
Nagpur News, 20 Dec : बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष (Santosh Deshmukh) देशमुख यांच्या हत्येमुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेला आहे. या निर्घृण हत्या प्रकरणाचे पडसाद हिवाळी अधिवेशनात उमटताना दिसत आहेत. विरोधकांकडून या प्रकरणी सतत वाल्मिक कराड याच नाव घेतलं जात आहे.
शिवाय वाल्मिक कराड हा मंत्री धनंजय मुंडे यांच्या जवळचा असल्याने त्याच्यावर कारवाई केली जात नसल्याचा आरोपही विरोधकांकडून केला जात आहे. याच सर्व प्रकरणावर आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) सभागृहात बोलताना या हत्या प्रकरणाचा जो कोणी मास्टरमाईंड असेल त्याच्यावर कठोर कारवाई केली जाणार असल्याचं आश्वासन दिलं.
विधानसभेत अल्पकालीन चर्चेवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिलं. यावेळी त्यांनी सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणी निवेदन दिलं आणि या प्रकरणी एसआयटी आणि न्यायालयीन चौकशी करणार असल्याचं जाहीर केलं. बोलताना फडणवीस म्हणाले, "मस्साजोग येथे पवनचक्की उभारण्याचे काम सुरू आहे.
या ठिकाणी कंपनीच्या सुरक्षा रक्षकाला आणि प्रोजेक्ट अधिकाऱ्याला मारहाण करण्यात आली होती. या प्रकरणात वाल्मिक कराडने (Valmik Karad) धमकी दिल्याचं समोर आलं आणि त्यानंतर संतोष देशमुख यांची हत्या झाली. या संपूर्ण प्रकरणांमध्ये या दोन्ही गुन्ह्यांचा काय संबंध आहे याची चौकशी करत असून जो काही गुन्हा घडला आहे, याचा मास्टरमाईंड कोणीही असला तरी त्याच्यावर कारवाई केली जाईल, असं आश्वासन त्यांनी मुख्यमंत्र्यांनी दिलं.
तसंच यावेळी त्यांनी वाल्मिक कराडच्या नावाचा उल्लेख देखील केला. ते म्हणाले, "आपण वारंवार वाल्मिक कराडच नाव घेतलं म्हणून नाव घेऊन सांगतो, या गुन्ह्यामध्ये तर त्याचा पुरावा दिसतोच आहे. त्याच्यावर कारवाई होणारच आहे. पण देशमुख यांच्या हत्येप्रकरणात वाल्मिक कराड बद्दलचे पुरावे असतील तर तो कोण आहे, कुठल्या पक्षाचा आहे, कुणा कुणासोबत फोटो त्याचे फोटो आहेत याचा विचार न करता कारवाई केली जाईल."
या प्रकरणातील प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष आरोपींवर मोक्का लावण्यात येणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. तसंच बीडमधील (Beed) अराजकतेचे राज्य तयार करण्याचा प्रयत्न होत असल्याचं म्हणतच त्यांनी येथील पोलिसांच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त केली. दरम्यान, या प्रकरणांमध्ये दोन प्रकारची चौकशी केली जाणार आहे.
त्यानुसार एसआयटीकडून गुन्ह्याच्या अनुषंगाने तपास होईल. तर संपूर्ण प्रकरणाची चौकशी होण्यासाठी न्यायालयीन चौकशी देखील करण्यात येणार आहे. ही सर्व चौकशी पूर्ण चौकशी 3 ते 6 महिन्यात पूर्ण होईल, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी सभागृहात दिली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.