LokSabha Election 2024 : काँग्रेसचे माजी आमदार डॉ.कल्याण काळे हे सध्या छत्रपती संभाजीनगरचे पक्षाचे जिल्हाध्यक्ष आहेत. गेल्या 20-25 वर्षांपासून ते राजकारणात आहेत. राजकारणाचे बाळकडू घरातूनच मिळाल्यामुळे त्यांनी ही परंपरा पुढे कायम ठेवली. सहकार क्षेत्रातून काळे राजकारणात आले, पुढे आपल्या कार्यक्षमतेवर त्यांनी काँग्रेसमध्ये विविध पदे भूषवली. फुलंब्री विधानसभा मतदारसंघातून दोनवेळा ते आमदार झाले. भाजपचे ज्येष्ठ नेते हरिभाऊ बागडे यांचा पराभव करत त्यांनी मोठा विजय मिळवला होता.
फुलंब्री विधानसभा मतदारसंघ जालना लोकसभा मतदारसंघाशी जोडलेला असल्याने आणि जातीय समीकरणे लक्षात घेता काँग्रेस नेतृत्वाने काळे यांना जालना लोकसभा मतदारसंघातून 2009 मध्ये उमेदवारी दिली. काळे यांच्या उमेदवारीमुळे भाजपच्या रावसाहेब दानवे यांना चांगलाच घाम फुटला होता. काळे यांनी तब्बल 3 लाख 42 हजार मते मिळवत भाजपला जोरदार टक्कर दिली. पण त्यांचा अवघ्या साडेआठ हजार मतांनी पराभव झाला.
पण कडवी झुंज दिल्यामुळे कल्याण काळे यांची तेव्हा राज्यभरात चर्चा झाली होती. दिवंगत लोकनेते विलासराव देशमुख यांचे विश्वासू सहकारी म्हणून डॉ. कल्याण काळे यांची ओळख आहे. शहरात आले की विलासराव आवर्जून काळे यांच्या घरी जेवायला जात असत. राजकारणात काळे यांना विलासराव यांनीच अनेक संधी दिल्या. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात यांचाही प्रभाव काळे यांच्यावर आहे.
2019 च्या विधानसभा निवडणुकीत कल्याण काळे यांचा फुलंब्री मतदारसंघातून भाजपच्या हरिभाऊ बागडे यांनी पराभव केला. सध्या काळे काँग्रेसचे छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत. जालना लोकसभा मतदारसंघातून केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्याविरोधात काँग्रेस पुन्हा कल्याण काळे यांना मैदानात उतरवण्याच्या तयारीत आहे. 2009 ला थोडक्यात हुकलेली लोकसभेची संधी यावेळी कल्याण काळे यांना मिळते का? हे पाहणे रंजक ठरणार आहे.
डॉ. कल्याण वैजीनाथराव काळे
19 जुलै 1963
बीएचएमएस
कल्याण काळे हे छत्रपती संभाजीनगर शहराजवळ असलेल्या पिसादेवी येथील रहिवासी आहेत. डॉ. कल्याण काळे यांचे वडील वैजीनाथराव काळे हेही राजकारणात सक्रिय होते. त्यांच्यापासूनच त्यांना राजकीय वारसा मिळाला. कल्याण काळे यांचे बंधू जगन्नाथ काळे हेही राजकीय क्षेत्रात कार्यरत असून प्रेरणा नागरी सहकारी बँकेचे अध्यक्ष आहेत.
सीडसच्या राज्यव्यापी संघटनेवरही ते काम करतात. दुसरे बंधू भाऊसाहेब काळे व्यावसायिक आहेत. पत्नी रेखा काळे या गृहिणी आहेत. बहीण विजया भास्कर मुसंडे या प्राध्यापिका आहेत. काळे यांना तीन अपत्ये आहेत. दोन मुलींपैकी पल्लवी ही पदवीधर असून, विवाहित आहे. दुसरी मुलगी तेजस्विनी काळे ही डॉक्टर असून विवाहित आहे. मुलगा शिवम हा सध्या मुंबईत उच्चशिक्षण घेत आहे.
दुग्ध व्यवसाय, शेती
जालना
काँग्रेस
डॉ. कल्याण काळे यांनी सुरुवातीला देवगिरी सहकारी बँकेच्या संचालकपदाची निवडणूक लढवून जिंकली. त्यानंतर छत्रपती संभाजीनगर येथील पंचायत समितीच्या उपसभापतिपदी ते निवडून आले. 2004 मध्ये फुलंब्री विधानसभा मतदारसंघातून त्यांनी पहिल्यांदा विधानसभेची निवडणूक लढवली आणि जिंकली. पुन्हा 2009 मध्ये काँग्रेसने त्यांना उमेदवारी दिली आणि ते विजयी झाले. दरम्यान, काळे यांना जालना लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसने उमेदवारी दिली होती. या निवडणुकीत त्यांनी भाजपच्या रावसाहेब दानवे यांना कडवी झुंज दिली होती.
यावेळी त्यांचा अवघ्या साडेआठ हजार मतांनी पराभव झाला होता. 2014 मध्ये पुन्हा फुलंब्री विधानसभा मतदारसंघातून काळे यांनी निवडणूक लढवली, मात्र यात त्यांना अपयश आले. मोदीलाटेत हरिभाऊ बागडे फक्त साडेतीन हजारांच्या फरकाने निवडून आले. 2019 ला विधानसभेचे अध्यक्ष असलेले हरिभाऊ बागडे यांनी पुन्हा डॉ. कल्याण काळे यांचा पराभव केला. 2019 च्या पराभवानंतर 2024 मध्ये होणाऱ्या लोकसभेसाठी जालना लोकसभा मतदारसंघातून डॉ. कल्याण काळे यांचे नाव काँग्रेसकडून आघाडीवर आहे.
फुलंब्री विधानसभा मतदारसंघातील हजारो वयोवृद्ध नागरिकांची कल्याण काळे यांनी मुंबई येथे मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया करून घेत सामाजिक कार्यात आपला वाटा दिला होता. या वयोवृद्ध नागरिकांना मुंबईत शस्त्रक्रियेसाठी नेतांना त्यांची संपूर्ण व्यवस्था काळे यांनी केली होती.
याशिवाय ग्रामीण भागात भजनी मंडळांच्या स्पर्धा घेत त्यांना प्रोत्साहन देण्यासाठीही त्यांनी पुढाकार घेतला. कोरोनाकाळातही मतदारसंघातील हजारो कुटुंबांना अत्यावश्यक असलेल्या वस्तूंचे मोफत वाटप केले. कोरोनात वाढ होऊ नये, म्हणून सुरक्षा साधनांचेही मतदारसंघात काळे यांनी तेव्हा वाटप केले होते.
कल्याण काळे यांनी 2019 मध्ये लोकभेची निवडणूक लढवली नव्हती.
निवडणूक लढवली नव्हती.
मतदारसंघात कल्याण काळे यांचा जनसंपर्क चांगला आहे. काँग्रेसने त्यांच्यावर छत्रपती संभाजीनगरच्या जिल्हाध्यक्षपदाची धुरा सोपवली आहे. त्यांनी छत्रपती संभाजीनगरसह जालना जिल्ह्यात कार्यकर्त्यांची फळी उभी केली आहे. काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी इतर पक्षात गेल्यानंतर त्यानंतरच्या दुसऱ्या फळीतील कार्यकर्त्यांना मोठे पाठबळ डॉ. काळेंनी दिल्याने मतदारसंघात त्यांना मानणारा मोठा वर्ग आहे.
डॉ. कल्याण काळे हे स्वतः सोशल मीडियावर अपडेट राहतात. तसेच सोशल मीडियासाठी त्यांनी स्वतंत्र यंत्रणा कार्यान्वित केलेली आहे. त्या माध्यमातून ते काँग्रेसचा प्रचार आणि प्रसार करतात. राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेसह पक्षाचे इतर उपक्रम, कार्यक्रम, तसेच राजकारणातील आदर्श नेत्यांच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा काळे आवर्जून देतात. याशिवाय पक्षाच्या वतीने सामान्यांच्या प्रश्नांवर केलेल्या आंदोलनांची माहिती, छायाचित्रेही ते नियमित आपल्या पेजवरून देत असतात. समाजमाध्यमांवर त्यांना फॉलो करणाऱ्यांचीही संख्या मोठी आहे.
कल्याण काळे कायम आपल्या विरोधकांवर टीका करीत असतात. स्थानिक व जिल्हापातळीवर जिल्हा दूध संघ, कृषी उत्पन्न बाजार समिती या संस्थांमधील गैरकारभारावर ते आक्रमक भूमिका मांडतात. भाजपचे आमदार हरिभाऊ बागडे यांच्यामुळे दूध संघ, कृषी उत्पन्न बाजार समिती डबघाईला आली, असा आरोप ते सातत्याने करीत असतात. याशिवाय केंद्र सरकार व पंतप्रधाान नरेंद्र मोदी सरकारविरोधातही ते कायम भूमिका मांडत आले आहेत. काळे यांच्याबाबतीत किंवा त्यांच्या विधानांमुळे मोठा गदारोळ झाला किंवा वाद निर्माण झाला, असे घडलेले नाही.
माजी मुख्यमंत्री दिवंगत विलासराव देशमुख
डॉ. कल्याण काळे यांच्याकडे संघटनकौशल्य आहे. कुठल्याही नवीन कार्यकर्त्याला आपल्या संघटनेत सहभागी करून घेण्याची त्यांची एक विशिष्ट कला आहे. 2004 मध्ये आमदार असताना तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्याकडून कपाशीवर पडलेल्या लाल रोगाचे विशेष पॅकेज त्यांनी शेतकऱ्यांसाठी जाहीर करून घेतले होते.
मराठवाड्यात अशोक चव्हाण यांच्यानंतर डॉ.कल्याण काळे यांच्याकडेच नेतृत्व म्हणून पाहिले जाते. छत्रपती संभाजीनगर व जालना या दोन्ही जिल्ह्यांत कल्याण काळे यांनी आपली कार्यकर्त्यांची फळी तयार केलेली आहे. अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात, अमित देशमुख यांच्यासह काँग्रेसमधील सर्वच नेत्यांशी काळे यांचे चांगले संबंध आहेत.
2014 पासून मोदींचा करिष्मा मतदारांवर असल्यामुळे मोठ्या प्रमाणात तरुणांची ओढ भाजपकडे आहे. गेल्या दहा वर्षांपासून काँग्रेसची सत्ता नसल्याने एकापाठोपाठ एक कार्यकर्त्यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत इतर पक्षांत प्रवेश केला. त्यामुळे आता पुन्हा नव्याने पक्षाची बांधणी करताना मोठी अडचण आहे. सत्तेशिवाय पदाधिकारी, कार्यकर्त्यांचे जाळे घट्ट ठेवणे, त्यामुळेच काळे यांना शक्य होत नाही. काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजीही अधूनमधून समोर येत असते.
कधीकाळी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यावर अधिराज्य गाजवलेल्या काँग्रेसला येथे गेल्या 30-35 वर्षांत खासदार निवडून आणता आलेला नाही. सध्या जिल्ह्यात काँग्रेसचा एकही आमदार नसल्याने स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये पक्षाची ताकद क्षीण झाली आहे. शिवाय राज्यस्तरावरील नेत्यांकडूनही जिल्ह्याकडे सातत्याने दुर्लक्ष झाल्यामुळे पक्षाच्या कामगिरीवर विपरित परिणाम झाला आहे. काँग्रेसची व्होट बॅंक समजली जाणारी मुस्लिम मते एमआयएमकडे वळल्याने काँग्रेसला जिल्ह्यातही मोठा फटका बसला.
कल्याण काळे यांना जालना लोकसभेची उमेदवारी न मिळाल्यास ते पक्षाने दिलेल्या उमेदवाराचा प्रचार करतील. काळे यांना लोकसभा लढवण्याची इच्छा असली तरी त्यांची पहिली पसंती ही फुलंब्री विधानसभा मतदारसंघालाच आहे.
(Edited By- Ganesh Thombare)
R...
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.