
शक्तीपीठ महामार्ग प्रकल्पावर शेतकऱ्यांचा विरोध वाढला असून मोबदला बाजारभावानुसार नसल्याची नाराजी.
अजित पवार यांनी हा विषय गंभीर असल्याचे सांगत तो थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत नेण्याचे आश्वासन दिले.
शेतकऱ्यांचा विरोध महायुतीसाठी धोक्याचा ठरू शकतो, असा इशारा राजकारणात व्यक्त होत आहे.
Sangli News : शक्तीपीठ महामार्गास कोल्हापुरसह सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा तीव्र विरोध आहे. या विरोध दर्शविण्यासाठी काँग्रेसचे विधानपरिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील आणि स्वाभिमानी शेतकरी संगटनेचे नेते राजू शेट्टी यांनी शेतात तिरंगा फडकवत शक्तीपीठ महामार्गाला कडाडून विरोध दर्शविला. यामुळे हा विषय अधिकच गंभीर झाला आहे. अशातच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी, शेतकऱ्यांचा विरोध पाहता हा विषय मुख्यमंत्र्यांच्या अखत्यारित असल्याचे सांगत आपले अंग काढून घेतल्याचे पाहायला मिळाले. तसेच त्यांनी शेतकऱ्यांचा विरोध हा महायुतीला परवडणारा नाही. त्यामुळे ही बाब मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत पोहचवू,’ अशी सावध भूमिका शनिवारी (ता. 16) घेतली. सांगली जिल्हाधिकारी कार्यालयात शनिवारी आढावा बैठकीनंतर ते पत्रकार परिषदेत बोलत होते. त्यावेळी पालकमंत्री चंद्रकांत पाटील, खासदार विशाल पाटील, आमदार सुरेश खाडे, सत्यजीत देशमुख, जिल्हाधिकारी अशोक काकडे यांची उपस्थिती होती.
यावेळी पवार म्हणाले, ‘शक्तिपीठ महामार्गात शेती गेली तर, किंमत किती येईल, त्याशिवाय नोंदणी नाही, अशी भूमिका शेतकऱ्यांची, लोकप्रतिनिधींची आहे. रेडीरेकनरचे मूल्य मान्य नाही. शेतकऱ्यांना आजच्या बाजारभावाप्रमाणे पैसे हवे आहेत. सोलापूर-कोल्हापूर असा मार्ग असताना नव्याने या मार्गाची गरज काय? असाही प्रश्नही शेतकरी करत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांची प्रचंड नाराजी असल्याचे उघड होत आहे. ही नाराजी महायुतीला परवडणारी नसल्याने आपण मुख्यमंत्र्यांशी चर्चा करू. त्यानंतरच निर्णय घ्यावा अशी विनंती करणार असल्याचे ते म्हणाले.
‘समृद्धी महामार्ग आणि शक्तिपीठ महामार्गामध्ये मोबदल्याच्या बाबतीत तुलना होऊ शकत नाही. सांगली, कोल्हापूर, सोलापूर येथे बागायती शेतीचे प्रमाण अधिक आहे. अल्पभूधारक शेतकरी जास्त आहेत. कोणत्याही प्रश्नाचे उत्तर आणि मार्ग हा चर्चेतून निघतो. शेतकऱ्यांचा विरोध आम्हाला परवडणारा नाही. काही गावांनी मोजणी करू दिली आहे. काही गावांत विरोध कायम आहे.
शेतकऱ्यांनीच महायुतीला निवडून दिले आहे. त्यामुळे महायुतीच्या आमदारांना देखील शेतकऱ्यांचे ऐकावे लागते. तसेच या भागातील पालकमंत्री, मंत्री यांचे म्हणणे देखील विचारात घेतले जाईल’, असेही ग्वाही अजित पवार यांनी यावेळी दिली आहे.
तसेच यावेळी अजित पवार यांनी, सतेज पाटील यांनी केलेल्या शक्तिपीठ प्रकल्पाच्या वाढणाऱ्या बजेटवर टीकेवर देखील उत्तर दिले. सतेज पाटील यांना आंदोलन करण्याचा पूर्ण अधिकार आहे. मात्र, हा विरोध कशासाठी, हे त्यांना पटवून द्यावे लागेल. समृद्धी महामार्गालाही असाच विरोध झाला होता. मात्र, तो नंतर मावळला. या प्रकल्पाचा दर वाढवला असा आरोप करणाऱ्या सतेज पाटलांनी कागदपत्रे सादर करावीत, असे आव्हानही त्यांनी यावेळी दिले. तसेच सध्या आपण काय तरी करतोय हे दाखवण्यासाठी सतेच पाटील यांना या मुद्द्याचा आधार घ्यावना लागत असल्याचीही टीका यावेळी अजित पवार यांनी केलीय.
प्र.१: शेतकऱ्यांचा विरोध का आहे?
उ: कारण जमीन संपादनात बाजारभावाप्रमाणे मोबदला मिळत नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.
प्र.२: अजित पवार यांनी काय भूमिका घेतली?
उ: त्यांनी शेतकऱ्यांचा प्रश्न थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत पोहोचवू, असे सांगितले.
प्र.३: महायुतीसाठी हा मुद्दा किती गंभीर आहे?
उ: शेतकऱ्यांचा विरोध महायुतीला राजकीयदृष्ट्या परवडणारा नाही, असे स्पष्ट संकेत मिळत आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.