Maratha Reservation : मुंबईच्या आझाद मैदानात मराठा आरक्षणाची लढाई जिंकल्यानंतर राज्यभरात मराठा समाजाने गुलाल उधळत आनंदोत्सव साजरा केला. हैदराबाद गॅझेट, सातारा गॅझेटसह मनोज जरांगे पाटील यांनी केलेल्या बहुतांश मागण्या मान्य करत सरकारने त्याचा जीआरच काढला. या जीआरचे प्रत्येक जण आपापल्या परीने विश्लेषण करताना दिसत आहे. सरकारच्या जीआरने ओबीसी आरक्षण संपुष्टात येणार असल्याचा आरोप ओबीसी नेते करत आहेत. तर या जीआरचा काहीच उपयोग होणार नाही, अशी टीका काही जणांकडून केली जात आहे.
या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगर येथे उपचार घेत असलेले मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी पुन्हा एकदा समाज बाधंवांना आवाहन केले. लोकांचे ऐकून गैरसमज करून घेऊ नका, सगळे मराठे ओबीसी आरक्षणात जाणारच, असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला. हैदराबाद गॅझेटच्या नोंदी लक्षात घेऊन मराठा समाज ओबीसीत जाणार आहे. अफवांकडे दुर्लक्ष करा, असा सल्लाही जरांगे पाटील यांनी दिला आहे.
मराठ्यांनी जीवाची बाजी लावली. या लढ्याला जे यश मिळालं ते सगळं यश माझ्या मराठा बांधवाचं आहे, मी मात्र नाममात्र आहे.आपल्या लढ्याला यश मिळाले आहे, आता यावरून गैरसमज, अफवा पसरवण्याचे प्रयत्न केले जाणारच. (Maratha Reservation) पण मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रातले सगळे मराठे आरक्षणात जाणार म्हणजे जाणार, त्यात तिळमात्रही शंका कोणी घेऊ नका.
ज्यांच्या नोंदी नाहीत, म्हणून तर गॅझेटिअर लागू करायचे आहे. त्याचा जीआर निघणे खूप आवश्यक होते, असेही जरांगे पाटील यांनी स्पष्ट केले. स्वांतत्र्यापासून हक्काचे गॅझेटियर असूनही सरकारने याबद्दल एक ओळही लिहिली नव्हती. आता समाजाने संयम ठेवावा, कोण्याही विदुषकाचे, अविचारी माणसाचे ऐकू नका, संयम, विश्वास ढळू देऊ नका, असे आवाहनही जरांगे पाटील यांनी यावेळी केले.
ज्यांना आरक्षणाच्या मुद्यावरून राजकारण करायचे होते, त्यांना या निर्णयामुळे पोटदुखी होणारच. माझा कोणताही निर्णय मान्य केल्यावर, सुरूवातील मराठा समाजाला वाटते की जरांगे पाटलाने हे करायला नको होतं. मात्र नंतर ते सगळ्यांना मान्य होते. मी काय करतो ते समजून घ्या. मराठवाड्यातील एकही मराठा आरक्षणावाचून राहणार नाही हे डोक्यात ठेवा आणि आनंदी रहा. काही लोकांचे ऐकून गैरसमज करुन घेऊ नका, त्याने आपले भले होणार नाही, असेही जरांगे म्हणाले.
माझ्यावरील विश्वास ढळू देऊ नका..
गरीब मराठ्यांच्या मनात काही शंका असेल तर ती काढून टाका. मी तुमचं, समाजाचं वाटोळं कधीही होऊ देणार नाही. मला तुमच्यापासून तोडण्याचा, दरी निर्माण करण्याचा प्रयत्न काही लोक करत आहेत. मी तुमच्या पासून दूर झालो की वाटोळ होईल, हा त्यांचा उद्देश आहे. त्यामुळे कोणावरही विश्वास ठेवू नका आणि माझ्यावर असलेला तुमचा विश्वास ढळू देऊ नका, असे आवाहन देखील मनोज जरांगे पाटील यांनी केले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.