Beed News : लोकसभा निवडणुका तोंडावर आल्या असल्याने सत्ताधारी व विरोधकांकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत. त्यामुळे राज्यातील वातावरण चांगलेच ढवळून निघाले असून, गेल्या काही दिवसांपासून एकमेकांवर केल्या जात असलेल्या टीकेमुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान दिले. त्यांनी संविधानातून हक्क दिले. संविधान बदलण्याचा अधिकार जगात कोणालाच नाही. जर कोणी संविधानाला नख लावायचा प्रयत्न केला तर आपण तुमच्या अगोदर रस्त्यावर उतरू, असा इशारा बीड लोकसभेच्या भाजप (Bjp) उमेदवार पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी दिला. (Pankaja Munde News)
बीड येथे शिव-फुले-आंबेडकर जयंतीनिमित्त गीतांच्या कार्यक्रमप्रसंगी त्या बोलत हॊत्या. माजी मंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या, 'छत्रपती शिवाजी महाराजांनी ही माती आपली आहे, ही धरती आपली आहे, याची त्यावेळी जाणीव करून दिली. परकीय आक्रमणाच्या विरोधात लढून स्वराज्य स्थापन करून, या मातीत स्वातंत्र्याचे बीजारोपण केले.
स्वातंत्र्य मिळाल्यानंतर या देशात राहणारा प्रत्येक माणूस कायद्याला समान आहे, हे तत्त्व देऊन देशाला सुंदर परिपूर्ण सहिष्णू संविधान डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिले. भगवा, पिवळा, नीळा, हिरवा सर्व झेंडे एक व्हावेत आणि त्याचा रंग पांढरा व्हावा, असे चित्र समाजात असावे, असेही पंकजा मुंडे म्हणाल्या.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
या वेळी भाजप जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांच्या संकल्पनेतून छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिराव फुले, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्ताने शिव-फुले-आंबेडकर यांच्या संयुक्तिक जयंती महोत्सवानिमित्त आनंद शिंदे यांची संगीत रजनी झाली.
या वेळी झालेल्या संगीत रजनी कार्यक्रमास महायुतीतील घटक पक्षांच्या नेतेमंडळींसह पदाधिकाऱ्यांची मोठी उपस्थिती होती.
(Edited By : Sachin Waghmare)
R