
Killari Earthquake : किल्लारी, सास्तूर भागातील महाप्रलंयकारी भूकंपाला आज (३० सप्टेंबर) ३० वर्षे पूर्ण झाली. त्या भूकंपानंतर तातडीने पुनर्वसन केल्याबद्दल किल्लारी येथे ३० सप्टेंबर रोजी तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांच्याबद्दल कृतज्ञता सोहळा आय़ोजित करण्यात आला होता. या सोहळ्यात खासदार सुप्रिया सुळे यांना माजी मंत्री डाॅ. पद्मसिंह पाटील आणि माजी मुख्यमंत्री दिवंगत विलासराव देशमुख यांची आठवण आली. संदर्भ होता या दोन नेत्यांनी भूकंपानंतर मदतकार्यात आणि पुनर्वसनात शरद पवार यांच्या खांद्याला खांदा लावून काम केल्याचा.
या कामासाठी सुप्रिया सुळे यांना विलासरावांची आठवण येणे साहजिक आहे. मात्र, डाॅ. पद्मसिंह पाटील यांची आठवण येण्यामागे मोठा इतिहास आहे. शरद पवार यांच्या आय़ुष्यात आतापर्यंत आलेल्या संकटकाळात, संघर्षाचा काळाच डाॅ. पद्मसिंह पाटील हे सावलीप्रमाणे त्यांच्या पाठीशी राहिले होते. ते पवारांसाठी ट्रबल शूटरच होते. अजित पवार हे काही आमदारांसह राष्ट्रवादी काँग्रेसमधून नुकतेच बाहेर पडले. शरद पवार यांच्या राजकीय कारकिर्दीतील हे मोठे धक्के आहेत. नेमक्या याच प्रसंगात डाॅ. पद्मसिंह पाटील हे पवारांसोबत नाहीत. यामुळेच त्यांच्या आठवणीने सुप्रिया सुळे व्याकूळ झाल्या.
लोकसभेच्या गेल्या निवडणुकीनंतर डॅा. पद्मसिंह पाटील यांचे पुत्र आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये प्रवेश केला. पवार आणि पाटील कुटुंबीयांमध्ये नातेसंबंधही आहेत. शरद पवारांसाठी हा प्रचंड मोठा धक्का होता. भाजपमध्ये प्रवेश करण्यापूर्वी कार्यकर्त्यांची मते जाणून घेण्यासाठी राणाजगजितसिंह यांनी मेळावा आयोजित केला होता. त्यावेळी राणाजगजितसिंह यांना अश्रू अनावर झाले होते.
शरद पवार आणि राष्ट्रवादीशी पाटील कुटुंबीयांचे नाते किती आपुलकीचे, किती घट्ट होते, याची प्रचिती त्यावेळी आली होती. डाॅ. पाटील हे आता राजकारणातून निवृत्त झालेले आहेत. त्यांच्या राजकीय कारकिर्दीच्या अगदी सुरुवातीपासून ते शरद पवार यांच्यासोबत होते. फक्त सोबतच नव्हते तर ते पवार यांचे खंदे पाठीराखे होते. पवार यांच्यानंतर पक्षात डाॅ. पाटील यांच्याच शब्दाला मान असायचा. १९९२ च्या मुंबईतील बाॅम्बस्फोटांवेळी सुधाकरराव नाईक मुख्यमंत्री होते. त्यावेळी शरद पवार केंद्रात मंत्री होते. दंगली आटोक्यात आणण्यासाठी पक्षश्रेष्ठींनी पवार यांना मुख्यमंत्री म्हणून राज्यात पाठवले.
पवारांना राज्यात पाठवण्यात आले आणि नाईकांना सांगण्यात आले की, तुम्हाला हटवण्यासाठी पवार आग्रही आहेत. त्यामुळे निष्ठावंत आणि पवार समर्थक असा संघर्ष सुरू झाला. शरद पवार यांच्याविरोधात बंड करण्यासाठी निष्ठावंतांना एकप्रकारे दिल्लीतूनच फूस मिळाली होती. त्यावेळी सुशीलकुमार शिंदे प्रदेशाध्यक्ष होते. त्यांच्यासोबत विलासराव देशमुख आणि इतर मंत्र्यांनी शरद पवार यांना हटवण्याची मागणी केली होती. निष्ठावंत मंत्री, आमदारांची संख्या १२ - १३ होती. त्यावेळी डाॅ. पद्मसिंह पाटील यांनी आक्रमक होत त्यांच्या शैलीत हे बंड उधळून लावले होते. त्यावेळी हे प्रकरण खूप गाजले होते. अशा अनेक प्रसंगात डाॅ. पाटील यांनी शरद पवारांना साथ दिली होती.
आता उतारवयात शरद पवार यांना कुटुंबातूनच विरोधाचा सामना करावा लागला. त्यांचे अनेक बिनीचे शिलेदार, त्यांनी मोठे केलेलं अनेकजण सोडून गेले आहेत. २०१९ च्या विधानसभा निवडुकीपूर्वी अनेक जणांनी पवारांची साथ सोडली होती. पवारांनी त्यावेळी प्रचंड जिद्दीने राष्ट्रवादीचे ५३ आमदार निवडून आणले. महाविकास आघाडी स्थापन करून ते शिवसेना आणि काँग्रेससह ते सत्तेत आले. शिवसेना फुटल्यामुळे महाविकास आघाडीची सत्ता गेली. त्यानंतर राष्ट्रवादीतही उभी फूट पडली. यावेळचा धक्का प्रचंड मोठा होता, कारण त्यांचे पुतणे अजित पवार यांनी राष्ट्रवादीला सुरुंग लावला होता. अजित पवारांसोबत जवळपास ४० आमदार गेले आहेत.
पवारांचे अत्यंत निकटवर्तीय समजले जाणारे प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ यांनीही त्यांची साथ सोडली आहे. नुसती साथच सोडली नाही तर त्यांनी शरद पवार यांच्यावर विविध आरोपही केले आहेत. या प्रसंगात डाॅ. पद्मसिंह पाटील शरद पवार यांच्यासोबत नाहीत. डाॅ. पाटील यांची प्रकृती ठणठणीत असती आणि ते जर या प्रसंगात शरद पवार यांच्यासोबत असते तर फुटीरांना त्यांनी सळो की पळो करून सोडले असते. कदाचित त्यांनी हे बंड शमवलेही असते, किमान काही जणांना थांबवले तरी असते. त्यामुळे सुप्रिया सुळे यांना डाॅ. पद्मसिंह पाटील यांची आठवण येणे साहजिक आहे.
Edited By- Anuradha Dhawade
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.