
शिवाजी चोथे यांचा पक्षप्रवेश – जवळपास ४० वर्षे शिवसेनेत राहिल्यानंतर माजी आमदार शिवाजी चोथे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.
अजित पवारांचा अप्रत्यक्ष टोला – “मला तिकिट मागायला दिल्लीला जावं लागत नाही,” या विधानातून अजित पवारांनी माजी मंत्री राजेश टोपेंना अप्रत्यक्ष इशारा दिल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे.
स्थानिक राजकारणातील नवी समीकरणं – चोथे यांचा खरा उद्देश पुत्र विनायक चोथे यांना जिल्हा पातळीवर पुढे आणण्याचा असल्याचे संकेत असून, यामुळे टोपे यांच्या पुढील राजकीय डावपेचांवर सर्वांचे लक्ष आहे.
Jalna,19 September : माजी आमदार शिवाजी चोथे यांनी शिवसेनेला ‘जय महाराष्ट्र’ करत नुकतेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. त्या पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री पवार यांनी केलेले विधान जालना जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात विशेष चर्चिले जात आहे. ‘मला तिकिट मागायला दिल्लीला जावं लागत नाही,’ हा टोला त्यांनी माजी मंत्री राजेश टोपे यांना लगावल्याचे मानले जात आहे.
जालना जिल्ह्यातील पूर्वीच्या अंबड आाणि आताच्या घनसांगवी मतदारसंघात नेते शिवाजी चोथे (Shivaji Chothe) यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. शिवाजी चोथे हे जवळपास चार दशके शिवसेनेते होते. ते १९९५ मध्ये विधानसभेवर निवडून आले होते. त्यावेळी त्यांनी काँग्रेसचे उमेदवार विलास खरात यांचा पराभव केला होता. पण, त्यानंतरच्या निवडणुकांमध्ये त्यांचा आलेख खाली आला. विशेषतः राजेश टोपे यांच्या समोर ते दोन वेळा पराभूत झाले. टोपे हे अंबड आणि नंतर घनसांगवी मतदारसंघातून सलग पाच वेळा निवडून आले आहेत. मात्र, २०२४ मध्ये त्यांचा पराभव झाला.
राजेश टोपे हे शरद पवार-सुप्रिया सुळे यांचे जवळचे मानले जातात. राष्ट्रवादी काँग्रेसच्या फाटाफुटीनंतर सत्तेत असलेल्या अजित पवार (Ajit Pawar) यांची निवड करायची टोपेंकडे संधी होती. अनेक कार्यकर्तेही त्याच बाजूने होते. पण, टोपे यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याशी निष्ठा ठेवून त्यांच्यासोबत राहण्याचा निर्णय घेतला.
माजी मंत्री राजेश टोपेंच्या विरोधात शिवाजी चोथे यांना बळ देण्याचा अजित पवारांचा प्लॅन आहे, अशी चर्चा सुरु आहे. शिवाजी चोथे यांच्या पक्षप्रवेशावेळी अजित पवार यांनी, ‘चोथे यांच्याबरोबर आलेल्यांना वाटेल की या तालुक्यातून पुन्हा कुणी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आला तर त्यांचे काय होईल? असं वाटू देऊ नका. मला तिकिट मागायला दिल्लीला जावं लागत नाही,’ असे स्पष्ट केले होते.
अजितदादांचा हा राजेश टोपेंना इशारा होता, असा दावा अनेक राजकीय निरीक्षक करत आहेत. टोपेंच्या विरोधकांचं तर स्पष्ट मत आहे की, अजित पवारांना आता टोपेंचा पर्याय शिवाजी चोथे यांच्या रूपाने सापडला आहे. पण, यात चोथे यांच्याविषयी विशेष प्रेम नसून टोपेंच्या विरोधातील भावना अधिक आहे, असेही सांगितले जाते.
दरम्यान, घनसावंगी विधानसभा मतदारसंघात भाजप आणि काँग्रेस हे राष्ट्रीय पक्ष असले तरी, त्यांच्याविषयी फारशी चर्चा नाही. टोपे हे अजूनही शरद पवार यांच्याशी प्रामाणिक आहेत, पण त्यामुळेच ते सत्तेपासून दूर राहिले आहेत. त्याचा आनंद त्यांच्या विरोधकांना आहे. अगदी अजित पवार गटातील काही मंडळींनाही आहे.
शिवाजी चोथेंनी अजित पवार यांचं नेतृत्व स्वीकारलं असलं तरी, त्यांनी स्वतः विधानसभेची निवडणूक लढविण्याची इच्छा स्पष्टपणे बोलून दाखवलेली नाही. पद किंवा जिल्हा परिषद निवडणूकही त्यांच्यासाठी प्राथमिक वाटत नाही. मात्र, राजकीय सूत्रांच्या मते, त्यांचा खरा उद्देश आपला पुत्र विनायक चोथे याला जिल्हा पातळीवर पुढे आणणं. जिल्हा परिषद निवडणुकीतून विनायक चोथे यांना पुढे आणण्याची शक्यता आहे.
अजित पवार यांचं ‘तिकिट मागायला दिल्लीला जावं लागत नाही’ हे वाक्य सत्तेचं प्रतिकही आणि विरोधकांना इशारा मानला जात आहे. यातून स्थानिक राजकारणात नवे वळण लागण्याची चिन्हं आहेत, विशेषतः राजेश टोपेंसाठी. आता पुढील काळात चोथे कुटुंबीय काय भूमिका घेतात, विनायक चोथे किती प्रभावी ठरतात आणि टोपेंचा पुढचा डाव काय असेल, हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.
प्र.1: शिवाजी चोथे कोणत्या पक्षात दाखल झाले?
उ. – अजित पवार गटातील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये.
प्र.2: अजित पवारांचे ‘दिल्लीला जावं लागत नाही’ हे विधान कोणाला उद्देशून होते?
उ. – माजी मंत्री राजेश टोपेंना अप्रत्यक्ष टोला असल्याची चर्चा आहे.
प्र.3: चोथे यांचा मुख्य राजकीय उद्देश काय मानला जातो?
उ. – पुत्र विनायक चोथे यांना जिल्हा परिषदेसारख्या स्थानिक निवडणुकीत पुढे आणणे.
प्र.4: राजेश टोपे सध्या कोणत्या गटाशी निष्ठावान आहेत?
उ. – शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस गटाशी.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.