Chhatrapati SambhajiNagar : मराठा समाज, तरुण, विद्यार्थी आणि गरजवंतांना हक्काचे आरक्षण मिळवून देण्यासाठी मनोज जरांगे-पाटील हे समाजाच्या पाठबळावर सरकारशी लढा देत आहेत. मराठा आरक्षणाचा लढा अंतिम टप्प्यात असताना खचलेले तरुण मात्र मृत्यूला कवटाळताना दिसत आहेत. इकडे मनोज जरांगे-पाटील हजारो मराठाबांधवांना घेऊन आरक्षणासाठी आरपारची लढाई लढण्यासाठी पायपीट करीत मुंबईला निघाले आहेत,
तर दुसरीकडे फुलंब्री तालुक्यातील एका मराठा तरुणांने मनोज जरांगे-पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवत आपले जीवन संपवले. तालुक्यातील वारेगाव येथील 25 वर्षीय तरुणाने मराठा आरक्षणासाठी मी माझ्या जिवाची आहुती देत आहे, अशी चिठ्ठी लिहून लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
ही घटना सोमवारी (ता. 22) सकाळी आठ वाजता घडली. या घटनेची फुलंब्री पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. ज्ञानेश्वर शिवाजी मोहारे असे या तरुणाचे नाव आहे. ज्ञानेश्वर मोहारे हा सकाळी दुचाकीवर गावातून शेतात गेला व दुचाकीला असलेली दोरी सोडून त्याने लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली.
ही घटना त्याचे काका सुरेश मोहारे यांनी बघितल्यानंतर या घटनेची माहिती गावात व नंतर फुलंब्री पोलिस ठाण्यास देण्यात आली. पोलिस निरीक्षक रवींद्र निकाळजे, पोलिस उपनिरीक्षक श्रीनिवास, धुळे पोलिस हेडकॉन्स्टेबल संतोष डोंगरे, कैलास राठोड आदींनी घटनास्थळी धाव घेऊन ग्रामस्थांच्या मदतीने मृतदेह खाली उतरवला. या मृतदेहाचा पंचनामा करून विच्छेदनासाठी घाटी रुग्णालय छत्रपती संभाजीनगर येथे पाठविण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.
दरम्यान, या तरुणाने लिहिलेल्या चिठ्ठीमध्ये "एक मराठा लाख मराठा," मी मराठा आरक्षणासाठी माझ्या जिवाची आहुती देत आहे. मनोज जरांगे आपल्यासंग, आपल्या पाठीशी... आपला ज्ञानेश्वर मोहारे असा उल्लेख यात आढळला आहे. नायब तहसीलदार संजीव राऊत व तलाठी जोनवाल यांनी पंचनामा करून वरिष्ठांना अहवाल सुपूर्द केला. तसेच आत्महत्याग्रस्तांच्या नातेवाईकांना शासकीय मदत देण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली.
मृताच्या पश्चात आई-वडील, एक भाऊ, बहीण असा परिवार आहे. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सगळा समाज एकटवला असतानाच ही दुर्दैवी घटना घडल्यामुळे हळहळ व्यक्त होत आहे. मराठा तरुणांनी टोकाचे पाऊल उचलू नये, धीर धरावा, तरुणांनी आपले जीवन संपवले तर मग आरक्षण कोणासाठी मागायचे ? असा सवाल करीत मनोज जरांगे-पाटील यांनी अनेकदा आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलणाऱ्या समाजाच्या तरुणांना आवाहन केले होते.
(Edited By : Ganesh Thombare)
R...
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.