

Mahayuti-Mahavikas Aghadi News : होणार-होणार म्हणून युती, आघाडीच्या नेत्यांनी दिलेल्या तारखांचे रुपांतर आता तारीख पे तारीखमध्ये व्हायला लागले आहे. अनेक इच्छुक उमेदवारांनी प्रचाराला सुरुवात केली आहे, उमेदवारीची अपेक्षा सोडलेले दुसरीकडून उमेदवारी मिळवण्याच्या प्रयत्नात आहेत. तर अनेक जण अजूनही पक्षाने दिलेल्या आश्वासनाची वाट पाहात आहेत. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी दोनच दिवस शिल्लक असतांनाही भाजपा-शिवेसना युती व काँग्रेस-शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून आघाडीची घोषणा मात्र होत नाहीये.
बंडखोरीच्या भितीने युती-आघाडीचे घोडे अडल्याचे बोलले जात आहे. महानगरपालिका निवडणूकीत भाजप व शिवसेना यांच्यात युती तर काँग्रेस व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यात आघाडी होणार असल्याचे या चारही पक्षाच्या नेत्यांनी वेळोवेळी जाहीर केले. सर्वच पक्षांकडे सर्वच प्रभागात सक्षम उमेदवार आहेत असे नाही. परंतु युती व आघाडीतील घटक पक्षांचे सक्षम उमेदवार एकाच प्रभागात अनेक ठिकाणी येत असल्यामुळे नेत्यांमध्ये केवळ चर्चेच्या फेऱ्या सुरु आहेत.
युती व आघाडीतील घटक पक्षांमध्ये जागा वाटपासाठी बैठकावर बैठकांचे सत्र सुरु आहे. परंतु कोणत्या प्रभागात कोणती जागा कुठल्या पक्षाने लढावी? यावर एकमत होत नसल्याचे बोलले जाते. काही ठिकाणी एका पक्षाचे दोन ते तीन तर कुठे चारही उमेदवार सक्षम असल्याने तो पक्ष मित्र पक्षाला जागा सोडायला तयार नाही. प्रत्येक पक्षाकडे बहुतांश प्रभागात किमान दोन तरी उमेदवार असल्याने युती-आघाडीचा घोळ संपेनासा झाला आहे. कोणी किती जागा लढवयाच्या? यावर देखील मंथन सुरु आहे.
युती व आघाडीतील प्रत्येक पक्ष आपलेच घोडे दामटण्याचा प्रयत्न करीत असल्याचे चित्र आहे. अनेक पक्षांनी आपले उमेदवार प्रभागात फिरवण्यास सुरुवात करुन मित्र पक्षावर दबाव निर्माण कऱण्याचा प्रयत्न देखील चालवला आहे. त्यामुळे या पक्षांमध्ये युती-आघाडी जरी झाली तरी अनेक ठिकाणी मैत्रीपुर्ण लढतीच्या गोंडस नावाखाली हे पक्ष एकमेकांच्या समोर येण्याची देखील शक्यता आहे.
दुसरीकडे शहरातील प्रतिष्ठीत व्यापारी, डॉक्टर्स, सेवानिवृत्त अधिकारी अशा अराजकीय व्यक्तींच्या कुटूंबातील सदस्यांना निवडणूकीत उतरवण्यासाठी काही पक्ष व त्यांचे नेते प्रयत्नशील आहेत. त्यामुळे निष्ठावंत पक्षाच्या कार्यकर्त्यांना थोपवून ठेवण्यात आले आहे. त्यापैकी काहींनी उमेदवारी अर्ज खरेदी केले, ना हरकत प्रमाणपत्रे देखील मिळवली आहेत.
कोणत्या पक्षात कोणत्या उमेदवाराला उमेदवारी मिळत नाही, कोणते उमेदवार नाराज आहे? अशांकडे विरोधी पक्षाच्या नेत्यांचे बारीक लक्ष आहे. अशांना हस्ते परहस्ते निरोप धाडले जात असून पक्षात येण्याची गळ देखील घातली जात आहे. त्यामुळे काही पक्षांतरे झाली आहेत व पुढील दोन दिवसावर मोठ्या संख्येने पक्षांतरे होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
दरम्यान, महायुतीतील भाजपा, शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित पवार) तसेच महाविकास आघाडीतील (Mahavikas-Aghadi) शिवसेना (ठाकरे) व काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनी महापालिकेवर आपल्याच पक्षाची सत्ता आणणार असल्याचा दावा वेळोवेळी केला आहे. त्यामुळे या पक्षांनी युती-आघाडी न झाल्यास स्वतंत्रपणे निवडणूक लढविण्याची तयारी देखील केली आहे.
युती-आघाडी न झाल्यास अनेक पक्षांना संपूर्ण 16 प्रभागातील 65 जागांवर उमेदवार देणे देखील शक्य होणार नाही. राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षाने मात्र युती, आघाडीच्या भानगडीत न पडता उमेदवार कामाला लावल्याचे चित्र आहे. तसेच अन्य पक्षातून येणाऱ्या सक्षम उमेदवारांना उमेदवाऱ्या देऊन त्या-त्या पक्षांना धक्का देखील दिला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.