
Dharashiv Political News : ''धाराशिव जिल्ह्याचा भरभरून विकास होणार, कायापालट होणार, अशा वल्गना सातत्याने केल्या गेल्या. निवडणुकीच्या काळात घोषणांचा पाऊस पाडला. पण, वास्तवात काय ? तर काहीच नाही. धाराशिव जिल्ह्याच्या विकासाचा कणा असलेली नियोजन समिती 408 कोटींच्या निधीतून विकास कामाला हातभार लावते. मात्र, याच समितीने आता 250 कोटीपेक्षा जास्त निधीच्या कामांच्या प्रशासकीय मान्यतांना स्थगिती दिली आहे.''
तसेच, ''एकीकडे सभागृहात मोठ्याने स्थगिती द्यायला मी काही उद्धव ठाकरे(Uddhav Thackeray) नाही म्हणायचे आणि दुसरीकडे धाराशिव जिल्ह्यातील इतक्या मोठ्या कामांना स्थगिती द्यायची.. यांचे दाखवायचे आणि खायचे दात वेगळे आहेत, हे सर्वांनाच आता कळून चुकले आहे.'', अशा शब्दात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार कैलास पाटील यांनी संताप व्यक्त केला. धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी मंजुरी दिलेल्या कामांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशाने स्थगिती देण्यात आल्यानंतर यांचे राजकीय पडसाद धाराशिवमध्ये उमटू लागले आहेत.
भाजपाचे(BJP) तुळजापूरचे आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांनी मुख्यमंत्र्यांच्या धाराशिव दौऱ्यात जिल्हा नियोजन समितीतील निधी वाटप आणि कामांच्या मंजूरी संदर्भात तक्रारी केल्या होत्या. त्यानंतर आज जिल्हाधिकाऱ्यांनी डीपीडीसीने मंजूरी दिलेल्या परंतु कार्यारंभ आदेश न निघालेल्या निम्याहून अधिक कामांना स्थगिती दिली. यावर आमदार कैलास पाटील यांनी संताप व्यक्त करत कोणाच्या आदेशाने विकास कामांना स्थगिती दिली, असा सवाल करत जाब विचारला आहे.
तत्कालीन शिंदे सरकार सत्तेत येताच जिल्ह्यासाठी मंजूर असलेला शेकडो कोटींच्या कामांना स्थगिती देण्यात आली. ती कामे आज तीन वर्षे उलटत असतानाही झाली नाहीत. आता फडणवीस(Devendra Fadnavis) सरकार आले तरी काही बदल दिसत नाही. आकांक्षित जिल्ह्याकडे विशेष लक्ष देऊन गतीने विकास साधण्याची जबाबदारी सरकारची असते. इथे मात्र स्थगिती देऊन उलटी गंगा प्रवाहित केली जात आहे. धाराशिव जिल्हा विकासापासून वंचित ठेवणाऱ्या या सरकारचा वेळ आल्यावर लोक बरोबर हिशोब करतील, हे लक्षात असू द्या, असा इशारा कैलास पाटील यांनी आपल्या 'एक्स'वरील प्रतिक्रियेत दिला.
जिल्हा नियोजन समितीच्या एकूण 408 कोटींपैकी मंजूर झालेली परंतु कार्यारंभ आदेश न झालेली तब्बल 268 कोटींच्या कामांना स्थगिती दिल्याने सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी या कामांना मंजुरी दिली होती. मात्र स्थानिक लोकप्रतिनिधींकडून थेट मुख्यमंत्र्यांकडे तक्रार झाल्यामुळे त्यांच्या आदेशानेच या कामांना स्थगिती दिल्याची चर्चा जिल्ह्याच्या राजकारणात सुरू आहे.
(२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता का्ॅमस्कोअरमध्ये नंबर १. डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातली नवी झेप)
(Edited by - Mayur Ratnaparkhe)
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.