुंडे यांनी आपल्या भाषणातून दाखवली. उपस्थित बंजारा समाजाच्या लोकांनीही मुंडे यांच्या भाषणाला सकारात्मक प्रतिसाद दिला.
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून ओबीसी विरुद्ध मराठा असा संघर्ष सुरू असतानाच हैदराबाद गॅझेटच्या नोंदीनुसार आदिवासींना मिळणारे एसटी प्रवर्गाचे आरक्षण मिळवण्यासाठी सुरू झालेल्या बंजारा समाजाच्या आंदोलनाने राज्य सरकारची डोकेदुखी वाढली आहे. धनंजय मुंडे यांना मात्र याच संकटात कमबॅकची संधी दिसू लागली आहे. बीड जिल्ह्यात राजकीय वर्चस्व नव्याने निर्माण करायचे असेल तर वंजारा-बंजारा हा हक्काचा समाज तर सोबत असायलाच हवा त्याचबरोबर ओबीसींच्या लढ्यालाही धनंजय मुंडे पाठिंबा देऊन आपले बुडतं असलेले राजकीय करियर सावरताना दिसत आहेत.
आम्ही भटके..
बंजारा समाजाने बीडमध्ये काढलेल्या कालच्या मोर्चात सहभागी होत धनंजय मुंडे यांनी या लढ्यात महत्त्वाची भूमिका बजावण्याचे निश्चित केले आहे. परंतु त्यांच्या या प्रयत्नांना एका विधानाने काही प्रमाणात धक्का बसला आहे. भावनेच्या भरात वंजारी आणि बंजारा एकच असल्याचे ते व्यासपीठावरून बोलून गेले. त्यावरून सभेच्या एका कोपऱ्यात तरुणांनी जोरदार घोषणाबाजी करत वंजारी वंजारा एक नाही, विधान मागे घ्या अशी घोषणाबाजी केली.
या वादावर आम्ही भटके आहोत, माझ्या विधानाचा चुकीचा अर्थ काढला गेला. लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्यावर आणि आमच्यावरही बंजारा समाजाने कायम प्रेम केले आहे या प्रेमातूनच मी वंजारा बंजारा एकच असल्याचे विधान केले त्याचा अर्थ आरक्षण किंवा सवलतीशी ज्यांनी जोडला त्यांचा नेमका हेतू काय हे मला सांगता येणार नाही घोषणा देणारे कोण होते याचाही शोध घेतला गेला पाहिजे असे म्हणत या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला.
बंजारा समाज आपल्या मागण्यांसाठी आक्रमक झाला आहे 17 सप्टेंबर पर्यंत निर्णय घ्या अन्यथा मुंबईत येऊ असा इशारा काल बीड आणि जालनाच्या मोर्चा मधून सरकारला देण्यात आला आहे. सरकारने मात्र अद्याप प यासंदर्भात आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही किंवा त्यावर कुठलेही मत व्यक्त केले नाही त्यामुळे बंजारा समाजाच्या आंदोलनाकडे सरकार वेट अँड वॉच च्या नजरेतून पाहत आहे असे दिसते. मराठा आरक्षणाप्रमाणे बंजारा समाजाने मुंबईकडे कुच केली तर धनंजय मुंडे यांच्यासाठी ही दुसरी संधी असेल अर्थात त्यासाठी वंजारा आणि बंजारा एकच असल्याच्या त्यांच्या विधानावरून उठलेले वादळ शांत होणे महत्त्वाचे आहे.
प्रश्न 1: धनंजय मुंडेंनी कोणते ‘कार्ड’ खेळले?
👉 त्यांनी ‘बंजारा कार्ड’ खेळून राजकारणात कमबॅक करण्याचा प्रयत्न केला.
प्रश्न 2: वाद का निर्माण झाला?
👉 त्यांच्या एका विधानामुळे समाजात व राजकारणात वाद निर्माण झाला.
प्रश्न 3: या घडामोडींचा बीडच्या राजकारणावर काय परिणाम झाला?
👉 बीडमध्ये नवीन ट्विस्ट आला आणि राजकीय समीकरणे बदलली.
प्रश्न 4: विरोधकांनी कशी प्रतिक्रिया दिली?
👉 विरोधकांनी मुंडेंच्या विधानावर तीव्र टीका केली.
प्रश्न 5: या वादामुळे मुंडेंचा कमबॅक अडथळ्यात येईल का?
👉 अशी शक्यता व्यक्त केली जात असून आगामी काळ निर्णायक ठरणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.