

Phulambri News, 21 Jan : गेल्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना-भाजप युती असताना शिवसेनेचे तत्कालीन जिल्हाप्रमुख रमेश पवार यांनी भाजपच्या अधिकृत उमेदवार अनुराधा चव्हाण यांच्या विरोधात बंडखोरी करत अपक्ष निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. शिवसेनेकडून त्यांच्यावर हकालपट्टीची कारवाई देखील करण्यात आली.
परंतु वर्षभरानंतर लगेच रमेश पवार यांची पक्षात घर वापसी झाली आणि पूर्वीचे जिल्हाप्रमुख पद शिवसेना मुख्य नेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रमेश पवार यांना बहाल केले. या नियुक्तीनंतर फुलंब्री विधानसभा मतदारसंघात भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये शिवसेनेबद्दल असंतोष वाढला आहे. फुलंब्री विधानसभा मतदारसंघातील महायुतीच्या राजकारणात पुन्हा एकदा अंतर्गत संघर्ष चव्हाट्यावर आला आहे.
भाजप-शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेसच्या महायुतीत सर्व काही सुरळीत असल्याचे चित्र रंगवले जात असले, तरी प्रत्यक्षात मात्र एकमेकांवर कुरघोडीचे राजकारण सुरूच असल्याचे दिसून येत आहे. ऑक्टोबर 2024 च्या विधानसभा निवडणुकीत फुलंब्री मतदारसंघात महायुतीकडून अनुराधा चव्हाण यांना अधिकृत उमेदवारी देण्यात आली होती. मात्र या निर्णयाला छेद देत शिवसेनेचे तत्कालीन जिल्हाप्रमुख रमेश पवार यांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला होता.
महायुतीच्या शिस्तीला हरताळ फासणाऱ्या या भूमिकेमुळे शिवसेना व भाजपच्या नेत्यांनी रमेश पवार यांना उमेदवारी मागे घेण्यासाठी प्रयत्न केले. मात्र सर्व प्रयत्न निष्फळ ठरले. या बंडखोरीची गंभीर दखल घेत शिवसेनेने रमेश पवार यांची पक्षातून हकालपट्टी केली होती. रमेश पवार हे खासदार संदीपान भुमरे व आमदार विलास भुमरे यांचे खंदे समर्थक मानले जातात. या दोन्ही नेत्यांनीही त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला होता, मात्र त्यांनी कोणाच्याही दबावाला न जुमानता निवडणूक लढवली.
मात्र निवडणूक पार पडून अवघ्या वर्षभरातच राजकीय चित्र बदलले. ज्या रमेश पवार यांना बंडखोरीमुळे पक्षाबाहेरचा रस्ता दाखवण्यात आला होता, त्यांच्याकडेच पुन्हा शिवसेनेच्या जिल्हाप्रमुख पदाची सूत्रे देण्यात आली. महायुतीत भाजपच्या उमेदवारा विरोधात शिवसेनेतून बंडखोरी करीत अपक्ष लढणारे नेते पुन्हा एकदा त्याच शिवसेनेचे जिल्हाप्रमुख झाल्याने राजकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
या निर्णयामुळे शिवसेना व भाजप यांच्यातील अंतर्गत विसंवाद पुन्हा उफाळून आला आहे. वरवर युती टिकवण्याचा प्रयत्न होत असला, तरी आतून मात्र अविश्वास आणि असंतोष वाढत असल्याचे चित्र आहे. विशेष म्हणजे, बंडखोरी करूनही पुन्हा पक्षात मानाचे पद मिळू शकते, असा संदेश कार्यकर्त्यांमध्ये जात असल्याची चर्चा आहे. त्यामुळे पक्षनिष्ठा, शिस्त आणि संघटनात्मक बांधिलकी यावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
आता पुन्हा भाजप-शिवसेना युती झाली असताना, अशा घटनांमुळे भविष्यात बंडखोरीचे प्रकार वाढण्याची शक्यता व्यक्त होत आहे. फुलंब्रीतील हा प्रकार केवळ एका पदापुरता मर्यादित नसून, महायुतीतील अंतर्गत राजकारण, सत्तासमीकरणे आणि पक्षशिस्तीचे वास्तव असल्याचे दिसून येते.
राज्याच्या सत्तेत शिवसेना-भाजप महायुतीचा घटक पक्ष असले तरी स्थानिक पातळीवर दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये संघर्ष जडू लागला आहे. जिल्हा परिषद निवडणुकीसाठी काल शिवसेना-भाजप युती जाहीर होताच वैजापूर मधील संतप्त कार्यकर्त्यांनी युती तोडा अशी मागणी करत मंत्री अतुल सावे खासदार भागवत कराड यांच्यासमोरच घोषणाबाजी केली होती
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.