
Beed News : विधानसभा निवडणुकीत महायुतीनं राज्यात महाविकास आघाडीला धोबीपछाड दिला. महायुतीनं 288 पैकी 230 जागा जिंकल्या आहेत. त्यात भाजपनं 132, शिवसेना 57,राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षानं 41 जिंकल्या असून 4 अपक्षांनी आपला पाठिंबा दिल्यामुळे महायुती 234 वर पोचली आहे. तर महाविकास आघाडीचा धुव्वा उडाला असून 50 चा आकडाही गाठता आलेला नाही. एकीकडे विजयाचा जल्लोष सुरू असतानाच भाजपच्या गोटातून धक्कादायक बातमी समोर आली आहे.
भाजप आमदार सुरेश धस (Suresh Dhas) यांनी आष्टी मतदारसंघात विजय खेचून आणतानाच तब्बल 77,975 मताधिक्य मिळवलं. पण याच सुरेश धसांनी निवडून आल्यानंतर आता थेट भाजपच्या विधान परिषदेच्या आमदार आणि राष्ट्रीय सरचिटणीस पंकजा मुंडे यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे.
आमदार सुरेश धस यांनी भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांच्यावर गंभीर आरोप केला आहे.ते म्हणाले, पंकजाताई राजकारणात तुम्ही माझ्यासारख्या प्रामाणिक माणसाला गमावून बसलात.आजपासून तुम्ही मला गमावलंत. तुमचे माझ्याविरोधात फोन यायला नको होते. मी कायम तुमचा मानसन्मान राखला. प्रामाणिकपणे मी तुमच्याबरोबर राहिलो. मी तुमचं काम केलं. मात्र तुम्ही काय केलंत? तुम्ही मला पाडा म्हणून सांगितलं. तुम्ही तरी असे फोन करायला नको होतं, अशा शब्दांत धस यांनी विजयाचा गुलाल उधळल्यानंतर आता पंकजा मुंडे यांच्याविषयी उघडउघड नाराजी व्यक्त केली आहे.
सुरेश धस यांनी थेट पंकजा मुंडे यांच्या स्वीय सहाय्यकाचं नाव घेत हे आरोप केल्यामुळे नवा वाद पेटण्याची शक्यता आहे. संकेत सानप यांनी माझ्या मतदारसंघात फोन केले, ते सतत पंकजा मुंडेंबरोबर असतात.त्यांनी फोन करायला नको होते मला त्यांना सांगायचं आहे की, आम्ही तळहाताच्या फोडाप्रमाणे हा वंजारी समुदाय जपला आहे. ते प्रामाणिकपणे माझ्याबरोबर आहेत असंही धस यावेळी म्हणाले.
पंकजा मुंडे यांनी त्यांच्या स्वीय सहाय्यकाला सांगून अपक्ष उमेदवाराला मतदान करायला सांगितलं. त्यांच्या स्वीय सहाय्यकानं माझ्या मतदारसंघात मला मतं मिळू नये यासाठी काम केलं. मुंडेंनी असं करायला नको होतं. तुम्ही प्रामाणिक माणसाला गमावलं असल्याचंही धस यांनी सांगितलं.
आष्टी मतदारसंघाची विधानसभा निवडणूक जिंकल्यानंतर भाजप उमेदवार सुरेश धस यांनी विजयी मिरवणूक काढली. त्यानंतर झालेल्या सभेत धस यांनी पंकजा मुंडे यांच्याविषयी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली. धस यांना आष्टी मतदारसंघात एकूण 1,40,507 मतं मिळाली आहेत.
तर, या मतदारसंघात अपक्ष उमेदवार 65,532 मतं मिळाली आहेत. या मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे (शरद पवार) उमेदवार महबुब शेख यांना 52,738 व राष्ट्रवादीचे (अजित पवार) उमेदवार बाळासाहेब आजबे यांना 21,595 मतं मिळाली आहेत
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.