

Mumbai News : उद्धव ठाकरे यांची शिवसेना सोडून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर धाराशिवचे खासदार ओम राजेनिंबाळकर कामाला लागले आहेत. धाराशिव लोकसभा मतदारसंघातील नेतेमंडळी व पदाधिकारी यांची दोन दिवसापूर्वीच त्यांनी भेट घेतली आहे. त्यानंतर मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांची ओम राजेनिंबाळकर यांनी भेट घेतली असल्याचे पुढे आले आहे. या भेटीवेळी त्यांनी कृष्णा–मराठवाडा सिंचन प्रकल्पास राष्ट्रीय प्रकल्पाचा दर्जा देण्याची मोठी मागणी केली आहे. त्यासोबतच मतदारसंघातील विविध प्रलंबित प्रश्नावर चर्चा केली. हे प्रश्न लवकरच मार्गी लागणार असल्याने विरोधकांच्या चिंतेत भर पडली आहे.
ओम राजेनिंबाळकर यांच्या एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील पक्षप्रवेशानंतर धाराशिव जिल्ह्यातील सर्वच राजकीय समीकरणे बदलली आहेत. धाराशिव लोकसभा मतदारसंघातील शेतकरी, पाणी, सिंचन, वीज व औद्योगिक विकासाशी संबंधित महत्त्वाच्या विषयांवर खासदार राजेनिंबाळकर यांनी सीएम फडणवीस यांच्यासोबत सविस्तर चर्चा केली. त्यामध्ये कृष्णा–मराठवाडा सिंचन प्रकल्पास राष्ट्रीय प्रकल्पाचा दर्जा देऊन प्रकल्पासाठी आवश्यक निधीची तरतूद करावी. त्यासोबतच 7 टीएमसी पाण्यासाठी भरीव आर्थिक तरतूद करून प्रकल्पाची कामे गतीने पूर्ण करावीत, अशी मागणी त्यांनी यावेळी केली आहे.
त्यासोबतच यावेळी पिकविम्यातून वगळलेले ट्रिगर पुन्हा लागू करून शेतकऱ्यांना पिकविम्याचा लाभ मिळण्यासाठी विमा कंपनीच्या निकषांमध्ये आवश्यक बदल करावेत. महावितरण कार्यालयाचे विभाजन करून वैराग येथे स्वतंत्र उपविभागीय कार्यालय स्थापन करावे. शेतजमीन खरवडून नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना अद्याप मदत मिळालेली नसल्याने त्यांना तात्काळ आर्थिक मदत वितरित करावी,अशी मागणी यावेळी त्यांनी केली आहे.
मांजरा व तेरणा नदीवरील कोल्हापुरी पद्धतीच्या बंधाऱ्यांचे रूपांतर बॅरेजेसमध्ये करून जलसाठा वाढविण्याची योजना राबवावी. कौडगाव एमआयडीसीमध्ये लॉजिस्टिक पार्कची स्थापना करून परिसरातील औद्योगिक विकासाला चालना द्यावी. श्री तुळजाभवानी मंदिरातील पुजारी व मंदिर प्रशासन यांच्यात अधिक प्रभावी समन्वय साधून राज्यभरातून येणाऱ्या लाखो भाविकांना सुलभ, सुरळीत व जलद दर्शनाची सुविधा उपलब्ध व्हावी, याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. मतदारसंघातील जनतेच्या हिताचे प्रश्न मार्गी लागावेत, शेतकरी, विद्यार्थी, उद्योग व सर्वसामान्य नागरिकांना दिलासा मिळावा, यासाठी राज्य शासनाने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी विनंती यावेळी त्यांनी सीएम फडणवीस यांना केली आहे.
फेसबुकवरील पोस्टमुळे रंगली चर्चा
यादरम्यानच ओम राजेनिंबाळकर यांनी फेसबुकवर एक पोस्टही शेअर केली आहे. त्यांनी पोस्टमध्ये म्हटले की, माझा विरोध कोणत्याही पक्षाला नाही तर राजकारणातील नीच प्रवृत्तीला आहे. भाजप नेत्याच्या भेटीनंतर ओमराजे निंबाळकर यांनी अशाप्रकारची ही एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे. त्या पोस्टची चर्चा रंगली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.