Chhatrapati Sambhajinagar Lok Sabha Election: पराभवाच्या भीतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या पायाखालची वाळू सरकली असून, प्रचार सभेत ते दंगल भडकवणारी भाषणे करत आहेत. एका मुख्यमंत्र्याला शोभणारी ही भाषा नाही, यासंदर्भात आपण निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार आहोत, असं शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मंगळवारी (7 मे) रोजी छत्रपती संभाजीनगर लोकसभा (Chhatrapati Sambhajinagar Lok Sabha) निवडणुकीतील महायुतीचे उमेदवार संदीपान भुमरे यांच्या प्रचारार्थ बजाजनगर येथे सभा झाली. या सभेतील शिंदेंच्या भाषणावर अंधारे (Sushma Andhare) यांनी आक्षेप घेतला. राज्याचे मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांनी छत्रपती संभाजीनगरातील विकासावर बोलले पाहिजे. किती उद्योग आणले, विकास कामे काय केली? महिलांच्या सुरक्षेसाठी काय केले? याची माहिती द्यायची सोडून ते औरंजेबाची कबर कोणी सजविली? असा प्रश्न विचारुन जातीय तणाव निर्माण करण्याचे काम करत आहेत.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
उद्या छत्रपती संभाजीनगर मध्ये दंगल झाली तर एकनाथ शिंदेच त्याला जबाबदार असतील. त्यामुळे आपण शिंदे यांच्या विरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार आहोत. आयोगाने देखील कुठल्याही दबावाला बळी न पडता त्यांच्यावर कारवाई करावी, अशी अपेक्षा असल्याचंही अंधारे यावेळी म्हणाल्या. मुख्यमंत्र्यांच्या भाषणाची स्क्रिप्ट कोण लिहिते असा प्रश्न करत त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची स्क्रिप्ट त्यांनी वाचू नये, असा टोलाही शिंदे यांना लगावला.
मतदानानंतर तीन तासात वाढीव मतांची टक्केवारी जाहीर केली जाते, पण निवडणूक आयोगाने चार दिवसानंतर वाढीव मतांची टक्केवारी जाहीर केली आहे. त्यात दोन ते सात टक्क्यांपर्यंत मतदान वाढल्याचे स्पष्ट केले आहे. त्यावर सुषमा अंधारे यांनी शंका उपस्थित केली. दुसरीकडे मतदानाची टक्केवारी घटत आहे. बारामती मतदारसंघात फक्त 47 टक्के मतदान झाले. 53 टक्के लोकांच्या मतांचा विचार कोण करणार? असा प्रश्न अंधारे यांनी केला.
निवडणुकीत मतदानासाठी पैसे वाटले जात असल्याचे व्हीडिओ समोर येऊनदेखील निवडणूक आयोग कारवाई करत नसल्याचा आरोप अंधारे यांनी केला. त्यात धाराशिव जिल्ह्यात शिवसेना ठाकरे गटाच्या युवा सैनिकाचा खून तानाजी सावंत यांच्या गावगुंडांनी केला. निवडणुकीत अशा प्रकारच्या घटना घडत असतील तर हे नापास, अकार्यक्षम फडणवीसांमुळे (Devendra Fadnavis) गेलेला बळी आहे, असल्याचंही अंधारे म्हणाल्या.
(Edited By Jagdish Patil)
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.