.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
छत्रपती संभाजीनगर : मंत्रीपद न मिळाल्याने नाराज असलेल्या माजीमंत्री अब्दुल सत्तार यांनी शिवसेनेचे नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचा विश्वास गमावलायं का? अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी आणि त्यानंतर एकनाथ शिंदेंच्या युती सरकारमध्ये अब्दुल सत्तार यांना मंत्रीपद मिळाले होते. ठाकरेंच्या मंत्रीमंडळात राज्यमंत्री असलेल्या सत्तारांना एकनाथ शिंदे यांनी बढती देत कॅबिनेट मंत्री करत कृषी सारखे महत्वाचे खाते दिले.
पण कायम वाद ओढावून घेणाऱ्या सत्तारांकडून कालांतराने कृषीखाते काढून घेत त्यांच्यावर अल्पसंख्यांक विकास, वक्फ आणि पणन खात्याचा पदभार सोपवण्यात आला होता. अर्थात एकनाथ शिंदे यांचा सत्तार (Abdul Sattar) यांच्यावर विश्वास असल्यामुळे अनेक संकट आली, सत्तारांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी आंदोलने झाली तरीही शिंदे त्यांच्या पाठीशी 'चट्टान'बनून उभे राहिले होते. पण कायम दबावतंत्राचा अवलंब करत पाहिजे ते पदरात पाडून घेण्याची सवय जडलेल्या सत्तारांचा खेळ देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर मात्र फसला.
नव्या मंत्रीमंडळात सत्तार नको, अशी भूमिका शिवसेनेसह भाजपने घेतली आणि अब्दुल सत्तारंच्या नावावर शिंदेंनी फुली मारली. अडीच वर्षांनी तुमचा विचार केला जाईल, असे आश्वासन दिल्यावरही सत्तार यांचा मूळ स्वभाव उफाळून आलाच. वाढदिवसाचे निमित्त करत छत्रपती संभाजीनगरात सत्तारांनी केलेले शक्तीप्रदर्शन, त्यातून शिवसेना, धनुष्यबाण, भगवा झेंडा आणि एवढेच नाही तर एकनाथ शिंदे यांचा फोटोही डावलण्याचे धाडस सत्तारांनी केले.
सर्व पक्षात आपली कशी चलती आहे, हे दाखवत जिल्ह्याची सुत्रे आपल्या हाती घेण्याचा सत्तार यांचा हा प्रयत्न यशस्वी ठरला की फसला? हे येत्या काही दिवसात दिसेल. सत्तार यांच्याऐवजी मंत्रीमंडळात स्थान मिळालेल्या संजय शिरसाट यांच्याविरोधात उघडपणे घेतलेली भूमिका, अडीच वर्षात राजकारणात काहीही होऊ शकते, अशी जाहीर धमकी यामुळे सत्तार प्रकाशझोतात तर आले, पण त्यांनी पक्षाचे नेते एकनाथ शिंदे यांचा विश्वास मात्र गमवालायं, अशी चर्चा सुरू झाली आहे.
शिंदे, फडणवीस यांचा जोपर्यंत माझ्यावर विश्वास आहे, तोपर्यंत मी कुठेही जाणार नाही, असे सांगत सत्तार दोन्ही डगरीवर हात ठेवू पाहत आहेत. पण दुसरीकडे पक्ष आणि पक्षाच्या नेत्यांना डावलून स्वतंत्रपणे शक्तीप्रदर्शन करत सत्तार यांनीच शिंदेचा विश्वास गमावला, असे म्हणावे लागेल. सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांनी अब्दुल सत्तार यांनी विधानसभा निवडणुकीत आमदार रमेश बोरणारे, संजना जाधव व माझ्याविरोधात काम केल्याचा आरोप करत सत्तारांच्या अडचणीत भर टाकली आहे.
सत्तारांनी वाढदिवसानिमित्त केलेले शक्तीप्रदर्शन आणि आपल्या पक्षाच्या मंत्र्याला दिलेला इशारा यांची दखल एकनाथ शिंदे यांनी घेतल्याची माहिती आहे. यापुढे अब्दुल सत्तार यांच्या प्रत्येक हालचालीवर शिंदेंचा वाॅच असणार आहे, असे बोलले जाते. आगामी महापालिका, जिल्हा परिषद व इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत जिल्ह्याची धुरा आपल्या खांद्यावर असावी, यासाठी सत्तारांचे प्रयत्न सुरू आहेत. तर त्याला संजय शिरसाट यांच्याकडून छेद दिला जात आहे. सत्तार-शिरसाट यांच्या संघर्षामुळे पालकमंत्रीपदाची संधी पुन्हा हुकते की काय? अशी भिती शिरसाट समर्थकांना वाटू लागली आहे.
शिरसाट पालकमंत्री होऊ नये यासाठी सत्तार आपली शक्तीपणाला लावत आहेत, तर भाजपनेही दावा केल्यामुळे शिंदे नेमका काय निर्णय घेतात? याकडे सगळ्यांचे लक्ष असणार आहे. शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांच्यानंतर बऱ्याच वर्षांनी संदीपान भुमरे यांच्या रुपाने छत्रपती संभाजीनगरला स्थानिक पालकमंत्री लाभला होता. भुमरे लोकसभेवर निवडून गेल्यानंतर महिनाभरासाठी ही जबाबदारी अब्दुल सत्तार यांनी सांभाळली. आता संजय शिरसाट यांना ही जबाबदारी मिळाली तर मुंबईहून पालकमंत्री पाठवण्याची परंपरा खंडित होईल. पण त्यासाठी सत्तारांचा अडसर शिरसाट यांना दूर करावा लागणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.