Beed News : परळीमध्ये काय चालते हे अजितदादांनी एका आपल्या विश्वासातली माणसं पाच-सहा दिवस मुक्कामाला पाठवून तपासावे. मग खरी परिस्थिती त्यांना कळेल? लोकप्रतिनिधी म्हणून त्यांच्या घरापासून पाचशे मीटर अंतरावर असलेल्या महादेव मुंडेंच्या कुटुंबाला भेटायला त्यांना 21 महिन्यात वेळ मिळाला नाही का? मी भेटायला गेलो तर आम्हाला काळे झेंडे दाखवले गेले, अशा शब्दात आमदार सुरेश धस यांनी परळीचे आमदार धनंजय मुंडे यांच्यावर निशाणा साधला.
महादेव मुंडे हत्या प्रकरणाला 21 महिने उलटून गेले तरी त्यांचे मारेकरी अद्याप मोकाट आहेत. न्यायायाची मागणी करत महादेव मुंडे यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. सोबत सुरेश धस (Suresh Dhas) हे देखील होते. त्यानंतर या हत्या प्रकरणासाठी एसआयटी स्थापन करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले. तसेच आरोपींच्या अटकेसाठी तातडीने पावलं उचलण्यासाठी बीडच्या पोलीस अधीक्षकांना फडणवीस यांनी फोनही केला.
या भेटीनंतर सुरेश धस यांनी माध्यमांशी बोलताना परळी तालुक्यातील दहशत, आतपापर्यंत झालेले खून आणि त्यामागे कोण आहेत? यावर भाष्य केले. धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्यावर टीका करताना परळीत सलग तीन दिवसात तीन हत्या झाल्या. महादेव मुंडे यांचे घर लोकप्रतिनिधींच्या घरापासून पाचशे मीटर अंतरावर आहे. मग 21 महिन्यात त्यांनी महादेव मुंडे यांच्या कुटुंबियांना भेटायला जायला पाहिजे होते की नाही? उलट आम्ही गेलो तर आम्हाला काळे झेंडे दाखवले गेले.
परळीमध्ये एकूण तेरा ते चौदा मर्डर झाले आहेत. महादेव मुंडे, बापू आंधळे यांच्या खुनाचे प्रकरण अजूनही प्रलंबित आहे. महादेव मुंडे यांच्या खुनाला 21 महिने उलटले तरी आरोपींना अटक झालेली नाही. या प्रकरणात काही पोलीस अधिकाऱ्यांची नावे समोर आली असून, त्यांचे फोन आणि कॉल डिटेल्स तपासण्याची मागणी आम्ही केली आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणात धनंजय मुंडे यांचा राजीनामा झाला होता. आता माणिकराव कोकाटे यांच्या कृषी खात्याबाबतही चर्चा सुरू आहे, असेही धस म्हणाले.
धनंजय मुंडे यांना पुन्हा मंत्री करण्याचे प्रयत्न सुरू आहेत, त्याला आम्ही आमच्या पद्धतीने विरोध करू. जे काही सांगयाचं आहे, ते मुख्यमंत्र्यांना सांगू. बाकी अजितदादा, सुनील तटकरे यांनी त्यांच्याबाबत काय निर्णय घ्यावा, हा त्यांचा अधिकार आहे. आमचा त्यांना काही सांगण्याचा अधिकार नाही. महादेव मुंडे, बापू आंधळे यांच्या मर्डरसह परळीतील पुजारी, सातभाई यांना मारहाण असे अनेक प्रकार काही वर्षात परळीत घडले आहेत. या सगळ्या प्रकरणांच्या फायली बाहेर निघतील, असा इशाराही धस यांनी यावेळी दिला.
परळीतील नागरिक आता काही प्रमाणात सुटकेचा निश्वास सोडू लागले आहेत. मोठ्या गाड्यांचे सायरन वाजवणे, कोणाच्याही अंगावर गाडी घालण्याचे प्रकार आता कमी झाले आहेत. खून एक व्यक्ती करतो आणि आरोपी दुसऱ्याला करून त्याला जेलमध्ये डांबले जाते, असा दावाही सुरेश धस यांनी यावेळी केला. मुख्यमंत्र्यांनी कोणालाही सोडणार नाही, असा शब्द दिला आहे, असेही धस म्हणाले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.