Jalna Municipal Corporation News : नगर परिषदेचे रुपांतर महापालिकेत झाल्यानंतरच्या पहिल्याच निवडणुकीत महायुतीमधील दोन नेत्यांमध्ये वर्चस्वाची लढाई रंगणार आहे. भाजपचे नेते माजी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे आणि शिवसेनेचे विद्यमान आमदार अर्जुन खोतकर यांनी आपली ताकद आतापासूनच पणाला लावली आहे. युती असली तरी जिल्ह्याच्या राजकारणात कायम खोतकर विरुद्ध दानवे असा संघर्ष राहिला आहे, तो अद्यापही कायम आहे.
नगरपरिषदेचे रुपांतर महापालिकेत करण्यासाठी अर्जुन खोतकर यांनी जोर लावला होता. तर काँग्रेसचे तत्कालीन आमदार कैलास गोरंट्याल यांनी महापालिका करण्यास तीव्र विरोध दर्शवला होता. भाजप नेते रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांचेही गोरंट्याल यांच्या भूमिकेला पाठबळ होते, पण तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत झालेल्या भेट आणि चर्चेनंतर रावसाहेब दानवे यांचा विरोध मावळला. खोतकरांची सरशी झाल्यानंतर आता महापालिकेची पहिली निवडणूक होणार आहे.
भाजपाच्या संघटनात्मक निवडणुकीत महानगरप्रमुख पद भास्कर दानवे यांना देत रावसाहेब दानवे यांनी महापालिका निवडणुकीवर लक्ष केंद्रीत केले आहे. (Jalna) आतापर्यंत भाजपचा नगराध्यक्ष न करता आल्याची खंत दानवे यांना आहे. केंद्रात, राज्यात भाजपची सत्ता असताना जालन्याच्या पहिल्या महापालिकेत आपल्याच पक्षाचा महापौर असावा यासाठी दानवे जोर लावणार आहे. तर दुसरीकडे शिवसेनेचे आमदार अर्जुन खोतकर हे महापालिकेवर भगवा फडकवण्याच्या प्रयत्नात आहेत.
राज्यात महायुती असली तरी जालना महापालिकेत युती होते की मग भाजप-शिवसेना स्वबळावर लढतात? याचा फैसला अद्याप झालेला नाही. पण त्याआधीच महायुतीतील मतभेद चव्हाट्यावर येऊ लागले आहेत. रावसाहेब दानवे- भास्कर दानवे या जोडीच्या विरोधात शिवसेनेचे अर्जुन खोतकर, आमदार बबनराव लोणीकर आणि भाजपाचे ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष नारायण कूचे असे चित्र सध्या निर्माण झाले आहे. दानवे-लोणीकर यांच्यातील मतभेद जिल्ह्याला नवे नाहीत.
गोरंट्याल यांची शातंता वादळापुर्वीची?
भाजपा संघटनात्मक बांधणी आणि निवडीच्यावेळी ते दिसून आले होते. नारायण कुचे यांना विरोध असतांना त्यांनी लोणीकरांच्या मदतीने ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष पद मिळवलेच. आता तेच लोणीकर-कुचे आणि खोतकर हे त्रिकुट महापालिका निवडणुकीत एकत्र येण्याची शक्यता आहे. खोतकर-उढाण आणि लोणीकर-कुचे विरुद्ध रावासाहेब दानवे-भास्कर दानवे असे दोन गट सध्या जालन्यात पडल्याचे चित्र आहे. दुसरीकडे नगर परिषदेवर कायम वर्चस्व राखलेल्या काँग्रेसचे कैलास गोरंट्याल यांच्या गोटात सध्या शांतता आहे. ही शांतता मोठ्या वादळावपुर्वीची तर नाही ना? अशी चर्चा जिल्ह्यात आहे.
जालना महापालिकेतून काँग्रेसची सत्ता उखडून फेकण्यासाठी खोतकर यांनी रावसाहेब दानवे यांच्या विरोधकांना सोबत घेत मोर्चे बांधणी सुरू केली आहे. तर दानवे यांनी अद्याप आपले पत्ते खुले केलेले नाहीत. गोरंट्याल आणि दानवे यांची गेल्या वर्षभरापासून गट्टी जमली होती. ती महापालिका निवडणुकीत कायम राहते का? पडद्यामागे या दोघांमध्ये काही ठरते का? यावर जालना महापालिकेवर वर्चस्व कोणाचे? हे ठरणार आहे.
मावळत्या नगरपरिषदेतील पक्षीय बलाबल पाहिले तर काँग्रेस 28, भाजप 12, शिवसेना 11, राष्ट्रवादी 9, अपक्ष 1 असे संख्याबळ होते. कैलास गोरंट्याल यांचे नगर परिषदेवर एकहाती वर्चस्व होते. त्याला महापालिका निवडणुकीत हादरा बसतो की मग? जालन्यात वेगळे राजकीय समीकरण पहायला मिळते याकडे सगळ्यांचे लक्ष असणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.