माधव इतबारे
Chhatrapati Sambhajinagar : महापालिकेत प्रशासकीय कारभाराचे पाच वर्षे आज मंगळवारी (ता.29) पूर्ण झाली. आज ना उद्या निवडणुका होतील या अपेक्षेने काम करणारे 'भावी' नगरसेवक अद्याप महापालिकेच्या सभागृहाबाहेरच आहेत. पाच वर्षांच्या कार्यकाळात तीन प्रशासकांनी कारभार हाकला आणि तब्बल 1878 ठराव मंजूर केले. त्यात काही वादग्रस्त प्रस्तावांचाही समावेश आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका न होणे लोकशाहीला बाधक असून, प्रशासन व जनतेमधील दुवाच हरविल्याची चर्चा या निमित्ताने होत आहे.
छत्रपती संभाजीनगर महापालिकेतील (Municipal Corporation) नगरसेवकांची मुदत 2020 मध्ये संपली. पाच वर्षांपूर्वी 29 एप्रिलला तत्कालीन महापौर नंदकुमार घोडेले पायउतार झाल्यानंतर तत्कालीन आयुक्त आस्तिककुमार पांडेय यांची शासनाने प्रशासक म्हणून नियुक्ती केली. पांडेय यांनी दोन वर्षांपेक्षा जास्त कारभार पहिला. त्यांनी 1200 ठराव मंजूर केले. त्यात कोरोना काळात आपत्तीच्या नावाखाली कोट्यवधी रुपयांची उधळपट्टी करण्यात आली. त्यानंतर पांडेय जिल्हाधिकारी झाले व त्यांच्या जागेवर डॉ. अभिजित चौधरी यांची बदली शासनाने केली.
नऊ महिन्यांतच डॉ. चौधरी गेले. त्यानंतर आलेले जी. श्रीकांत अद्याप कारभार पाहत आहेत. प्रशासकीय कार्यकाळात जी. श्रीकांत यांनी अनेक घोषणांचा पाऊस पाडला. (Chhatrapati Sambhajinagar) त्यातील बहुतांश कामे करण्यात त्यांना यश आले. प्रशासकीय कार्यकाळात कामाची गती वाढली असली तरी लोकशाहीला अभिप्रेत लोकप्रतिनिधी महापालिकेत तब्बल पाच वर्षांपासून नाहीत. लोकप्रतिनिधी हे प्रशासन व जनतेमधील दुवा मानले जातात. हा दुवाच संपल्याने प्रशासनाची मनमानी वाढल्याचा आरोपही वारंवार केला जात आहे.
नेते सभागृहात, कार्यकर्ते रस्त्यावरच
आज ना उद्या महापालिकेच्या निवडणुका होतील, अशी अपेक्षा बाळगून अनेकजण जनतेमध्ये जाऊन कामे करत आहेत. पाच वर्षांच्या काळात लोकसभा, विधानसभेच्या निवडणुका झाल्या. या निवडणुका नेत्यांच्या मानल्या जातात तर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका कार्यकर्त्यांच्या मानल्या जातात. मात्र, नेते सभागृहात जाऊन बसले तर कार्यकर्ते अद्याप रस्त्यावरच असल्याचे चित्र आहे.
सुरवातीला कोरोना संसर्गामुळे महापालिकेच्या निवडणुका लांबणीवर पडल्या होत्या. त्यानंतर ओबीसी आरक्षणाचा विषय समोर आला. आरक्षणाच्या मुद्द्यावर सध्या सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. जोपर्यंत न्यायालयातून हा प्रश्न सुटणार नाही, तोपर्यंत महापालिकेच्या निवडणुका होणार नाहीत, असे सांगितले जात आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी महापालिकेच्या निवडणुका होतील, असा अंदाज सुरवातीलाच बांधला जात होता. त्यानंतर विधानसभा निवडणुकीपूर्वी अशीच चर्चा सुरू झाली.
आता दिवाळीच्या सुमारास म्हणजेच सप्टेंबर किवा ऑक्टोबर 2025 मध्ये महापालिकेच्या निवडणुका होतील, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. वारंवारच्या अंदाजामुळे अनेक भावी नगरसेवक जनतेमध्ये जाऊन काम करत आहेत. पण, त्यांचा वारंवार हिरमोड होत आहे. पाच वर्षांच्या कार्यकाळात प्रशासकांनी गतीने कामे केले असले तरी लोकशाहीत निवडणुकांना एवढा विलंब अपेक्षित नाही. जगात आपली लोकशाही बलाढ्य असल्याचे सांगितले जाते आणि लोकशाहीत लोकप्रतिनिधी असणे अपेक्षित आहे, असे मत माजी महापौर नंदकुमार घोडेले यांनी व्यक्त केले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.