

Shivsena UBT News : विधान परिषदेतील महाविकास आघाडीच्या एकमेव जागेवर उद्धव ठाकरे स्वतः पुन्हा लढणार की मग दुसऱ्याला संधी देणार? या प्रश्नावर आता पडदा पडला आहे. उद्धव ठाकरे यांनी विधान परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्यावर दुसऱ्यांदा विश्वास दाखवत आपली रिक्त झालेली जागा त्यांना दिली. काँग्रेसचा थयथयाट काही क्षणाचाच ठरला आणि अखेर आता माघार घेत विधान परिषदेची निवडणूक बिनविरोध होण्याचा मार्ग मोकळा झाला.
अंबादास दानवे यांच्यावर उद्धव ठाकरे यांनी दुसऱ्यांदा विश्वास दाखवण्याचे कारण काय? तर मराठवाड्यात पक्षाची मशाल पेटवत ठेवणारे दुसरे नेतृत्व सध्या तरी नाही. त्याशिवाय अंबादास दानवे यांनी विधान परिषदेचे आमदार म्हणून सहा वर्ष आणि अडीच वर्ष विरोधी पक्षनेता म्हणून बजावलेली कामगिरी सरस होती. शिवसेनेत फूट पडल्यानंतर राज्यभरात अनेक नेते, लोकप्रतिनिधी, आजी-माजी आमदार पक्ष सोडून शिंदेंच्या तंबूत शिरले.
मराठवाड्यातही याचा मोठा परिणाम दिसून आला. नेते गेले पण सामान्य शिवसैनिक आणि कार्यकर्ता मात्र उद्धव ठाकरे यांच्यावर निष्ठा राखून होता. यात महत्वाची भूमिका शिवसेनेचे नेते म्हणून अंबादास दानवे यांनी या भागात बजावली होती. अतिवृष्टी, गारपीट असो की मग दुष्काळ अशा सगळ्याच संकटाच्या काळात अंबादास दानवे शेतकऱ्याच्या बांधावर गेले.
परिस्थितीचे गांभीर्य, राजकीय परिणाम याचे योग्य आकलन करत त्यांनी वेळोवेळी उद्धव ठाकरे यांनाही मराठवाड्यात दौरे करायला भाग पाडले. त्यामुळे पक्ष फुटल्यानंतरही सामान्यांशी असलेली नाळ तुटू नये, याची काळजी अंबादास दानवे यांनी शिवसेनेचे नेते आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये जिल्हाप्रमुख म्हणून घेतली. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकींमध्ये मुंबईहून कोणताही मोठा नेते प्रचाराला आला नसताना पक्षाची पाटी कोरी राहणार नाही, याची काळजी घेतली गेली.
सत्ताधारी महायुतीला टक्कर देत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने थोडे का होईना पण यश पदरात पाडून घेत पक्ष जिवंत ठेवण्याचे काम केले. या कार्याची पावती म्हणूनच अंबादास दानवे यांना उद्धव ठाकरे यांनी दुसर्यांदा विधान परिषदेत पाठवण्याचा निर्णय घेतला. विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते पदाच्या कार्यकाळात अंबादास दानवे यांनी सभागृहात महाविकास आघाडीची बाजू भक्कमपणे मांडली. सरकारवर आक्रमकपणे हल्ला चढवत अनेकदा कोंडी केली.
समाजातील सगळ्याच घटकांचे प्रश्न मग त्यात तरूण, विद्यार्थी, कामगार, शेतकरी, उद्योजक, व्यापारी, महिलांवरील अत्याचार, राज्यातील वाढती गुन्हेगारी, बिघडलेली कायदा व सुव्यवस्था अशा चौफेर मुद्यांना हात घालत सत्ताधाऱ्यांना घाम फोडण्यात अंबादास दानवे यशस्वी ठरले. मराठवाड्यात परभणी महापालिकेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची सत्ता आहे, छत्रपती संभाजीनगर महापालिकेत या पक्षाचे सहा नगरसेवक निवडून आले आहेत. तर जिल्हा परिषदेत 9 सदस्यांसह उद्धव ठाकरे यांच्या पक्षाने फुटीनंतरही आपली ताकद दाखवून दिली.
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमध्ये उद्धव ठाकरे यांनी संभाजीनगरसह मराठवाड्यातील बहुतांश जबाबदारी अंबादास दानवे यांच्यावरच सोपवली होती. त्यामुळे मिळालेल्या यश-अपयशाचे धनीही तेच ठरतात. 2029 मध्ये होणाऱ्या लोकसभा, विधानसभा निवडणुकी पाहता मराठवाड्यात पक्षाची मशाल पेटवत ठेवायची असेल तर अंबादास दानवे सारख्या नेत्याला बळ देणे गरजेचे होते. उद्धव ठाकरे यांनी विधान परिषदेच्या निवडणुकीत स्वतः माघार घेत दानवे यांना उमेदवारी देत तेच केले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.