Marathwada News : लोकसभा निवडणुकीतील पराभवातून बाहेर पडत महायुतीने नांदेड जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीत जोरदार कमबॅक केले. नऊ जागा जिंकत महाविकास आघाडीला धोबीपछाड दिला.या धक्यातून महाविकास आघाडी अजूनही सावरताना दिसत नाहीये. आगामी महापालिका, जिल्हा परिषद व स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या दृष्टीने महायुतीने जिल्ह्यात जोरदार तयारी केली आहे. तर दुसरीकडे महाविकास आघाडीच्या गोटात शांतता आहे.
महायुतीतील (Mahayuti) भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस या तीनही पक्षात मोठ्या घडामोडी घडतांना दिसत आहेत. काँग्रेस, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार या आघाडीतील तीनही पक्षातून मोठ्या प्रमाणात आऊटगोईंग सुरू आहे. तर ते रोखण्याचे प्रयत्न मात्र आघाडीच्या स्थानिक नेत्यांकडून फारसे होताना दिसत नाहीत. महायुतीत मात्र ताकद वाढवण्यासाठी स्पर्धा सुरू आहे. पक्षप्रवेश सोहळे, बैठकांचा धडाका, मेळावे घेत राजकीय वातावरण तापवले जात आहे.
निवडणुका लढवायच्या असेल तर कार्यकर्त्यांना सदस्य नोंदणीचे ‘टार्गेट’पुर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्यातुलनेत महाविकास आघाडीतील (Mahaikas Aaghadi) तिन्ही प्रमुख पक्षांचे जिल्ह्यात सध्या फारशा बैठका, मेळावे घेताना दिसत नाहीत. पक्षाला गळती लागल्याने कार्यकर्त्यांमध्ये मरगळ आल्याचे चित्र आहे. जिल्ह्यात भाजपकडे दोन खासदार, पाच आमदार, शिवसेनेकडे तीन विधानसभेचे तर विधान परिषदेचे एक असे चार आमदार आहेत. तर राष्ट्रवादी काँग्रेसकडे एक आमदार आहे.
महायुतीकडे खासदार अशोक चव्हाणांसारखा प्रभावी नेता आहे तर महाविकास आघाडीकडे मात्र राजकारणात नवखे असलेले खासदार रवींद्र चव्हाण हेच एकमेव शिलेदार आहेत. विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला जिल्ह्यात एकही जागा जिंकता आली नाही. त्यामुळे कार्यकर्त्यात निरुत्साह दिसत आहे. कार्यकर्त्यामध्ये नवचैतन्य आणण्यासाठी महाविकास आघाडीतील कॉग्रेस, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना लक्ष घालावे लागणार आहे.
कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास वाढविण्यासाठी प्रयत्न केला तरच आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत महाविकास आघाडीला जिल्ह्यात थोडेफार यश मिळू शकते, अशी परिस्थिती आहे. महायुतीतील वरिष्ठ नेते सर्वच निवडणूका एकत्र लढविणार असल्याचे सांगत असले तरी नांदेडच्या स्थानिक महायुतीतील नेत्यांकडून स्वबळाचा नारा देण्यात येत आहे. त्यामुळे आगामी काळात जिल्ह्यात राजकीय घडामोडी काय घडतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
महायुतीत बंडखोरांना संधी?
विधानसभा निवडणुकीत नांदेड जिल्ह्यातील महायुतीला सर्वच जागांवर यश आले. बंडखोरी करणाऱ्यांना पुन्हा सन्मानपूर्वक पक्षात प्रवेश दिला जात आहे. त्यामुळे पक्षनिष्ठा, खरा कार्यकर्ता या गोष्टी अडगळीत पडल्या आहेत. जिल्ह्यात महायुतीत विधानसभा निवडणुकीत बंडखोरी करणाऱ्या नांदेड दक्षिणमधून दिलीप कंदकुर्ते, संजय घोगरे, लोहा मतदारसंघातून एकनाथ पवार, नांदेड उत्तरमधून मिलिंद देशमुख यांना भाजपमध्ये पुन्हा प्रवेश देण्यात आला आहे. त्यामुळे इतर पक्षातून महायुतीमध्ये येणाऱ्यांची संख्या अधिक आहे.
महाविकास आघाडीत नेतृत्वाचा अभाव
महाविकास आघाडीत काँग्रेसचे खासदार रवींद्र चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कमलकिशोर कदम तर शिवसेनेकडे (उबाठा) प्रभावी नेता नसल्याने आगामी निवडणुकीच्या दृष्टीने महाविकास आघाडीचे नेतृत्व करणार कोण? नेतृत्व दिले तरी निवडणुका व्यवस्थितपणे हाताळून आघाडीला यश मिळवून देण्याची क्षमता कुणात आहे? असा प्रश्न निर्माण होत असल्याने जिल्ह्यात महाविकास आघाडीकडे नेतृत्वाचा अभाव असल्याचे चित्र आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.