बीड : माझ्यावर गुन्हे दाखल करणाऱ्या धनंजय मुंडे आणि त्यांनी पाळलेल्या टोळ्या, गुंडांनी आता दाखवली तशीच तत्परता संतोष देशमुख यांचा खून झाला तेव्हा दाखवायला हवी होती, अशा शब्दात मराठा आरक्षण आंदोलनकर्ते (Manoj Jarange Patil) मनोज जरांगे पाटील यांनी मंत्री धनंजय मुंडे यांना टोला लगावला. तुम्ही आमच्या पोरांचे मुडदे पाडायचे आणि आम्ही त्यावर बोलायचे नाही का? असा सवालही जरांगे यांनी केला.
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात त्यांच्या कुटुंबियांना न्याय मिळावा, आरोपींना कठोर शिक्षा व्हावी, या मागणीसाठी परभणी येथे सर्वपक्षीय मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी केलेल्या भाषणात मनोज जरांगे पाटील यांनी थेट मंत्री (Dhananjay Munde) धनंजय मुंडे यांचे नाव घेत टीका केली होती. त्यानंतर परळीत मुंडे समर्थकांनी पोलिस स्टेशनसमोर आंदोलन करत जरांगे पाटील याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती.
सायंकाळी परळी पोलिसांनी मनोज जरांगे पाटील यांच्याविरोधात अदखलपात्र गुन्ह्याची नोंद केली. त्यानंतर अंबाजोगाई येथेही अशा प्रकारची 'एनसी' जरांगे यांच्यावर दाखल करण्यात आली. आतापर्यंत त्यांच्यावर तीन अदखल पात्र गुन्ह्यांची नोंद बीड जिल्ह्यात करण्यात आली आहे. यावर मनोज जरांगे पाटील यांनी तिखट प्रतिक्रिया दिली आहे.
धनंजय मुंडे आणि त्याच्या ज्या टोळ्या पाळल्या आहेत, लोकांच्या पोरांची हत्या करण्यासाठी, खंडण्या वसूल करण्यासाठी, गुंडागर्दी करायला त्यांनी संतोष देशमुख यांची हत्या झाली तेव्हा ही तत्परता का दाखवली नाही? ही तत्परता संतोष देशमुख यांचा खून झाला तेव्हा दाखवणं गरजेचे होते. तुम्ही आमच्या पोरांचे मुडदे पाडायचे आणि आम्ही त्यावर बोलायचेही नाही का? दोन दिवस त्या बिचार्याचा मृतदेह केजच्या हॉस्पिटलमध्ये पडून होता.
आरोपींच्या अटकेसाठी संपुर्ण मस्साजोग गाव रस्त्यावर होते, तेव्हा ही तत्परता दाखवायची होती, असे मनोज जरांगे म्हणाले. आम्ही धनंजय मुंडेला कधी बोललो का? परंतु त्याचे गुंड लोक संतोष देशमुख यांच्या भावाला सुद्धा धमकी द्यायला लागले आहेत. दादागिरी, अरेरावीची भाषा करायला लागले, मग आम्ही त्याच्यावर बोलायचे नाही का? आमचे मुडदे पडू द्यायचे का?, असा संताप जरांगे यांनी व्यक्त केला.
मी कोणत्याही जातीबद्दल बोललो नाही. संतोष देशमुख यांच्या मंडळींनी आणि लेकरांनी कसे जगायचे. धनंजय देशमुख न्यायासाठी फिरतोय आणि आज त्याला जर धमक्या यायला लागल्या तर एवढा मोठा समाज त्या लेकराला पाठिंबा द्यायला येणार नाही का? असा सवालही जरांगे पाटील यांनी यावेळी केला. यात मराठा, वंजारी, ओबीसींचा काय संबंध? तुमच्यावर वेळ आली की ओबीसी आणि वेळ गेली की फक्त तुमचेच, ही कुठली पद्धत आहे. खून होऊन आम्ही बोलायचं नाही मग तर अवघड झालं, अशा शब्दात जरांगे पाटील यांनी धनंजय मुंडे समर्थकांना सुनवाले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.