

Phulambri News : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फुलंब्री तालुक्यात मनरेगा योजनेंतर्गत करण्यात आलेल्या पानंद रस्त्यांच्या कामात मोठ्या प्रमाणावर घोटाळा झाल्याचा प्रकार उघडकीस आला होता. याप्रकरणी सात गावांतील रोजगार सेवकांवर निलंबनाची टांगती तलवार लटकली आहे. गणोरी, धामणगाव, महाल किन्होळा, ममनाबाद, शेवता खुर्द, वाणेगाव आणि शेलगाव जानेफळ या गावांमधील पानंद रस्त्यांबाबत मोठी चर्चा सुरू आहे.
कामांमध्ये गंभीर अनियमितता आढळल्याने ग्रामविकास यंत्रणेत एकच खळबळ उडाली आहे. जिल्हा परिषदेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी काही गावांमध्ये प्रत्यक्ष पाहणी केली असता अनेक ठिकाणी काम झालेच नसल्याचे दिसून आले. तर काही ठिकाणी केवळ थातूरमातूर कामे केल्याचे निदर्शनास आले. रोजगार हमी योजनेच्या संकेतस्थळावर एकाच ठिकाणाचे फोटो वारंवार वापरून विविध कामांची नोंद सादर केल्याचा प्रकारही उघडकीस आला आहे.
कागदोपत्री मोठ्या प्रमाणावर निधी खर्च दाखविण्यात आला असला, तरी प्रत्यक्षात कामाचा थांगपत्ता नसल्याचे चित्र आढळले. या अनियमिततेबाबत जिल्हा परिषद प्रशासनाने पंचायत समितीला पत्रव्यवहार करून संबंधित रोजगार सेवकांवर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. मात्र रोजगार सेवकांना निलंबित करण्याचा अधिकार ग्रामसभेला असल्याने आता या सातही गावांमध्ये तातडीने ग्रामसभा बोलाविण्यात येणार आहे.
त्यामुळे रोजगार सेवकांचे भवितव्य ग्रामसभेच्या निर्णयावर अवलंबून राहणार आहे. घोटाळ्याचे गांभीर्य लक्षात घेता चौकशी जलदगतीने पूर्ण करून दोषींवर कठोर कारवाई व्हावी, वसूल केलेला निधी परत मिळवावा व प्रत्यक्ष कामे पूर्ण करण्यात यावीत, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. ग्रामसभा काय निष्कर्ष काढते, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.
पानंद रस्त्यांच्या कामांमध्ये सहभागी असलेल्या तांत्रिक अधिकाऱ्यांचीही चौकशी सुरू आहे. मोजणी अहवाल, अंदाजपत्रक, कामाचा प्रत्यक्ष पुरावा यांची तपासणी करण्यात येत असून दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. फुलंब्री तालुक्यातील धामणगाव येथे उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या पथकाने पानंद रस्त्याची पाहणी करून अनियमितता दिसून आल्याने नाराजी व्यक्त केली आहे. त्यामुळे आता या कामाचे पैसे संबंधितांकडून वसूल का करण्यात येऊ नये? अशी नोटीस रोजगार सेवक, तांत्रिक अधिकारी, सहाय्यक कार्यक्रमाधिकारी यांना गटविकास अधिकारी यांनी दिली आहे.
त्यामुळे आता धामणगाव येथील विविध पानंद रस्त्याचा विषय मोठा चर्चेत आला आहे. पुढील कारवाईकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. दरम्यान, तालुक्यातील सात गावांमध्ये पानंद रस्त्यांमध्ये अनियमितता आढळल्याने संबंधित रोजगार सेवकांबाबतचा निर्णय ग्रामसभेत घेतला जाणार आहे. ग्रामपंचायती ग्रामसभा बोलावून या विषयावर निर्णय घेतील. त्यामुळे ग्रामसभेचा अंतिम निकाल आल्यानंतरच पुढील कारवाई निश्चित होणार असल्याचे सहायक कार्यक्रम अधिकारी महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजना, नितीन भवरे यांनी सांगितले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.