Raj Thackeray MNS Party News : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला विधानसभा निवडणुकीचे वेध लागले असून, मुंबईत मनसेच्या राज्यातील पदाधिकारी आणि नेत्यांच्या बैठकीत राज ठाकरे यांनी तयारीला लागा, असे आदेश दिले आहेत. मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी मनसे राज्यात 225 ते 250 जागा लढवेल, असे मोठे विधान करून महायुतीला पहिला मोठा धक्का दिला.
राज ठाकरे विधानसभा निवडणुकीत 'एकला चलो रे'च्या भूमिकेत असून, विधानसभेसाठी जागा मागण्यासाठी कुणाकडे जाणार नाही, असेच दिसते आहे. राज ठाकरे यांच्या भूमिकेमुळे महायुतीत अस्वस्थता पसरली आहे.
लोकसभा निवडणुकीला मनसेने महायुतीला आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांना बिनशर्त पाठिंबा दिला होता. पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडव्या मेळाव्यात तसे जाहीर केले होते. महायुतीला लोकसभेला महाराष्ट्रात महाविकास आघाडीने चांगलाच धक्का दिला. लोकसभा निवडणुकीनंतर आता सर्वच पक्ष विधानसभेच्या तयारीला लागले आहेत. सर्वच पक्षांकडून बैठकांचे सत्र सुरू आहे. यात महायुतीबरोबर असलेल्या मनसेने देखील स्वतंत्र बैठक घेतली आहे. राज ठाकरे यांनी या बैठकीत राज्यातील पदाधिकारी आणि नेत्यांना मतदारसंघात जाऊन विधानसभेच्या तयारीला लागण्याचा आदेश दिला आहे.
मनसेचे (MNS) नेते बाळा नांदगावकर यांनी मनसेच्या बैठकीनंतर प्रतिक्रिया दिली. "राज ठाकरेसाहेबांनी (Raj Thackeray) पक्षाचे पदाधिकारी आणि नेत्यांना मतदारसंघात जोरात काम करण्याचा आदेश दिला आहे. विधानसभेच्या तयारी लागा, असे सांगितले आहे. राज्यात मनसे पक्षाने आतापर्यंत स्वबळावर निवडणुका लढवल्या आहेत. त्यानुसार पक्ष यावेळी राज्यात 225 ते 250 जागा लढवण्याची तयारी करत आहेत. महायुतीत राहायचे की पुढे जायचे हे ठरवू. राज ठाकरे त्यावर अंतिम निर्णय घेतील. प्रत्येकाला पक्ष मोठा करायचा आहे. त्यानुसार आम्ही पक्ष मोठा करत आहोत. महायुतीत राहून किती जागा पाहिजेत, हे राज ठाकरेच ठरवतील", असेही बाळा नांदगावकर यांनी सांगितले.
मनसेचे जुने नेते संपर्कात आहे का? यावर नांदगावकर म्हणाले, "पूर्वी पक्षाने ज्या जागा लढवल्या आहेत, त्यावर चाचपणी चालू आहे. जुने नेते संपर्कात आहेत. त्यामुळे काहीही होऊ शकते. काही जण पुढच्या भवितव्याच्या अनुषंगाने निर्णय घेत असतात. संपर्कात आल्यावर निश्चित त्यांचा विचार केला जाईल". राज्यातील प्रत्येक विभागानुसार मतदारसंघाचा आढावा घेतला जाणार आहे. जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष आणि सरचिटणीस यांची टीम करून आढावा घेतला जाईल. पुढील 15 दिवसांत मनसेचे विधानसभा मतदारसंघनिहाय चित्र स्पष्ट होईल, असे देखील नांदगावकर यांनी सांगितले.
विधानपरिषदेच्या निवडणुकांमध्ये अर्ज मागे घेण्याची नामुष्की आली होती. यावेळी विधानसभेत तसे होऊ शकते का, यावर नांदगावकर यांनी मनसेने यापूर्वी विधानसभा स्वबळावर लढवल्या आहेत. त्यामुळे येथे काय निर्णय होईल, ते राज ठाकरेसाहेबच ठरवतील, असे स्पष्टच केले. कोकण पदवीधरमध्ये आम्ही उमेदवार दिला होता. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी साहेबांच्या घरी आले. विनंती केली. दोन टर्मचा आमचा आमदार आहे, असे सांगितले. त्यामुळे त्यांना साहेबांनी मदत केली. मान-सन्मान पक्षप्रमुखांनी केला. त्यातून माघार घेतली. पण विधानसभेला असे काही होणार नाही, असेही नांदगावकर यांनी सांगून ही निवडणून मनसे सन्मानाने लढणार असल्याचे संकेत दिले.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.