
महाएल्गार सभेआधी मनोज जरांगे पाटील यांनी छगन भुजबळांवर तीव्र टीका करत ‘येवल्याचा अलिबाबा’ म्हणत षडयंत्राचा आरोप केला.
जरांगे पाटील यांच्या वक्तव्यामुळे मराठा आरक्षणाच्या चळवळीचे राजकीय वातावरण पुन्हा पेटले आहे.
भुजबळ समर्थकांकडून या वक्तव्यावर तीव्र प्रतिक्रिया येण्याची शक्यता असून, राज्यात नवीन राजकीय संघर्ष पेटण्याची चिन्हे आहेत.
Maratha/OBC News : मराठा आरक्षणासाठी हैदराबाद गॅझेट लागू करण्याचा निर्णय महायुती सरकारने घेतला. तेव्हापासून राज्यात पुन्हा एकदा मराठा विरुद्ध ओबीसी संघर्ष पेटला आहे. ऐन दिवाळीच्या तोंडावर बीडमध्ये उद्या (ता.17) छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत 'महाएल्गार' मेळावा होत आहे. आधी रद्द केलेला हा मेळावा पुन्हा घेत ओबीसींकडून मोठे शक्तीप्रदर्शन मराठवाड्यात केले जाणार आहे.
या पार्श्वभूमीवर मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj jarange Patil) यांनी छगन भुजबळ यांच्यावर वार करत ते मराठा समाजाविरोधात षडयंत्र रचत असल्याचा आरोप केला आहे. येवल्याचा अलिबाबा असे म्हणत या अलिबाबाच्या षडयंत्रात ओबीसी नेते अडकले आहेत, त्यांनी आता माकडचाळे बंद करावेत. अलिबाबा अजित पवारांवर दबाव आणतो, हैदराबाद गॅझेटच्या जीआर आड लपतो, मराठा आरक्षणाला विरोध करतो, असे म्हणत जरांगे यांनी उद्या बीडमध्ये होणाऱ्या ओबीसी मेळाव्याआधीच आक्रमक भूमिका घेतली आहे.
मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्या नेतृत्त्वात बीडमध्ये होणाऱ्या ओबीसी महाएल्गार सभेकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. दसरा मेळाव्याच्या भगवान भक्तीगडावर आमदार धनंजय मुंडे यांनी भाषण करताना पहिल्यांदा मनोज जरांगे यांच्यावर थेट टीका केली होती. कोणाला फसवतायं, असे म्हणत ओबीसींच्या ताटातून कोणाला आरक्षण दिले जाऊ, नये अशी भूमिका त्यांनी जाहीर केली होती. उद्याच्या मेळाव्यात धनंजय मुंडेही सहभागी होणार आहेत. आमदार गोपीचंद पडळकर यांच्यासह राज्यभरातील ओबीसी नेते उद्या बीडमध्ये दाखल होणार आहेत.
या महाएल्गार सभेबद्दल मनोज जरांगे पाटील यांना विचारले असता, त्यांनी छगन भुजबळ यांचा उल्लेख येवल्याचा अलिबाबा असा केला. अलिबाबाच्या आहारी गेलेल्या ओबीसी नेत्यांनी आता माकडचाळे बंद केले पाहिजेत. खूप चांगले असणारे नेतेसुद्धा येवल्याच्या अलिबाबाच्या आहारी गेले आहेत. त्याच्या षड्यंत्रात हे नेते गुंतलेले आहेत. या नेत्यांना येवल्याचा अलिबाबा काही बाहेर पडू देत नाही, असा हल्लाबोल जरांगे यांनी केला.
काही नेत्यांना हाताशी धरून येवल्याच्या अलिबाबाचे काही प्रयोग सुरू आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर दबाव आणणे, हैदराबादच्या जीआरच्या आडून लपून राहायचं, मराठा समाजाच्या आरक्षणासाठी जो जीआर काढला आहे, तो रद्द करायला सांगणे, असे उद्योग सध्या केले जात आहेत. अलिबाबाने तसेच त्याच्या आहारी गेलेल्या नेत्यांनी आता माकडचाळे बंद करावेत, याचा पुनरुच्चारही मनोज जरांगे पाटील यांनी केला.
छगन भुजबळ हे सगळ्यांचा वापर करून घेत आहेत. भ्रष्टाचाराच्या माध्यमातून ते पैसे कमवत आहेत. ओबीसी नेत्यांना हाताखाली धरून हे सगळं चालू आहे. यांनी बीड जिल्ह्याला जातीयवादाचा आखाडा बनवलेलं आहे. कुणीही उठतो आणि त्याच ठिकाणी येत आहे. सांगली आणि सातारा जिल्ह्यातील लोकसुद्धा तिथेच येता आहेत, अशी टीकाही जरांगे यांनी केली.
1. मनोज जरांगे पाटील यांनी छगन भुजबळांवर कोणता आरोप केला?
त्यांनी ‘येवल्याचा अलिबाबा’ असे संबोधून षडयंत्र रचल्याचा आरोप केला.
2. हे वक्तव्य कुठे आणि कोणत्या प्रसंगी केले गेले?
महाएल्गार सभेआधी मनोज जरांगे पाटील यांनी हे वक्तव्य केले.
3. छगन भुजबळांनी या आरोपावर प्रतिक्रिया दिली का?
अद्याप भुजबळांनी अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नसली तरी त्यांच्या समर्थकांत नाराजी आहे.
4. या वक्तव्याचा मराठा आरक्षण चळवळीवर काय परिणाम होईल?
या आरोपामुळे चळवळीच्या राजकीय वातावरणात तणाव वाढण्याची शक्यता आहे.
5. महाएल्गार सभा कधी आणि कुठे होणार आहे?
महाएल्गार सभा राज्यातील प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत १७ रोजी बीडमध्ये होणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.