

Solapur News : सोलापूर जिल्ह्यातील अनगर नगरपंचायतीची निवडणूक यावेळी राज्यात सर्वाधिक चर्चेचा विषय ठरली आहे. एक ना दोन तब्बल 40 वर्षांचा पवार कुटुंबाशी असलेला घरोबा सोडत राजन पाटलांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या तोंडावर भाजपची वाट धरली. ग्रामपंचायतमधून नगरपंचायत झाल्यानंतरच्या पहिल्याच निवडणुकीत माजी आमदार राजन पाटील आपली ताकद दाखवत बिनविरोधचा गुलाल उधळला. तसेच अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं दिलेलं आव्हान मोडून काढलं अनगरमध्ये आपणच किंग असल्याचं दाखवून दिलं. त्यांच्या थोरल्या चिरंजीवानं उत्साहाच्या भरात थेट उपमुख्यमंत्री अजित पवारांनाच (Ajit Pawar) चॅलेंज दिले. याच चॅलेंजनंतर आता अजितदादांनी राजन पाटलांवर पहिला वार केला आहे.
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे गुरुवारी(ता.27) सोलापूर दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांनी वडाळा येथील कार्यक्रमाला उपस्थिती लावताना पहिल्यांदाच मोहोळ तालुक्यातील वादळी ठरलेल्या अनगर नगरपंचायत निवडणुकीतील अनेक राजकीय घडामोडींवर रोखठोक भाष्य केलं. यावेळी त्यांनी माजी आमदार राजन पाटील यांच्यावर तुफान शाब्दिक हल्ला चढवला आहे.
अजित पवार म्हणाले, उज्वला थिटे इथे बसल्या आहेत, त्यांच्याबाबतीत काय झालं आपण बघितलं. आपल्याकडे लोकशाही आहे. संविधान, कायदा हा सर्वांना सारखा आहे. सर्वांना निवडणुकीत उभं राहायचं अधिकार आहे. प्रत्येकाचा एक काळ असतो. दमदाटी करून चालत नाही. प्रत्येकाचा फुगा फुटत असतो. मस्ती असलेल्या लोकांना खड्यासारखं बाजूला काढले जाते, अशा शब्दांत त्यांनी राजन पाटलांवर (Rajan Patil) जोरदार टीका केली.
अजितदादांनी यावेळी अनगरमधील उज्जवला थिटे यांचा जाहीर सत्कार केला. यावेळी त्यांनी थिटे यांच्या लढवय्या वृत्तीचं कौतुक केलं. ते म्हणाले, आमच्या लाडक्या बहिणी इथं आहे. उज्वला थिटेही इथे आहे. भाऊ म्हणून आम्ही कायम आमच्या बहिणीचं संरक्षण करण्याचं काम केलं. पुढच्या निवडणुकीत चांगल्या विचारांच्या लोकांना पुढे येऊ द्या. नव्याना संधी द्या आणि जुन्याचा अनुभवही घ्या असा सल्ला देतानाच अजितदादांनी हे जे दमदाटी तुम्ही सर्वांनी म्हटलं, पण ज्या गावचं बोरी त्याचं गावचं बाभळी असतात. कोणी अरे केलं तर कारे करणारे असतात असंही त्यांनी सांगत राजन पाटलांवर थेट निशाणा साधला.
मोहोळचे माजी आमदार राजन पाटलांच्या साम्राज्याला प्रथमच आव्हान दिलं गेल्यानं आतापर्यंतच्या बिनविरोधच्या परंपरेला ब्रेक लागला होता. अनगरच्या नगराध्यक्षपदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून उज्वला थिटे यांनी पोलिस बंदोबस्तात उमेदवारी अर्ज भरला होता. मात्र, छाननीत त्यांचा अर्ज बाद झाला. त्यानंतर राजन पाटील समर्थकांनी नगरपंचायतीसमोर जल्लोष केला. यावेळी पाटील यांचे थोरले चिरंजीव विक्रांत ऊर्फ बाळराजे पाटील यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांना चॅलेंज केलं.
अनगरमध्ये नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत उज्जवला थिटे यांचा अर्ज बाद झाल्यानंतर पाटील कुटुंबाकडून विजयी जल्लोष करण्यात आला. या जल्लोषाच्या वेळी विक्रांत ऊर्फ बाळराजे पाटील यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांना चॅलेंज केलं आहे. ‘अजित पवार सगळ्यांचा नाद करायचा....पण अनगरकरांचा नाद करायचा नाही’ अशा शब्दांत खुद्द विक्रांत पाटील यांनी चॅलेंज दिले आहे. त्यांच्या या आव्हानाची जिल्ह्यात सर्वाधिक चर्चा झाली.
उज्वला थिटे यांना पोलिस बंदोबस्तात अर्ज दाखल करावा लागला, यामुळे अनगर नगरपंचायतीच्या निवडणुकीची राज्यभरात चर्चा झाली. तसेच बिनविरोधची परंपराही खंडीत झाली. मात्र, छाननीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) उमेदवार उज्वला थिटे यांचा अर्ज बाद झाला. त्यांच्या अर्जावर अपक्ष उमेदवार सरस्वती शिंदे यांनी आक्षेप घेतला. त्यानुसार थिटे यांचा अर्ज बाद झाला आहे. यानंतर थिटे यांनी सोलापूर जिल्हा सत्र न्यायालयात धाव घेतली. पण तिथेही त्यांचा अपील अर्ज फेटाळण्यात आला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.