

Parbhani Politics : मुंबई, पुणे, नाशिक सारख्या मोठ्या शहरांमध्ये उद्योगांनी आतापर्यंत कोट्यावधींची गुंतवणूक केली. पण आता नव्याने येणाऱ्या उद्योगांनी मराठवाड्यात गुंतवणूक करावी, असे आवाहन राजकीय नेते, सरकार, मंत्री यांच्याकडून नेहमीच केले जाते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 'दावोस'मध्ये देशी-विदेशी उद्योगांशी महाराष्ट्रातील गुंतवणूकीसाठी केलेले करारा यावरून विरोधक कायम टीका करतात.
फडणवीस यांनी मात्र जे करार केले ती गुंतवणूक येणारच असा ठाम दावा करत विरोधकांना आव्हान दिल्याचे देखील अनेकदा दिसून आले. मराठावाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना व काही प्रमाणात नांदेडमध्ये उद्योग उभे राहिले, राहत आहेत. परंतू या तीन शहराच्या तुलनेत मराठवाड्यातील इतर पाच जिल्हे बरेच मागे आहेत.
मुख्यमंत्री फडणवीस यांच्या मंत्रीमंडळातील मंत्री मेघना बोर्डीकर यांनी त्यांच्या पावलावर पाऊल ठेवत परभणीत उद्योग उभे राहावेत, त्यातून मोठी गुंतवणूक आणि रोजगार निर्माण व्हावेत या दृष्टीने पाऊल टाकले आहे. 'इन्व्हेस्ट इन परभणी' या गुंतवणूक परिषदेच्या माध्यमातून जिल्ह्यात 1 हजार 622 कोटी रुपयांपेक्षा अधिक गुंतवणुकीचे सामंजस्य करार करण्यात आल्याचा दावा केल जात आहे.
162 उद्योजकांसोबत झालेल्या या करारांमधून सुमारे 15 हजार 617 स्थानिकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत. येत्या दसऱ्यापर्यंत संबंधित उद्योगांच्या इमारत बांधकामाची पायाभरणी करण्याचे नियोजन असल्याची माहिती पालकमंत्री मेघना
बोर्डीकर यांनी जिल्हा उद्योग केंद्राच्या वतीने आयोजित परभणी गुंतवणूक परिषदेत दिली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात देश व राज्य प्रगतीपथावर आहे. विकसित व अग्रेसर परभणीसाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न करण्याची गरज आहे. स्थानिक उद्योजकांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील असून, गुंतवणुकीसाठी आवश्यक कागदपत्रे, वित्तपुरवठा, अनुदान व पात्रतेबाबत उद्योजकांना मार्गदर्शन केले जात आहे.
सामंजस्य करारांची प्रक्रिया एकखिडकी पद्धतीने सुलभ करण्यावर भर देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. परभणीच्या कृषी क्षेत्राला उद्योगाची जोड देण्यावर भर देताना पालकमंत्र्यांनी तेलबिया उत्पादन, कृषी प्रक्रिया उद्योग, सौरऊर्जा आणि कौशल्य विकासाच्या माध्यमातून रोजगार निर्मिती करण्याचे उद्दिष्ट स्पष्ट केले.
अकुशल मनुष्यबळाला प्रशिक्षण देऊन कुशल मनुष्यबळ तयार करण्यात येईल. त्यातून प्रक्रिया उद्योग उभारून उत्पादनाचे मूल्यवर्धन करीत जागतिक बाजारपेठेत परभणीची ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न असल्याचे मेघना बोर्डीकर म्हणाल्या.
परभणीत महाराष्ट्रातील पहिला 'इंटिग्रेटेड सीबीजी क्लस्टर' उभारण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडे मागणी करण्यात आली आहे. कृषी अवशेष, प्रेसमड, नेपियर गवत, गोबर व जैविक कचऱ्यापासून सीबीजी आणि सेंद्रिय खत निर्मिती करून शेतकऱ्यांना अतिरिक्त उत्पन्न व रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न आहे.
'वेस्ट-टू-वेल्थ' आधारित उद्योगांना प्रोत्साहन देऊन परभणीला हरित ऊर्जा व कचरा व्यवस्थापन उद्योगांचे प्रमुख केंद्र बनविण्याचा संकल्प असल्याचे पालकमंत्र्यांनी सांगितले. परभणीत शोध, नवोपक्रम, उष्मायन व प्रशिक्षण केंद्र (सीआयआयआयटी) तसेच नवीन उद्योगभवन उभारण्यात येणार आहे. उद्योगांसाठी आवश्यक परवानग्या एकाच खिडकीतून उपलब्ध करून 'ईज ऑफ डुईंग बिझनेस'ला चालना देण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी परभणी गुंतवणूक परिषदेला शुभेच्छा दिल्याचेही त्या म्हणाल्या.
कृषी हे परभणीचे प्रमुख सामर्थ्य आहे शेतातून कंपनी ते कंपनी ते जागतिक बाजारपेठेत उत्पादन उपलब्ध करून देण्याचे उद्दिष्ट असावे असे आवाहन त्यांनी केले. ई कॉमर्स क्षेत्रात भविष्यात सुमारे 500 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याचा मानस यावेळी उद्योजकांनी व्यक्त केला तर अन्नप्रक्रिया क्षेत्रात आगामी पाच वर्षात एक हजार कोटी रुपयांची गुंतवणूक होणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. या परिषदेमुळे परभणी जिल्ह्यातील औद्योगिक क्षमता कृषी आधारित उद्योग फूड प्रोसेसिंग ई-कॉमर्स आणि रोजगार निर्मितीच्या संधींना व्यापक व्यासपीठ मिळाल्याच्या भावनाही उद्योजकांनी व्यक्त केल्या.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.