
Jalna News : सध्या राज्यामध्ये राज-उद्धव ठाकरे या दोन भावांच्या एकत्र येण्याच्या चर्चा सुरू आहेत. हे दोघे एकत्र आले तरी फार फरक पडणार नाही. पण ते एकत्र येणार असतील तर मग मला आणि प्रकाश आंबेडकर यांना एकत्र यावे लागेल, असे म्हणत केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी पुन्हा एकदा ऐक्याची साद घातली.
जालना येथे माध्यमांशी संवाद साधताना आठवले (Ramdas Athvale) यांनी भारत-पाकिस्तान युद्ध, डोनाल्ट ट्रम्प यांची भूमिका आणि दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या मुद्यावर आपली भूमिका मांडली. मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेनेचे उद्धव ठाकरे हे दोन भाऊ एकत्र येणार असल्याची चर्चा राज्याच्या राजकारणात काही दिवसांपासून सुरू आहे. यावर आठवले यांनी मत मांडताना उद्धव ठाकरे-राज ठाकरे आणि शरद पवार-अजित पवार एकत्र येत असतील तर मला आणि प्रकाश आंबेडकर यांना एकत्र यावं लागेल.
शरद पवार आणि अजित पवार एकत्र होते आणि आजही एकत्र आहेत. अजित पवारांचं म्हणणं एकच होतं की, तुम्हाला शिवसेना चालते तर भाजप का चालत नाही? (Sharad Pawar) शरद पवारांसारखा माणूस पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या खांद्याला खांद्या लावून या देशाच्या प्रगतीसाठी, शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी सोबत आले असते तर ते देशाचे राष्ट्रपती होऊ शकले असते. अजूनही ती वेळ गेलेली नाही. शरद पवार हे अजित पवार यांच्यासोबत एकत्र येऊन त्यांचा एनडीएला पाठिंबा मिळत असेल तर शरद पवार यांचे स्वागतच आहे, असे आठवले म्हणाले.
दोन ठाकरे बंधू आणि शरद पवार अजित पवार काका पुतणे एकत्र येत असतील तर मला आणि प्रकाश आंबेडकर यांना एकत्र यावं लागेल. राज आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार नाहीत, आले तरी महाविकास आघाडीमध्ये फूट पडेल आणि त्याचा आम्हाला म्हणजेच महायुतीला फायदा होईल. दोघांना एकत्रित यायचं असेल तर त्यांनी यावं. पण, त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये फारसा बदल होणार नाही, असा टोलाही आठवले यांनी यावेळी लगावला.
भारत थेट पाकिस्तानशी चर्चा करेल..
डोनाल्ड ट्रम्प यांच्या बद्दल आम्हाला आदर आहे. पण, पाकव्याप्त काश्मीर आमच्या ताब्यात आलं पाहिजे, त्यासाठी युद्ध केलं पाहिजे. वेळ आली तर पाकिस्तानला ताब्यात घेतलं पाहिजे, ही भूमिका मी अनेक वेळा मांडली आहे. डोनाल्ड ट्रम्प आणि कोणाची मध्यस्थी आम्हाला यामध्ये नको आहे.
आतंकवादी कारवाया थांबवल्या आणि पाकव्याप्त काश्मीर आम्हाला सोपवला तर भारत थेट पाकिस्तानशी चर्चा करायला तयार आहे. त्यासाठी युद्ध करण्याची गरज नाही. पाकव्याप्त काश्मीर आम्हाला मिळाला पाहिजे. युद्ध विरामासाठी पाकिस्तानकडून विनंती करण्यात आली होती, असा दावाही आठवले यांनी केला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.