
देविदास वाणी
नाशिकचे पालकमंत्रीपदे मिळावे, अशी मागणी लाचारपणे व लोचटपणे काहीमंत्री (जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांचे नाव न घेता) करत असल्याची टीका माजी मंत्री, आमदार एकनाथराव खडसे यांनी आज पत्रकार परिषदेत केली. ही पत्रकार परिषद त्यांच्या निवासस्थानी झाली.
नाशिकच्या पालकमंत्रीपदाचा तिढा अजून सुटलेला नाही. कुंभमेळ्याची कामे अजून सुरू झाली नाहीत. असा प्रश्न विचारल्यावर खडसे म्हणाले की, नाशिकच्या पालकमंत्री पदाचा तिढा अजून सूटलेला नाही. तरी काही मंत्री (गिरीष महाजन) हे मला पालकमंत्री पद द्या, मला पालकमंत्रीपद द्या असे लाचारपणे व लोचटपणे मागणी करताहेत. या मागणीला लाचारपणाच म्हणावे लागेल. काही कारणासाठी पालकमंत्रीपदाची मागणी ते करताहेत. स्वाभिमानाने पालकमंत्री झाले पाहिजे. ‘नाही हो पालकमंत्री मला करा, मला सांभाळा, मला पालकमंत्री करा, असे सांगणे ही लाचारीच आहे. असे करताना जो हेतू आहे तो सौम्य नसतो असाही टोला खडसे यांनी लगावला आहे.
पालकमंत्री झाले म्हणजेच कुंभमेळ्याची कामे केली पाहिजे असे नाही. कुंभमेळाची कामे करणे सरकारची जबाबदारी आहे. त्या ठिकाणी तीन मंत्री आहेत. त्यांच्यावर कामाची जबाबदारी द्यावी. कुंभमेळाव्या कामाला वेग आणावा. कामे नाही झाली तर नाही ती अव्यवस्था होण्याची शक्यता आहे.
भारत पाकिस्तान युध्दाबाबतही खडसे यांनी प्रतिक्रिया दिली असून ते म्हणाले, भारत पाकिस्तान युध्द झाले. त्यात किमान पीओके’ तरी ताब्यात घ्यायला हवा होता. पहलगाममध्ये ज्या पर्यटकांना लक्ष्य केले. त्याचा बदला म्हणून त्या दहशतवाद्यांचा खात्मा करायला हवा होता. मात्र तसे झाले नाही, असेही त्यांनी म्हटलं आहे.
तापी सिंचन महामंडळाची स्थापना झाल्यानंतर 1999 ला त्यात ‘तापी मेगा रिचार्ज’ प्रकल्पाची संकल्पना मी व तत्कालीन अभियंता व्ही.डी.पाटील, पी.व्ही.पाटील आदींनी मांडली होती. या प्रकल्पाबाबत अनेक वेळा विधानसभेत पाठपुरावा केला होता. 2014 ला मंत्री झाल्यानंतर प्रकल्पास तांत्रिक मंजुरी दिली होती. मंत्री असताना मुहूर्तमेढ रोवलेल्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचे काम होत असल्याचा मनस्वी आनंद असल्याचेही ते म्हणाले.
याप्रकरणी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व मध्यप्रदेश शासनाचे मी अभिनंदन करतो. याप्रकल्पात कोणतेही गाव बुडत नाही, अभयारण्य बुडीत क्षेत्रात येत नाही, ही मोठी बाब आहे. हा विषय राजकारणापलीकडचा विषय आहे, तर यासाठी माजी खासदार (स्व.) हरिभाऊ जावळे, केंद्रीय मंत्री रक्षा खडसेंनी पाठपुरावा केल्याचेही त्यांनी सांगितले.
युतीच्या सरकारनंतर तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी या प्रकल्पाबाबत सकारात्मक भूमिका घेतली होती. देशमुख जळगावला आल्यानंतर सुकी नदीवरील रिचार्ज वेल्स पाहण्याची विनंती त्यांना केली होती. त्याप्रमाणे त्यांनी पाहणी करत समाधान व्यक्त केले होते. 2008-2009 मध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार खानदेश दौऱ्यावर आले असताना त्यांनी या प्रकल्पाची पाहणी केली होती. 2009 मध्ये आयएससीबीच्या बैठकीत या योजनांना पर्याय म्हणून मेगा रिचार्ज योजना हाती घेण्याचा निर्णय झाला. म.प्र.तील अर्चना चिटणीस यांनी 2014 मध्ये यासाठी ‘टास्क फोर्स’ स्थापनेसाठी प्रयत्न केले.
या योजनेत विदर्भाच्या खारपण पट्ट्याच्या समावेशाचा आग्रह धरला होता. एकूण 3 लाख 57 हजार 788 हेक्टर लाभ होणाऱ्या क्षेत्रापैकी महाराष्ट्राच्या जळगाव, बुलढाणा, अकोला, अमरावती जिल्ह्यातील 2 लाख 34 हजार 706 हेक्टर तर मध्य प्रदेशातील बऱ्हाणपूर व खंडवा जिल्ह्यातील 1 लाख 23 हजार 82 हेक्टर क्षेत्रास लाभ मिळणार आहे. एकूण 32 टीएमसी पाण्याने जलपुनर्भरण होणार आहे. यामुळे 500 किलोमिटर लांबीचे कालवे तयार होणार असून पाण्याचा घसरता जलस्तर उंचावण्यास मदत होणार आहे. यामुळे पाणीही उपलब्ध होइल. जलस्तर उंचावल्याने विजेची बचतही होईल. पाण्याची गुणवत्ता सूधारेल, पर्यावरणास खूप फायदा होणार असल्याचेही खडसे म्हणाले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.