उद्धव ठाकरे महिनाभरात दुसऱ्यांदा मराठवाड्याच्या दौऱ्यावर जात असून, आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजप-शिंदे गटावर हल्लाबोल करण्याची रणनीती आखत आहेत.
ठाकरे या दौऱ्यात शेतकऱ्यांशी थेट संवाद साधून "दगाबाज सरकार"वर प्रश्नांची झोड उडवणार आहेत.
या दौऱ्यात ठाकरे गट कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण करण्याचा प्रयत्न करत असून, मराठवाडा पुन्हा शिवसेनेचा बालेकिल्ला करण्याचे उद्दिष्ट आहे.
Affected Farmers News : अतिवृष्टी, महापूराचा सर्वाधिक फटका बसलेल्या मराठवाड्यातील शेतकऱ्यांना दिवाळीपुर्वी नुकसनाभरपाई अनुदानीची रक्कम खात्यात जमा करण्याचे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले होते. परंतु शेतकऱ्यांची दिवाळी अंधारातच गेली. महाराष्ट्रातील महायुती सरकार हे 'दगाबाज'असल्याचा आरोप करत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे बुधवार पाच नोव्हेंबरपासून चार दिवसांच्या मराठवाडा दौऱ्यावर येत आहेत.
या आधी उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसाठी मराठवाड्याचा दौरा करत छत्रपती संभाजीनगरमध्ये मोर्चा काढला होता. त्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे शेतकऱ्यांच्या अनुदानासाठी बांधावार जाऊन त्यांच्याशी संवाद साधणार आहेत. शिवसेनेचे नेते अंबादास दानवे यांनी या दौऱ्यांची माहिती पत्रकारांना दिली. महाराष्ट्राच्या इतिहासातील आतापर्यंतचे सर्वात मोठे पॅकेज दिल्याचा दावा महायुती सरकारने केला. 32 हजार कोटींचे पॅकेज जाहीर केल्यानंतर सरकारने शेतकऱ्यांना दिलासा दिल्याचे म्हटले.
दिवाळीपुर्वीच शेतकऱ्यांच्या खात्यातू नुकसान भरपाईची रक्कम जमा केली जाईल, असे स्वतः मुख्यमंत्र्यांनी सांगितले. प्रत्यक्षात ते आश्वासन फसवे ठरले. शेतकऱ्यांची दिवाळी काळी झाली, त्यांच्या घरात अंधार होता. हे सरकार दगाबाज आहे, त्यांनी शेतकऱ्यांची फसवणूक केली, असा आरोप शिवसेनेकडून केला जात आहे. दगाबाज सरकारला जाब विचारण्यासाठी आणि शेतकऱ्यांशी संवाद साधण्यासाठी उद्धव ठाकरेंचा हा दुसरा मराठवाडा दौरा असल्याचे दानवे यांनी सांगितले.
उद्धव ठाकरे 5 ते 8 नोव्हेंबर पर्यंत मराठवाड्याचा दौरा करणार आहेत. अतिवृष्टीची नुकसान भरपाई दिवाळी अगोदर देण्याचे आश्वासन देऊन हा आनंदमय सण गोड करण्याचे अभिवचन राज्य सरकारने शेतकर्यांना दिले होते. दिवाळी होऊन आठवडा सरला असला तरीही शेतकर्यांच्या खात्यात नुकसान भरपाईचे अनुदान न मिळल्याने महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील शेतकऱ्यांमध्ये संतापाचे वातावरण आहे, असे दानवे म्हणाले.
या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांचा मराठवाडा दौरा छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील नांदर ता. पैठण येथून 5 नोव्हेंबरला सकाळी दहा वाजेपासून सुरू होणार आहे. त्याच दिवशी पाली ता. जि. बीड, पाथरूड ता. भूम जि. धाराशिव, शिरसाव ता परांडा जि. धाराशिव, घारी ता. बार्शी जि. सोलापूर, त्यानंतर धाराशिव येथील विश्रामगृहावर बीड, लातूर,धाराशिव जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांसोबत उद्धव ठाकरे चर्चा करणार आहेत. 6 नोव्हेंबरला धाराशिव जिल्ह्यातील करंजखेड, लातूर जिल्ह्यातील भूसनी, थोरलेवाडी, नांदेड जिल्ह्यातील पारडी येथील भेटीनंतर नांदेड व हिंगोली जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांची भोकर येथे बैठक आणि चर्चा उद्धव ठाकरे हे करतील.
7 नोव्हेंबर रोजी नांदेड जिल्ह्यातील पारडी, हिंगोली जिल्ह्यातील वारंगा,जवळा बाजार, परभणी जिल्ह्यातील पिंगळी स्टेशन येथील भेटीनंतर परभणी विश्रामगृहात लोकसभा क्षेत्रातील पदाधिकाऱ्यांसोबत ते चर्चा करतील. 8 नोव्हेंबरला परभणी जिल्ह्यातील ताड बोरगाव, ढेंगळी पिंपळगाव तसेच जालना जिल्ह्यातील पाटोदा लिंबोणी येथील दौऱ्यानंतर छत्रपती संभाजीनगर येथील शासकीय विश्रामगृहात जालना व छत्रपती संभाजीनगर लोकसभा क्षेत्रातील पदाधिकारी सोबत चर्चा करतील असे दानवे यांनी सांगितले.
दरम्यान, कर्जमुक्तीसाठी मराठवाड्यात मोर्चा काढल्यानंतर महिनाभरात उद्धव ठाकरे यांनी दुसरा दौरा तोही चार दिवसांचा आयोजित करत महायुती सरकारच्या विरोधात रान पेटवले आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीची घोषणा कोणत्याही क्षणी होऊ शकते, हे पाहता उद्धव ठाकरेंकडून एकाच दगडात दोन पक्षी मारण्याचा हा प्रयत्न असल्याचे बोलले जात आहे.
1. उद्धव ठाकरे मराठवाड्याच्या दौऱ्यावर केव्हा जाणार आहेत?
उद्धव ठाकरे नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मराठवाड्याचा दौरा करणार आहेत.
2. या दौऱ्याचा मुख्य उद्देश काय आहे?
भाजप-शिंदे सरकारच्या कारभारावर टीका करून कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण करणे, दिलेले शब्द न पाळल्याबद्दल शेतकऱ्यांशी संवाद हा मुख्य उद्देश आहे.
3. ठाकरे कोणत्या जिल्ह्यांना भेट देणार आहेत?
छत्रपती संभाजीनगर, बीड, लातूर, धाराशिव आणि नांदेड या जिल्ह्यांना भेट देण्याची शक्यता आहे.
4. ठाकरे "दगाबाज सरकार" म्हणत कोणाला उद्देशून बोलत आहेत?
ते एकनाथ शिंदे आणि भाजप नेतृत्वाच्या सरकारला उद्देशून ‘दगाबाज सरकार’ असा आरोप करतात.
5. ठाकरे गटाचा या दौऱ्याने काय फायदा होऊ शकतो?
कार्यकर्त्यांमध्ये ऊर्जा वाढेल आणि आगामी स्थानिक निवडणुकांसाठी पक्ष संघटन मजबूत होईल.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.