
दत्ता देशमुख
Beed : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची बीडमध्ये गुरूवारी जाहीर सभा झाली. यावेळी त्यांनी मणिपूर हिंसाचार, कळवा हॉस्पिटल मृत्यू प्रकरण यांसारख्या विषयांवर भाष्य करून शिंदे-फडणवीस सरकार आणि मोदी सरकारवर हल्लाबोल केला होता. तसेच अजित पवार गटालाही धारेवर धरले. त्यांनी कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्यावरही निशाणा साधला. पण त्यांनी आपल्या भाषणात मुंडेंच्या नावाचा उल्लेख टाळला. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी धनंजय मुंडेंना टार्गेट केलेच.
राज्यात गेल्या महिन्यात घडलेले नवे राजकीय समीकरण, सोडून गेलेल्या नेत्यांची पवारांवर टीका आणि त्यानंतर मैदानात उतरुन काहीसा विसावा घेतलेल्या शरद पवार यांनी गुरुवारी बीडमधील सभेत कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर नाव न घेता टीका केली. लोक सत्ता उलथून टाकण्यासाठी एकत्र येत असल्याचा इशाराही दिला. तर, माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी मात्र मुंडेंवर जोरदार हल्लाबोल केला.
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, माजी मंत्री अनिल देशमुख, माजी मंत्री राजेश टोपे यांनी केंद्र सरकार व राज्य सरकारच्या धोरणांवर हल्लाबोल केला. राज्यात गेल्या महिन्यात नवे राजकीय समीकरण उदयास आल्यानंतर शरद पवार यांनी महाराष्ट्राचा दौरा करण्याचे जाहीर करुन मंत्री छगन भुजबळ यांच्या येवला (जि. नाशिक) मतदारसंघात सभा घेतली. त्यानंतर दीड महिन्यांच्या खंडानंतर पुन्हा त्यांची पहिली सभा गुरुवारी बीडमध्ये झाली. पवारांना सोडून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत सत्तेत गेलेल्या धनंजय मुंडे यांचा जिल्हा असल्याने मुंडेंबाबत कोण काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.
शरद पवार(Sharad Pawar) यांनी आपल्या भाषणाचा मुळ रोख पंतप्रधान नरेंद्र मोदींवर ठेवत मणिपूर हिंसाचाराचा मुद्दा अधोरेखीत केला. तसेच, शेतकऱ्यांसह सामान्यांच्या प्रश्नांकडे होत असलेल्या दुर्लक्षावर बोट ठेवले. तसेच पंतप्रधानांच्या पुन्हा येणार याचीही त्यांनी खिल्ली उडविली. नाव घेतले नसले तरी शरद पवारांनी सत्तेचा गैरवापर केला लोक सत्ता उलथविण्यासाठी एकत्र येत असल्याचा इशारा नाव न घेता धनंजय मुंडे(Dhananjay Munde) यांना दिला. पवारांनी १९८० सालच्या एस काँग्रेसच्या काळातील आठवणही सांगितली. त्याकाळी त्यांच्या काँग्रेसला जिल्ह्यातील सर्वच जागा जिंकता आल्या होत्या.
जितेंद्र आव्हाडां(Jitendra Awhad)नी मात्र धनंजय मुंडेंवर तोफ डागली. सभेपूर्वी शहरात मुंडे समर्थकांनी शरद पवारांचा फोटो लाऊन आशीर्वाद द्या, या बॅनरच्या मुद्द्यावर 'अरे पळकुट्या, 'नाव तर लिहायचं' असा हल्ला चढविला. तसेच, असे घडले नसते तर संदीप क्षीरसागर यांना नेतृत्व करण्याची संधी मिळाली नसती, असेही आव्हाड म्हणाले.
दिवंगत पंडितअण्णा मुंडे व धनंजय मुंडे यांना शरद पवारांनी वर्षभर प्रवेश दिला नव्हता, घर वाचवा असे दिवंगत मुंडेंना पवारांनी सांगितले होते, असे सांगत थेट राक्षसी वृत्ती थांबवू शकले नाहीत असा घणाघातही त्यांनी केला
प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी कॅगने केंद्रावर ओढलेले ताशेरे, विविध राज्यांतील हिंसाचार, जातीय दंगली तसेच भाजपशासित राज्यांतील अनियमिततेवर बोट ठेवत केंद्र व राज्य सरकारवर टीका केली. संयोजक संदीप क्षीरसागर यांनी तर राष्ट्रवादीत फुटीपूर्वीच्या भाषणांचा उल्लेख करत धनंजय मुंडे यांनी नक्कल केली. तर, अनिल देशमुख यांनीही आशीर्वाद मागता आणि दुसरीकडे मोठ्या पवारांना घरी बसविण्याचे कारस्थान रचता असा आरोप केला.
राज्यात महिलांची सुरक्षा धोक्यात असल्याचा आरोप करत जानेवारीपासून १९ हजार महिला व मुली गायब असल्याचे सांगितले. राजेश टोपे यांनी राज्य सरकारच्या धोरणांवर टीका केली. युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख व सक्षणा सलगर यांनीही पवारांपासून दुरावलेल्यांवर टीकास्त्र सोडले.
(Edited By Deepak Kulkarni)
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.