AIMIM News : लोकसभा आणि त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत नशिब आजमावल्यानंतरही पदरी अपयश आलेल्या एमआयएमचे माजी खासदार इम्तियाज जलील यांच सध्या काय चाललंय? याची अनेकांना उत्सूकता लागली आहे. 2019 मध्ये लोकसभा निवडणुकीत छत्रपती संभाजीनगरमधून विजयी झालेल्या इम्तियाज जलील यांची देशभरात चर्चा झाली होती. पाच वर्ष मतदारसंघातील प्रश्न सभागृहात आक्रमकपणे मांडत त्यांना हा काळ चांगलाच गाजवला होता.
परंतु दुसऱ्यांदा लोकसभेत एन्ट्री करण्याचे त्यांचे स्वप्न भंगले. दिल्लीवारी हुकल्यानंतर इम्तियाज (Imtiaz Jaleel) यांनी पुन्हा विधानसभेची निवडणूक लढवली, पण तिथेही त्यांचे नशिब सतराशे मतांनी कमी पडले. सलग दोन पराभवानंतर इम्तियाज जलील राजकारणात सक्रीय राहणार का? काय करणार? अशा चर्चा झाल्या. पण राजकारणात व्यस्त असतांना जो वेळ त्यांना मतदारसंघातील नागरीक, मित्रमंडळी, आप्तेष्ठ, नातावाईक, सामाजिक संस्था, कुटुंबाला देता येत नव्हता आता तो ते कारणी लावत आहेत.
एमआयएम (AIMIM) पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष असलेल्या इम्तियाज जलील यांच्यावर विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर लगेचच दिल्ली विधानसभा निवडणुकीतील ओखला आणि मुस्तफाबाद या दोन मतदारसंघातील प्रचाराची जबाबदारी सोपवण्यात आली होती. महिनाभर दिल्ली दौरे झाल्यानंतर आणि विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर आता इम्तियाज जलील संभाजीनगरात परतले आहेत. आगामी महापालिका, जिल्हा परिषदेसह स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीची तयारी ते सुरू करणार असले तरी त्याला अजून अवकाश आहे.
त्यामुळे सध्या मिळत असलेला वेळ इम्तियाज जलील लग्न समारंभ, शालेय स्नेहसंमेलन, सामाजिक उपक्रम, प्रतिष्ठाणांची उद्घाटने, राजकीय आंदोलनात सहभाग नोंदवून घालवत आहेत. खासदार असतांना दिल्ली, हैदराबाद, मुंबईसह देशभरात दौऱ्यात व्यस्त असणारे इम्तियाज जलील आपल्या संपर्क कार्यालयात नियमितपणे नागरिकांच्या तक्रारी ऐकून घेतात. आमदार, खासदार आणि आता माजी झाल्यानंतरही त्यांचा हा शिरस्ता कायम आहे.
इम्तियाज जलील यांची तरुणाईमध्ये क्रेझ आहे. त्यामुळे एखादा कार्यकर्ता, पदाधिकारी किंवा सामान्य नागरीक आग्रहाने बोलावतो तेव्हा ते त्याच्याकडे जातात. छोटा उद्योग, व्यवसाय असो की मग फळाची गाडी तिथे जाऊन संबंधिताला शुभेच्छा देऊन त्याचा उत्साह वाढवण्यात इम्तियाज जलील मागे हटत नाहीत. आमदार, खासदार असताना कमी वेळ मिळायचा त्यामुळे इच्छा असूनही अनेकांकडे जाता येत नव्हते. आता ती अडचण नाही. सकाळपासून घराबाहेर पडतो ते आधीसारखा रात्री उशीराच घरी परततो.
माझ्यावर प्रेम करणाऱ्यांची संख्या दोन पराभवानंतरही कमी झालेली नाही. सत्तेवर असतांना लोकांच्या प्रश्नासाठी मी रस्त्यावर उतरायचो. मग ते आदर्शच्या ठेवीदारांना न्याय मिळवून देण्यासाठी असो, की सरपंच संतोष देशमुख, परभणीच्या सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबांना न्याय मिळवा यासाठीचे आंदोलन मोर्चा यात माझा सहभाग आहेच. लोकांचा विश्वास असल्यामुळेच आमदार, खासदार पद नसले तरी त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी मी पुर्वीसारखाच उपलब्ध असेन, अशी ग्वाही इम्तियाज जलील देतात.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.