
Maharashtra Political news : ‘सहकारातून समृद्ध झालेला भाग,’ अशी पश्चिम महाराष्ट्राची ओळख आहे. एका बाजूला समृद्ध ग्रामीण भाग, तर वेगाने नागरीकीकरण होत असलेली शहरे असा संगम येथे पाहायला मिळतो. पुणे, सातारा व अहिल्यानगर या तीनही जिल्ह्यांत हे चित्र पाहायला मिळते. काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसचा परंपरागत गड असलेल्या या तीन जिल्ह्यांत महायुतीने यशाचे नवे शिखर गाठले. या तीन जिल्ह्यांत एकूण ४१ पैकी तब्बल ३६ जागांवर महायुतीने विजयाचा झेंडा फडकावून पश्चिम महाराष्ट्राची नवी ओळख निर्माण केली आहे.
महायुतीत (Mahayuti) भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसने भरभक्कम यश मिळवले आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांची ताकद कमालीची वाढली आहे. सर्वाधिक तोटा कॉंग्रेसचा झाला आहे. पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब थोरात, संग्राम थोपटे अशा पक्षाच्या अनेक दिग्गजांना पराभवाला सामोरे जावे लागले.
पुणे, सातारा व अहिल्यानगर या तीनही जिल्ह्यांतील ग्रामीण भाग राज्यातील अन्य भागाच्या तुलनेत सधन मानला जातो. सहकारी साखर कारखाने, शिक्षण संस्था, दूध संस्था, पतसंस्था असे सहकाराचे व्यापक जाळे येथे विकसित झाल्याने हे साध्य झाले. त्यातून स्थानिक नेतृत्व बहरले. आधी काँग्रेस आणि नंतर राष्ट्रवादी काँग्रेसने वर्चस्व निर्माण केले. मात्र, दहा-बारा वर्षांत या साखरपट्ट्यात (Sugar Belt) भाजपने शिरकाव करण्यास सुरवात केली.
पुण्यातून कॉँग्रेस हद्दपार
पुण्याचा विचार केल्यास शहरात भाजपचे वर्चस्व आणखी वाढले. पुणे शहरातील आठपैकी सहा जागा जिंकून भाजपने आगामी महापालिकेसाठी पाया रचला. मात्र, त्याहीपेक्षा अजित पवार यांच्या ‘राष्ट्रवादी’ला युतीत सहभागी करून घेत भाजपने ग्रामीण भागातही बस्तान बसविण्यास सुरवात केली. त्याचा फायदा या तिन्ही जिल्ह्यांत भाजपला झाल्याचे स्पष्ट होत आहे.
पुणे जिल्ह्यात २१ पैकी भाजपने सर्वाधिक ९ तर राष्ट्रवादी काँग्रेसने ८ जागा पटकावल्या आहेत. विशेष म्हणजे इतिहासात प्रथमच जिल्ह्यातून काँग्रेस हद्दपार झाली आहे. सातारा जिल्ह्यात तर आठही जागा युतीने पटकावल्या तर अहिल्यानगर जिल्ह्यात १२ पैकी दहा जागा युतीला मिळाल्या आहेत.
आगामी निवडणुकांवर परिणाम
या भागात महाविकास आघाडीने लोकसभेला चांगले यश मिळवले होते. मात्र, लोकसभा निवडणुकीनंतर वेगाने पावले उचलत युतीने आघाडीला निष्प्रभ केले आहे. लाडकी बहीण योजना, शेतकरी वीजबिल माफी, ‘मेट्रो’सह शहरातील विकास प्रकल्प याचा युतीला मोठा लाभ झाला आहे. त्यामुळे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यावर प्रेम करणाऱ्या या परिसरात आता भाजपसह अजित पवार यांनी निर्विवाद वर्चस्व निर्माण केले आहे.
सहकार क्षेत्रातील विखे पाटील, अजित पवार असे महत्त्वाचे नेते महायुतीचे नेतृत्व करीत आहेत. त्यांच्या सहकार्याने साखर पट्ट्यातही भाजप वाढू लागला आहे. राजकारणात हा बदल महत्त्वाचा ठरणार आहे. याचे परिणाम आगामी नगरपालिका, जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुकीवरही दिसणार आहेत.
पुणे, पिंपरी-चिंचवड या मोठ्या सधन महापालिकांसह अहिल्यानगरची महापालिका या भागात आहे. मोठी आर्थिक उलाढाल असणाऱ्या व वेगाने विकसित होणाऱ्या या औद्योगिक पट्ट्यातही आगामी महापालिका निवडणुकीत या निकालाचे पडसाद उमटतील. त्यामुळे महायुतीसाठी हा विजय मैलाचा दगड ठरणार आहे.
ठळक वैशिष्ट्ये
तीन जिल्ह्यांतील विधानसभेच्या ४१ पैकी महायुतीला तब्बल ३६ जागा मिळाल्या.
महाआघाडीला अवघ्या चार जागा.
स्थानिक स्वराज्य संस्था तसेच महापालिका निवडणुकांवर या निकालाचे दूरगामी परिणाम
Edited By : Vijay Dudhale
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.