
Latur News : मराठा कुणबी नोंदीच्या आधारे जात प्रमाणपत्र आणि ओबीसींमधून आरक्षणाचा प्रश्न सध्या राज्यभरात गाजतो आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या मुंबईतील आंदोलनानंतर सरकारने हैदराबाद, सातारा गॅझेट लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे ओबीसीतून मराठा समाजाला आरक्षण मिळण्याचा मार्ग मोकळा झाल्याचे बोलले जाते. यावरून सध्या मतमतांतरे असली तरी 58 लाख नोंदींमध्ये मराठावाड्यात मराठा कुणबी आढळण्याचे प्रमाण अत्यल्प असल्याचे दिसून येत आहे.
गेल्या दीड वर्षात लातूरमध्ये (Latur) आतापर्यंत केवळ 984 नोंदी आढळल्याचे स्पष्ट झाले आहे. या आधारे प्रशासनाने बावीसशे जणांना प्रमाणपत्रांचे वाटप केले आहे. 58 लाख नोंदी सापडल्यामुळे तीन कोटी मराठा ओबीसीत गेल्याचा दावा मनोज जरांगे पाटील यांनी स्वतः वारंवार केला आहे. तर उर्वरित मराठा समाज हैदराबाद, सातारा गॅझेट लागू झाल्यामुळे ओबीसीत समाविष्ट होईल, असेही सांगितले जाते. प्रत्यक्षात मराठवाड्यात 58 लाख नोंदीपैकी अगदीच काही हजार नोंदी आढळल्याचे समोर आलेल्या आकडेवारीवरून दिसते. सर्वाधिक मराठा-कुणबी नोंदी या विदर्भात आढळल्या असून ते ओबीसींच्या सवलती पुर्वीपासूनच घेत आहेत.
राज्य शासनाच्या वतीने गेल्या एक- दीड वर्षात कुणबी मराठा (Maratha Reservation) नोंदी घेण्याची मोहिम हाती घेण्यात आली होती. यात आतापर्यंत लातूर जिल्ह्यात 984 व्यक्तींच्या नोंदी सापडल्या आहेत. यात आतापर्यंत प्रशासनाने 2 हजार 209 प्रमाणपत्र वाटप केले आहेत. आता शासनाने हैदराबाद गॅझेटचा आधार घेण्य़ाचा आदेश मंगळवारी (ता. दोन) काढला. यात किती नोंदी सापडतात याकडे सगळ्यांचे लक्ष असणार आहे.
गेल्या काही वर्षापासून मराठा आरक्षणाचा विषय ऐरणीवर आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून मनोज जरांगे यांनी मुंबईत उपोषण केले. आरक्षणाच्या मागणीवर मुंबईत जाण्याची त्यांची ही दुसरी वेळ होती. या पूर्वी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या काळात जरांगे यांनी मुंबईत आंदोलन केले. त्यानंतर कुणबी मराठा नोंदी शोधण्याची मोहिम हाती घेण्यात आली. त्यानुसार प्रमाणपत्र वाटपही सुरु करण्यात आले होते.
राज्यभरात अशा 58 लाख नोंदी सापडल्याचे सांगण्यात येते. लातूर जिल्ह्यात या मोहिमेत केवळ 984 व्यक्तींच्या नोंदी मिळाल्या आहेत. त्यानुसार प्रशासनाने आतापर्यंत 2 हजार 209 प्रमाणपत्र संबंधीतांच्या वारसांना वाटप केले आहेत. जरांगे यांच्या मुंबईत झालेल्या आंदोलनानंतर शासनाने मंगळवारी एक आदेश काढला. हैदराबाद गॅझेटियरमधील नोंदी तपासून आता कुणबी जातीचे प्रमाणपत्र देण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
आरक्षण मागणीसाठी तेरा जणांचे बलिदान
शासनाने बुधवारी एक नवीन आदेश काढला आहे. यात मराठा आरक्षण आंदोलनामध्ये मृत्यूमुखी पडलेल्या व्यक्तींच्या वारसांना आर्थिक मदत व नोकरी देण्याची प्रलंबित राहिलेली कारवाई तातडीने करण्यात यावी ,असे आदेश दिले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत तेरा जणांचा मृत्यू झाला आहे, यात बारा जणांच्या वारसांना मदत वाटप झाली आहे. तर मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याची प्रक्रिया सप्टेंबरपर्यंत पूर्ण करावी असेही आदेश दिले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत मराठा आरक्षण आंदोलनात 44 गुन्हे दाखल झालेले आहेत. या पैकी 14 गुन्हे शासनाने मागे घेतले आहेत. दोन गुन्ह्यात निर्दोष मुक्तता आहे. तर 28 गुन्हे हे न्याय प्रविष्ट आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.