
Shivsena UBT News : मी छोटा-मोठा कार्यक्रम असला तरी सगळ्या पदाधिकाऱ्यांना फोन करतो, त्यांच्याशी चर्चा करतो, पण अंबादास दानवे आता मोठा नेता झाला आहे, तो सगळं परस्परच ठरवतो. काल झालेल्या मेळाव्याची मला साधी कल्पना देण्यात आली नाही. मला न विचारता परस्पर कार्यक्रम जाहीर करतो. आम्ही पक्षासाठी जेलमध्ये गेलो, आंदोलने केली, लाठ्या-काठ्या खाल्ल्या. हा आता आला आणि काय करतो तर फक्त काड्या, मी त्याची उद्धवसाहेंबाकडे तक्रार करणार आहे, असा संताप शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी व्यक्त केला.
संभाजीनगरच्या पाणीप्रश्नावर सरकारशी भांडण्याची तयारी करत असलेल्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या दोन नेत्यांमध्येच सध्या भांडणे सुरू आहेत. आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली पुढील महिन्यात पाण्यासाठी मोर्चा काढण्याचे नियोजन शिवसेना नेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी केले आहे. तत्पुर्वी संभाजीनगरात महिनाभर विविध आंदोलने करत पाणी प्रश्न तापवण्यावर दानवे यांचा जोर आहे. त्यासाठीची सगळी रुपरेषा ठरवून ती शिवसेनेच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांना सांगण्यासाठी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.
आगामी महापालिका निवडणुकीच्या तोंडावर पक्षासाठी महत्वाच्या असलेल्या या आंदोलनाच्या पुर्वतयारीच्या मेळाव्यात चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) यांची गैरहजेरी सगळ्यानाच खटकली. खैरे हे त्यांच्या समाजाच्या पूर्वनियोजित कार्यक्रमासाठी नागपूरला गेले असल्यामुळे येऊ शकले नाही, असे सांगितले गेले. परंतु, खैरे यांनी आज या मेळाव्याची आपल्याला कुठलीही कल्पना अंबादास दानवे यांनी दिली नव्हती, ते परस्पर निर्णय घेतात हे आता खूप झालं. मी त्याची परवा मुंबईत उद्धव ठाकरे यांच्यासोबत बैठक आहे, त्यात अंबादासची तक्रार करणार आहे, असे खैरे यांनी जाहीरपणे सांगितले.
अंबादास दानवे स्वतःला खूप मोठा समजायला लागला आहे. आम्हीही राजकारणात तीस-पस्तीस वर्षापासून आहोत. बाळासाहेब ठाकरेंच्या आशिर्वादाने मंत्री, खासदार, आमदारही झालो. पण यांच्यासारखे कधी वागलो नाही. हे मागून आले आणि सगळ्यांना सोबत घेऊन चालण्याऐवजी काड्या करायला लागले, अशा थेट हल्लाच खैरे यांनी अंबादास दानवे यांच्यावर चढवला. तो विरोधी पक्षनेता आहे, पण दोन महिन्यापुरताच, असा टोला लगावताना आपण उद्धव ठाकरे यांच्याकडे त्याची तक्रार करणार असल्याचा पुनरुच्चारही खैरे यांनी माध्यमांशी बोलताना केला.
शिवसेना मी वाढवली, हा आला आणि लोकं पक्ष सोडून गेली..
शिवसेना संभाजीनगर आणि मराठवाड्यात मी वाढवली. शिवसैनिकांचे मोठे जाळे निर्माण केले. पण अंबादास दानवे पक्षात आल्यापासून गटबाजी सुरू झाली. लोकसभा निवडणुकीत आमचा पराभव झाला, विधानसभेत पराभव झाला. अनेक लोक पक्ष सोडून गेले, हे त्याच्या वागणुकीला कंटाळूनच, असा आरोपही खैरे यांनी केला. मी मरेन पण शिवसेना सोडणार नाही, हे याआधीच स्पष्ट केले आहे. मला पक्षातून कुणी काढूही शकत नाही, असेही खैरे म्हणाले.
२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता का्ॅमस्कोअरमध्ये नंबर १. डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातली नवी झेप
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.