Loksabha Election : लोकसभेच्या जालना लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीने माजी आमदार डाॅ. कल्याण काळे Kalyan Kale यांना उमेदवारी दिल्यापासून राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे. 2009 मध्ये रावसाहेब दानवेंना निसटता विजय मिळवता आला होता. त्यामुळे पुन्हा 2009 सारखी परिस्थिती निर्माण झाली असल्याची चर्चा आहे. या चर्चांवर केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावासाहेब दानवे यांनी विरोधकांची खिल्ली उडवली आहे.
'आता परिस्थिती बदलली आहे. मतदारसंघ आणि भाजपही BJP बदलला. त्यामुळे आता पुन्हा 2009 विसरा.' अशा शब्दात केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे Raosaheb Danve यांनी कल्याण काळे यांचे आपल्यासमोर आव्हान नसल्याचे सांगितले. जालना लोकसभा मतदारसंघातून मी सहाव्यांदा निवडणूक लढवतोय. विकासकामे केली असतील तर मला लोक मतदान करतील. गेल्या दहा वर्षात जालना लोकसभा मतदारसंघाचा जो कायापालट झाला आहे. तो लोकांच्या समोर आहे, असे दानवे म्हणाले.
विरोधकांनी कितीही टीका टिप्पणी केली तर मी त्याला उत्तर देणार नाही. याउलट विकासाच्या मुद्यावर त्यांनी माझ्याशी थेट समोरासमोर येऊन चर्चा करावी, असे आव्हान दानवे यांनी 'सरकारनामा'शी बोलतांना दिले. भाजपने जालना लोकसभा मतदारसंघातून रावसाहेब दानवे यांची उमेदवारी जाहीर केल्यानंतर तब्बल दोन आठवड्यांनी काळे यांच्या नावाची घोषणा महाविकास आघाडीकडून करण्यात आली.
काळे यांच्या उमेदवारीने काँग्रेस महाविकास आघाडीला 2009 मध्ये झालेल्या निसटत्या पराभवाचे रुपांतर यावेळी विजयात करण्याची संधी असल्याचे बोलले जाते. सहाजिकच 2009 मधील दानवे यांच्या विरुद्ध काळे यांनी दिलेली कडवी झुंज डोळ्यासमोर ठेवूनच त्यांच्या नावावर पंधरा वर्षांनी पक्षाने पुन्हा शिक्कामोर्तब केले. स्पर्धक उमेदवार म्हणून रावसाहेब दानवे यांना काळे यांचे किती आव्हान वाटते, असं जेव्हा त्यांना विचारलं तेव्हा 2009 ची तुलना आता होऊ शकत नाही, यावर दानवेंनी जोर दिला.
तेव्हा राज्यात काँग्रेसची सत्ता होती. लोकसभेच्या सहा विधानसभा मतदारसंघात बहुतांश आमदार त्यांच्या पक्षाचे होते. एवढे असूनही मी साडेआठ हजार मतांनी विजयी झालो होतो. आता तर आपण फार पुढे निघून गेलो आहोत. तेव्हासारखी परिस्थिती आज राहिलेली नाही, आमचा पक्ष भाजपही आता पुर्वीचा राहिलेला नाही, हा मोदीजींचा पक्ष आहे, असे दानवे यांनी ठणकावून सांगितले.
पाच टर्म जालना लोकसभा मतदारसंघातील लोकांनी मला निवडून दिले. मी केलेली विकासकामे पाहूनच त्यांनी मला मतदान केले असणार. त्यामुळे विरोधात कोण उमेदवार आहे, या पेक्षा मी मतदारसंघात केलेल्या विकासकामाच्या जोरावर मत मागणारा माणूस आहे. त्यामुळे कोणी जर 2009 ची तुलना 2024 शी करत असेल तर ते चुकीचे ठरेल, असेही दानवे म्हणाले
(Edited By Roshan More)
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.