Mumbai News : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या क्रूरपणे करण्यात आलेल्या हत्येने राज्यातील राजकीय आणि सामाजिक वातावरण तापले आहे. राज्यभरात सरपंच संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना फासावर लटकवा, या घटनेमागील सूत्रधार शोधा अशा मागण्यासाठी सर्वपक्षीय मोर्चे विविध शहरात काढले जात आहे. या प्रकरणाचा छडा लावून आरोपींना शिक्षा व्हावी, यासाठी सर्वच पक्ष आणि त्यांच्या नेते लोकप्रतिनिधींनी आवाज उठवला आहे.
परंतु राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार (Sharad Pawar) पक्षाचे बीडचे खासदार बजरंग सोनवणे, आमदार संदीप क्षीरसागर आणि नेते जितेंद्र आव्हाड हे देशमुख कुटुंबियांना न्याय मिळवून देण्यासाठी झटत आहेत. सत्ताधारी भाजपचे आमदार सुरेश धस यांनीही आरोपींच्या विरोधात दंड थोपटले आहेत.
या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते खासदार शरद पवार यांनी खासदार बजरंग सोनवणे, आमदार संदीप क्षीरसागर, सुरेश धस, जितेंद्र आव्हाड यांच्यासह या प्रकरणात आवाज उठवणाऱ्या लोकप्रतिनिधी राज्य सरकारने पोलिस सरंक्षण द्यावे, अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. शरद पवार यांनी हे पत्र काल पाच जानेवारी मुख्यमंत्र्यांना लिहिले आहे.
या पत्रात शरद पवार यांनी सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येपासून ते आतापर्यंतच्या घटनाक्रमाचा सविस्तर उल्लेख केला आहे. शरद पवार यांनी मुख्यमंत्र्यांना लिहलेल्या पत्रात म्हटले आहे की, मागील महिन्यात बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच श्री संतोष देशमुख यांचे काही गुंडांनी अपहरण करून निर्घूण हत्या केली. सदर अमानवीय घटनेचे पडसाद केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर देशभरात उमटले. पुण्यातील फरार आरोपींना आणि त्यामागील सूत्रधारांना तात्काळ अटक करावी म्हणून महाराष्ट्रभरात आंदोलने उभे राहिली आहेत.
या संदर्भात बीड जिल्ह्यात निघालेल्या पहिला आक्रोश मोर्चा राज्य शासनापर्यंत या घटनेचे गांभीर्य पोहोचवणारा होता. त्यात जात धर्म आणि पक्ष हे भेद बाजूला सारून क्रौर्याची परिसिमा गाठणाऱ्या घटनेचा निषेध झाला. फरार आरोपींना व त्यामागील सूत्रधारांना तात्काळ अटक होऊन कडक शासन व्हावे, अशी एक मुखाने मागणी करण्यात आली. सदर आक्रोश मोर्चाच्या सांगता प्रसंगी आमदार सर्व श्री संदीप क्षीरसागर, प्रकाश सोळंके, जितेंद्र आव्हाड, अभिमन्यू पवार आणि सुरेश धस तसेच बीडचे खासदार श्री बजरंग सोनवणे यांनी आपल्या भाषणातून आपल्या तीव्र भावना व्यक्त केल्या.
घटनेत सहभागी असणारे गुंड घटनेचे सूत्रधार व घटनेस जबाबदार असणाऱ्या व्यक्तींचा नाम उल्लेख केला. महाराष्ट्राच्या सुसंस्कृत परंपरेला लांछन लावणाऱ्या या घटनेचा तातडीने तपास व्हावा, याकरिता प्रसारमाध्यमे देखील महत्त्वाची भूमिका बजावीत आहेत. संतोष देशमुख यांची माणुसकीला काळीमा फासणारी घटना केवळ एकच नसून यापूर्वी हत्या, अपहरण, खंडणी खोटे गुन्हे दाखल होणे अशा अनेक घटना बीड-परळी भागात घडल्या असल्याने त्या घटनांची पाळेमुळे खणून काढावीत, अशी देखील मागणी केली.
अनेक घटनांचा परस्पर संबंध असल्याची शक्यता देखील व्यक्त करण्यात आली. एकूणच अनेक प्रकरणांची मालिका तपासात समोर येण्याची शक्यता असल्याने उपरोल्लेखित लोकप्रतिनिधी तसेच सदर मंचावरून जनतेला संबोधित करणाऱ्या इतर सन्माननीय व्यक्ती यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
आपणास विनंती आहे की सदर घटने विरुद्ध आवाज उठवणाऱ्या लोकप्रतिनिधी व इतर नेत्यांच्या जीवितास आणि आरोग्यास कोणताही धोका उत्पन्न होऊ नये म्हणून वेळीच खबरदारी घ्यावी. तसेच त्यांच्या सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेऊन योग्य ते पोलीस संरक्षण राज्य शासनामार्फत पुरवण्यात यावे, अशी मागणी शरद पवारांनी या पत्राद्वारे केली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.