Shiv Sena-BJP News : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात आतापर्यंतच्या राजकीय इतिहासात पहिल्यादाच दोन महिला आमदार निवडून आल्या आहेत. कन्नड-सोयगाव मतदारसंघातून शिवसेनेच्या संजना जाधव आणि फुलंब्रीतून भाजपाच्या अनुराधा चव्हाण. मतदारांनी महिला आमदारांना संधी दिली, आता पाच वर्षात मतदारसंघाचा सर्वांगीण विकास साधत या संधीचं सोनं त्या करतात का? याकडे सगळ्यांचे लक्ष असणार आहे.
राजकारणात महिलांचा सहभाग वाढला पाहिजे, यासाठी आरक्षणाची तरतूद करण्यात आली आहे. (BJP) सगळेच राजकीय पक्ष व त्यांचे नेते भाषणातून महिलांमधील क्षमता, नेतृत्व गुणांचे तोंडभरून कौतुक करत असतात. प्रत्यक्षात लोकसभा, विधानसभा, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महिलांना उमेदवारी द्यायची वेळे येते तेव्हा मात्र सोयीस्कर या सगळ्या गोष्टींचा त्यांना विसर पडतो.
2024 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील 9 पैकी दोन मतदारसंघात राजकीय पक्षांनी महिलांना संधी दिली. भाजपाचे माजी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या कन्या संजना जाधव (Sanjana Jadhav) यांना शिवसेनेकडून कन्नड-सोयगाव मतदारसंघाची उमेदवारी देण्यात आली. तर फुलंब्री मधून भाजपने अनुराधा चव्हाण यांना जिल्हा परिषदेतून थेट विधानसभेवर जाण्याची संधी दिली. या दोन्ही महिला उमेदवारांनी आपापल्या विरोधकांचा पराभव केला.
निवडणुक प्रचारा दरम्यान, संजना जाधव यांनी कन्नड मतदारसंघातील जनतेला आता परिवर्तन हवे आहे, विकासाच्या बाबतीत मागे पडलेला हा तालुका एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली मुख्य प्रवाहात आणायचा आहे, असे आवाहन करत मतं मागितली. मतदारांनी त्यांच्यावर विश्वास दाखवला आणि निवडून दिले. विधानसभा निवडणुकीत महायुतीची सत्ता आल्यानंतरचे दुसरे विधीमंडळ अधिवेशन मुंबईत सुरू आहे. नागपूर अधिवेशनात संजना जाधव यांनी सभागृहात जी काही बोलण्याची संधी मिळाली त्यात मतदारसंघातील प्रश्न मांडण्याचा प्रयत्न केला.
विधीमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असल्याने मतदारसंघातील प्रश्न धसास लावून त्यासाठी निधी मिळवण्यासाठी हे अधिवेशन महत्वाचे असते. तेव्हा आमदार संजना जाधव या मतदारसंघातील कोणत्या प्रश्नांना प्राधान्य देतात आणि त्यांच्या मागण्यांना सरकार किती गांभीर्याने घेते हे मिळालेल्या निधीवरून स्पष्ट होईल. आमदार होऊन जेमतेम चार-पाच महिनेच झाल्याने मतदार एवढ्यात त्यांचे प्रगती पुस्तक तपासणार नाहीत. वर्षभरानंतर मात्र निश्चितच त्यांच्या कामगिरीचे मोजमाप केले जाईल.
बंद कारखाना सुरू होणार का?
राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांनी प्रतिनिधित्व केलेल्या फुलंब्री मतदारंसघातून मतदारांनी अनुराधा चव्हाण यांना विधानसभेवर निवडून पाठवले आहे. त्यामुळे निश्चितच त्यांच्याकडून मोठ्या अपेक्षा आहेत. खऱ्या अर्थाने फुलंब्री मतदारसंघाची निवडणूक गाजली होती ती मतदारसंघातील बंद पडलेल्या देवगिरी कारखान्याच्या मुद्यावरून. काँग्रेस महाविकास आघाडी आणि भाजप महायुतीकडून हा मुद्दा प्रामुख्याने उचलण्यात आला होता. दोन्ही बाजूने पंचवीस वर्षापासून बंद पडलेला देवगिरी साखर कारखाना सुरू करण्याचे आश्वासन निवडणूक प्रचारात देण्यात आले होते.
मतदरांनी अनुराधा चव्हाण यांच्यावर विश्वास दाखवत त्यांना निवडून दिले. देवगिरी कारखाना सुरू करण्यासंदर्भात दिलेला शब्द लक्षात ठेवून चव्हाण यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्र व्यवहार आणि पाठपुरावाही सुरू केला आहे. विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात या संदर्भात काही ठोस निर्णय होतो का? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. चव्हाण या सत्ताधारी भाजपाच्या आमदार असल्याने व राज्यात त्यांच्याच पक्षाचा मुख्यमंत्री हा योग किती कामी येतो हे लवकरच स्पष्ट होईल. एकूणच जिल्ह्यात पहिल्यादांच निवडून आलेल्या या दोन महिला आमदारांकडून मतदारसंघातील लोकांना मोठ्या अपेक्षा आहेत.
२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता का्ॅमस्कोअरमध्ये नंबर १. डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातली नवी झेप
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.