
Latur District Bank News : विधानसभा निवडणुकीत लातूर ग्रामीण मतदारसंघातून पराभव झाल्यानंतर माजी आमदार धीरज देशमुख आता पूर्ण वेळ जिल्हा बँकेच्या कारभारात रमले आहेत. काका माजी मंत्री दिलापराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली बँकेचे अध्यक्ष असलेल्या धीरज देशमुख यांनी वार्षिक उलाढाल दहा हजार कोटींवर नेण्याचा संकल्प केला आहे.
2024 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या निकालाने लातूर (Latur) जिल्ह्याचे चित्रच बदलले. लातूर शहर आणि ग्रामीण या दोन मतदारसंघावर गेल्या अनेक वर्षांपासून आपली पकड राखून असलेल्या काँग्रेसच्या देशमुख बंधुंना यावेळी धक्का बसला. लातूर शहर मतदारसंघातून अमित देशमुख कसबसे निवडून आले, पण धीरज देशमुख यांची लातूर ग्रामीणमध्ये मात्र विकेट पडलीच. भाजपाने हा मतदारसंघ आपल्याकडे खेचून आणला.
विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर धीरज देशमुख (Dhiraj Dehsmukh) यांनी आता आपले सगळे लक्ष लातूर जिल्हा सहकारी बँकेच्या कारभारावर केंद्रीत केले आहे. अध्यक्ष असलेल्या धीरज यांनी येत्या आर्थिक वर्षात बँकेची वाटचाल कशी असेल याबद्दलची भूमिका पत्रकारांशी संवाद साधताना स्पष्ट केली. काटेकोर नियोजन आणि पारदर्शकता यामुळे लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची मार्च 2025 अखेर तब्बल 8 हजार 139.36 कोटी रुपयांची आर्थिक उलाढाल झाली आहे.
बँकेचे उद्दिष्ट आता दृष्टिक्षेपात असून, येत्या काळात जिल्हा बँक 10 हजार कोटी रुपयांच्या व्यवसायाच्या उद्दिष्टाकडे यशस्वीपणे वाटचाल करेल, असा धीरज देशमुख यांनी व्यक्त केला. माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर, माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख, शिवाजीराव पाटील निलंगेकर यांचे विचार समोर ठेवून बँक कार्यरत आहे. 1984 मध्ये 1 कोटी 31 लाख रुपयांचे भागभांडवल असलेल्या लातूर जिल्हा बँकेची वाटचाल आता 10 हजार कोटी रुपयांच्या व्यवसायाकडे होताना दिसत आहे.
लातूर जिल्हा बँकेच्या नवीन संचालक मंडळाच्या कार्यकाळात बँकेचे भाग भांडवल 116.91 कोटींवरून 184.19 कोटी रुपयांवर पोचले आहे. मार्चअखेर बँकेने 113.87 कोटी रुपयांचा ढोबळ नफा तर 73.15 कोटी रुपयांचा निव्वळ नफा कमावला आहे. विशेष म्हणजे, लातूर जिल्हा बँक ढोबळ नफ्याच्या टक्केवारीत राज्यात अग्रेसर असल्याचे देशमुख यांनी सांगितले. बँकेने 3 ते 5 लाख रुपयांपर्यंतची बिनव्याजी कर्जवाटप योजना यशस्वीरित्या चालवली आहे. गेल्या आठ वर्षांत 80 हजार 786 शेतकर्यांना याचा लाभ झाला. या शेतकऱ्यांचा व्याज परताव्याचा लाभ बँकेने स्वनिधीतून दिला आहे.
या आर्थिक वर्षात बँकेने 89 टक्के वसुली केली असून जून २०२५ अखेर यात आणखी सुधारणा होऊन चांगली वसुली होईल. वेळेत कर्ज परतफेड न केलेल्या शेतकऱ्यांसाठी 11 टक्के व्याजावर ५ टक्के व्याज माफीची योजना 30 जून 2025 पर्यंत लागू करण्यात आली आहे. बँकेने शैक्षणिक कर्ज योजनेत नवीन अभ्यासक्रमांचा समावेश करून आणि कर्जाची मर्यादा वाढवून मागील 3 वर्षांत 13 कोटी रुपयांचे कर्ज वाटप केले आहे. यासोबतच, ऊसतोडणी यंत्र वाटप आणि रेशीम शेती योजनेतून रोजगार निर्मितीला चालना दिली आहे. महिला बचत गटांना अल्पदरात 100 ते 125 कोटी रुपयांचे कर्ज वाटप करु, असेही धीरज देशमुख म्हणाले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.