

पुण्यातील नरसापूरमध्ये चिमुरडीवर अत्याचार करून हत्या केल्याने संतापाची लाट
या घटनेविरोधात आंदोलन करणाऱ्या लोकांवर पोलिसांनी लाठीचार्ज केल्याचा आरोप
शिवसेना आमदारांनी सरकारला कायदा सुव्यवस्थेवर प्रश्न उपस्थित केला
Dharashiv News : पुण्याच्या नरसापूरमध्ये एका निष्पाप चिमुरडीवर तिच्या आजोबाच्या वयाच्या नराधमाने अत्याचार करून तिचा खून केला. या संतापजनक घटनेनंतर सर्वसामान्यांचा आक्रोश रस्त्यावर दिसू लागला आहे. महिला, विद्यार्थीनी, तरुणींकडून या नराधमाला जाहीर फाशीची शिक्षा द्या, अशी मागणी करत लोक रस्त्यावर उतरून आंदोलन करत आहे. मात्र पोलीसांची दंडेलशाही या आंदोलकांवरच सुरू असल्याचा आरोप केला जात आहे.
रास्तारोको करणाऱ्या आंदोलकांना हटवण्यासाठी पोलीसांनी लाठ्या चालवल्यानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे धाराशीवचे आमदार कैलास पाटील यांनी संताप व्यक्त करत सरकारला नेमकं कोणाचं संरक्षण करायचं आहे, गुन्हेगारांचं की जनतेचं? असा सवाल केला आहे. पुण्यातील नसरापूर येथे एका निष्पाप चिमुकलीवर झालेला अमानुष अत्याचार आणि तिची निर्घृण हत्या ही केवळ संतापजनक नाही, तर संपूर्ण समाजव्यवस्थेच्या संवेदनशीलतेवरच प्रश्नचिन्ह उभे करणारी घटना आहे.
या घटनेने महाराष्ट्राच्या मातीला काळीमा फासला असून, मानवतेचा कळसच ढासळल्याचे चित्र समोर आले आहे. या राक्षसी कृत्य करणाऱ्या गुन्हेगारांना कोणतीही दया न दाखवता कायद्यातील सर्वात कठोर शिक्षा दिलीच पाहिजे. केवळ निषेध, शोक आणि आश्वासनांच्या पलीकडे जाऊन ठोस आणि पारदर्शक कारवाई झाली नाही, तर जनतेचा न्यायव्यवस्थेवरील विश्वास पूर्णपणे ढासळेल, अशी प्रतिक्रिया कैलास पाटील यांनी व्यक्त केली.
अधिक संतापजनक बाब म्हणजे न्यायासाठी रस्त्यावर उतरलेल्या नागरिकांवरच लाठीचार्ज करण्याची वेळ प्रशासनावर का आली? गुन्हेगारांना कठोर शिक्षा व्हावी म्हणून आवाज उठवणाऱ्यांवर दडपशाही करणे, ही कोणती न्यायव्यवस्था आहे? सरकारला नेमकं कोणाचं संरक्षण करायचं आहे, गुन्हेगारांचं की जनतेचं? महिला आरक्षणाच्या नावाखाली मोठमोठे राजकीय कार्यक्रम, विशेष अधिवेशने आणि घोषणाबाजी केली जाते, पण महिलांच्या सुरक्षेबाबत मात्र अशी उदासीनता का?
केवळ राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षणाचा मुद्दा पुढे केला जातो, पण प्रत्यक्षात महिलांच्या आणि बालिकांच्या सुरक्षिततेसाठी ठोस पावले उचलण्याची इच्छाशक्ती का दिसत नाही? राज्यातील महिला व बालसुरक्षा यंत्रणा केवळ कागदोपत्री न राहता प्रत्यक्षात कार्यक्षम झाली पाहिजे.
पोलिस, प्रशासन आणि समाज यांच्यातील समन्वय हा फक्त बैठकीपुरता न राहता तो जमिनीवर उतरला पाहिजे. अन्यथा अशा घटना थांबणार नाहीत आणि प्रत्येक वेळी फक्त संताप व्यक्त करण्यापलीकडे काहीही होणार नाही, अशा शब्दात भावना व्यक्त करतानाच कैलास पाटील यांनी त्या निष्पाप लेकराला त्वरित न्याय मिळालाच पाहिजे, अशी मागणी केली.
1. नरसापूरमध्ये काय घटना घडली
एका चिमुरडीवर अत्याचार करून तिची हत्या करण्यात आली
2. या घटनेनंतर काय घडले
लोक रस्त्यावर उतरून आंदोलन करू लागले
3. पोलिसांवर कोणते आरोप आहेत
आंदोलनकर्त्यांवर लाठीचार्ज केल्याचा आरोप आहे
4. या प्रकरणात राजकीय प्रतिक्रिया काय आहे
शिवसेना आमदारांनी सरकारवर प्रश्न उपस्थित केला
5. या घटनेचा पुढील परिणाम काय होऊ शकतो
कायदा सुव्यवस्थेवर चर्चा आणि आंदोलन तीव्र होऊ शकते
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.